‘द वुमन ऑन ट्रायल’ : आजच्या भ्रष्ट समाजाचं दर्शन
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘द वुमन ऑन ट्रायल’मधील काही दृश्यं
  • Sat , 17 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe द वुमन ऑन ट्रायल The Woman On Trial अ‍ॅन रँड Ayn Rand

भारतीय समाजजीवनात ‘व्यक्ती’ या घटकाला महत्त्वाचं स्थान कधीच नव्हतं. जेव्हा पौर्वात्य संस्कृती व पाश्चात्य संस्कृती एकमेकांसमोर उभी ठाकली आणि या संघर्षात पाश्चात्य संस्कृतीचा विजय झाला, तेव्हा भारतीय/ मराठी विचारवंतांना आपल्या जीवनविषयक मूल्यांचा पुनर्विचार करणं क्रमप्राप्त ठरलं. त्याच काळी भारतात लॉर्ड मेकॉलेच्या कृपेनं इंग्रजी भाषेतून शिक्षण सुरू झालं. परिणामी भारतीयांना स्वातंत्र्य, समता, व्यक्तीवाद वगैरे पाश्चात्य मूल्यांचा परिचय झाला. पाश्चात्य समाजानं केलेल्या प्रचंड प्रगतीची जी अनेक कारणं दिली जात होती, त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या समाजव्यवस्थेत व्यक्तीला असलेलं स्वातंत्र्य. यामुळे आपल्याकडेसुद्धा ‘व्यक्तीवाद’ महत्त्वाचा ठरत गेला.

पाश्चात्य समाजात उदयाला आलेला व्यक्तीवाद एकरंगी नव्हता. त्यात अनेक शेड होत्या. त्यात ‘अतिरेकी/ टोकाचा व्यक्तीवाद’ ही एक शेड होती. या शेडची विसाव्या शतकात मांडणी करणारी अभ्यासक म्हणजे अ‍ॅन रँड (१९०५-१९८२) ही रशियात जन्मलेली व अमेरिकेत १९२६ साली स्थलांतरित झालेली विदूषी. ती तत्त्वज्ञ होती. तिनं कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. तिच्या ‘फाऊंटन हेड’, ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ वगैरे कादंबऱ्या माहीत असलेली वा न वाचलेली व्यक्ती विरळा. या कादंबऱ्यांनी तिला जागतिक कीर्ती मिळवून दिली. मात्र तिनं लेखनाची सुरुवात नाटक लिहून केली होती. १९३५ साली तिचं ब्रॉडवेवर ‘द नार्इट ऑफ जानेवरी 16’ हे नाटक मंचित झालं. या नाटकापासून तिचं तत्त्वज्ञान कलाकृतींच्या माध्यमातून समाजासमोर यायला लागलं.

याच नाटकावर आधारित ‘द वुमन ऑन ट्रायल’ हे हिंदी/इंग्रजीचं मिश्रण असलेलं नाटक बघण्याची संधी अलीकडेच मिळाली. हे नाटक मुंबर्इस्थित ‘मेकिंग नॉर्इस’ या नाट्यसंस्थेनं सादर केलं. या नाटकाचं दिग्दर्शन लॉरा मिश्रा यांनी केलं आहे. हे भारतातील इंग्रजी रंगभूमीवरील एक आदरणीय नाव आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या रंगभूमीवर कार्यरत आहेत. या नाटकात त्या प्रमुख भूमिका करतात. या आधी ‘मेकिंग नॉर्इस’नं ‘किसी एक फुल का नाम लो’, ‘विक्रम खोसला कौन है?’ वगैरे दर्जेदार नाटकं सादर केली आहेत.

हे नाटक ‘कोर्टरूम ड्रामा’ या प्रकारात मोडणारं आहे. या सादरीकरणाच्या प्रकाराचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे प्रेक्षक सुरुवातीपासून यात गुंतलेला राहतो. कोण खुनी आहे व त्यानं का खून केला वगैरे प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना हवी असतात. एवढंच नव्हे तर या प्रकारात प्रेक्षक मानसिक पातळीवर गुंतलेले असतात आणि ते स्वतःशी सतत खुनी व्यक्तीबद्दल अंदाज बांधत असतात. जेव्हा कलाकार/ नाटककार एक तत्त्वज्ञ असतो, तेव्हा त्याच्या कलाकृतीमध्ये तात्त्विक प्रश्नांची चर्चा आपसूकच येते. सार्त्र या फ्रेंच लेखक/ तत्त्वज्ञाच्या लेखनात अनेकदा नैतिक समस्यांची जोरदार चर्चा असते. हाच प्रकार अ‍ॅन रँडच्या या नाटकातही आहे.

अ‍ॅन रँडला हे नाटक १९३२ साली ‘मॅच किंग’ इव्हर क्रेजेरनं पॅरिस शहरात केलेल्या आत्महत्येवरून सुचलं. हा स्वीडीश-अमेरिकन गृहस्थ फार वादग्रस्त होता. त्यानं व्यापारात व आगपेटीच्या व्यवसायात करोडो रुपये कमावले होते. म्हणून त्याला ‘मॅच किंग’ म्हणत असत. नंतर त्यानं आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्याविषयी अनेक प्रकारची उलटसुलट माहिती समोर आली. त्यानं फार मोठा फ्रॉड केला होता, त्यानं कर्जाचे अनेक प्रकार हुडकून काढले होते वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल आजही जगाचं मत नक्की होत नाही. मात्र एका बाबतीत एकमत आहे आणि ते म्हणजे तो कुशाग्र बुद्धीचा, प्रचंड पैशांचे घोटाळे (हर्षद मेहताचा अमेरिकन अवतार) करणारा फार मोठा धोकेबाज होता. त्यानं आत्महत्या केल्यानंतर चूक काय व बरोबर काय वगैरे चर्चा सुरू झाली. या घटनेवरून अ‍ॅन रँडला ‘द नार्इट जानेवारी 16’ हे नाटक सुचलं.

आता या नाटकाचा भारतीय अवतार मंचित झाला आहे.

‘द वुमन ऑन ट्रायल’ नाटकात एका स्त्रीवर एका श्रीमंत माणसाचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रसंगानं नाटक सुरू होतं. ही तरुण स्त्री म्हणजे कॅरेन आंड्रीया. ती फिरोझ लकडावाला या श्रीमंत माणसाकडे त्याची सेक्रेटरी म्हणून नोकरी करत होती. नंतर तिला फिरोझ मोठं पेंटहाऊस घेऊन देतो. ती त्याची रखेल म्हणून राहते. दरम्यान फिरोझ लग्न करतो. नंतर फिरोझचा कॅरेनच्या पेंटहाऊसमध्ये खून झाल्याचा आरोप होतो. म्हणून कॅरेनला अटक होते व तिच्यावर खटला सुरू होतो. फिरोझची पत्नी नॅन्सी व तिचा भाऊ कपूर कॅरेनच्या विरोधात महत्त्वाची साक्ष देतात. हा खटला म्हणजे हे नाटक.

या नाटकात दिग्दर्शक लॉरा मिश्रा प्रेक्षकांना ज्युरीच्या भूमिकेत टाकते व त्यांचा निर्णय घेते. आजपर्यंत या नाटकाचे चार प्रयोग झाले आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या शेवटी ‘कॅरेननं खून केला नाही’ असाच निर्णय ज्युरी झालेल्या प्रेक्षकांनी दिलेला आहे. या नाटकात ज्याचा खून झाला तो फिरोझ लकडावाला कधीही प्रेक्षकांसमोर येत नाही. खून नॅन्सीच्या भावानं म्हणजे कपूरनं केलेला असतो. कारण कपूरवर प्रचंड कर्ज असतं. त्याची अशी अपेक्षा असते की, फिरोझनं त्याला यातून बाहेर येण्यासाठी मदत करावी, पण तो नकार देतो. त्यामुळे त्याचा खून केल्यास त्याची सर्व संपत्ती आपल्या बहिणीला मिळेल असा कपूरचा हिशेब असतो. नॅन्सीलासुद्धा फिरोझ मरावा असंच वाटतं. तिला फिरोझचे कॅरेनबरोबर असलेले संबंध मान्य नसतात. तिकडे कॅरेन व फिरोझनं वेगळाच कट केलेला असतो. कोणाची तरी डेड बॉडी आणायची आणि फिरोझचा खून झाला असं दाखवायचं. यथावकाश सर्व शांत झाल्यावर देश सोडून कायमचं गायब व्हायचं. म्हणजे जेव्हा फिरोझचा खून झाला आहे असं सर्वत्र बोललं जात असतं, तेव्हा फक्त कॅरेनला माहीत असतं की, फिरोझ जिंवत आहे. मात्र जेव्हा तिला कळतं की, फिरोझचा खरोखर खून झाला आहे तेव्हा ती कोसळते. असं हे रहस्यप्रधान नाटक. यात शेवटी एका गँगस्टरच्या, बुलेट दाभोलकरच्या साक्षीमुळे कपूरनं फिरोझचा खून केल्याचं समोर येतं, तो पकडला जातो.

या नाटकाचा प्लॉट बराच गुंतागुंतीचा आहे. पण त्यामुळेच प्रेक्षक शेवटपर्यंत नाटकात गुंततो. रहस्यप्रधान नाटकांचं हेच तर वैशिष्ट्य असतं. कोर्ट रूम ड्रामा असल्यामुळे कोर्टाचं वातावरण उभं करणं गरजेचं ठरतं. हे लॉरा मिश्रानं योग्य प्रकारे जुळवून आणलं आहे. यात लॉरानं कॅरेनची प्रमुख भूमिका केली आहे. ही भूमिका फार गुंतागुंतीची आहे. तिच्यासमोर तिच्या कटाप्रमाणे तिच्या प्रियकराच्या मृत्यूचा खटला सुरू आहे. नंतर जेव्हा तिला कळतं की, फिरोझचा खरोखरच खून झाला आहे तेव्हाचा कॅरेनचा विलाप बघवत नाही. तिची सर्व स्वप्नं भंगतात. ती खुनाच्या आरोपातून सुटते, पण प्रियकर मेलेल्या जगात आता तिला जगावं लागणार या भावनेनं ती खचते. या सर्व छटा लॉरानं व्यवस्थित व्यक्त केल्या आहेत. तिला प्रेरणा तलवार (अ‍ॅडव्होकेट राव), तन्मय रंजन (बुलेट दाभोलकर), बरखा सक्सेना (नॅन्सी लकडावाला), सी. जे. सिंग (कपूर) वगैरेंनी योग्य साथ दिली आहे. या नाटकाची प्रकाशयोजना भीमाजीयानी यांनी सांभाळली आहे.

या नाटकाचं नाव जरी ‘द वुमन ऑन ट्रायल’ असलं तरी खरं तर यात नैतिकतेवर चर्चा होते. यात कोणाचं काय चुकलं? फिरोझ लकडावाला या गृहस्थाबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे का? कॅरेनचं काय? तिनं प्रेमाखातर एका मोठ्या भ्रष्ट व्यवहारात सामिल होण्याचं मान्य केलं. नॅन्सी लकडावाला तर स्वतःच्या पतीच्या मृत्यूची वाट पाहत असते. तिचा भाऊ कपूर स्वतःच्या बहिणीला विधवा करण्याच्या अगोदर दोन सेकंदसुद्धा विचार करत नाही. या सर्वांत नैतिकता कोठे आहे?

भारतीय समाज आज ज्या टप्प्यावर उभा आहे, ते बघता हे नाटक कालोचितच म्हणावं लागेल. आपल्या समाजातही भ्रष्टाचारानं कळस गाठला आहे. यात फक्त आर्थिक भ्रष्टाचार हा मुद्दा नाही. स्वतःच्या मुलामुलींना दहावी/ बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या पालकांबद्दल काय म्हणायचं? प्रॉपर्टीसाठी आपल्या आर्इ-वडिलांचे खून करणाऱ्या मुलांबद्दल नेहमी वाचायला मिळतं. असे अनेक प्रश्न हे नाटक बघताना मनात येतात.                                

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 18 March 2018

प्राध्यापक अविनाश कोल्हे, परीक्षण यथोचित आहे. मात्र पहिला परिच्छेद अनावश्यक आहे. पौर्वात्य संस्कृतीचा पराभव म्हणजे नक्की काय? मेकॉलेच्या कृपेने मिळालेल्या शिक्षणाने आज पुरेपूर नैतिक ऱ्हास घडवून आणलाय. नाटकाची कथावस्तूच तशी आहे. मग हे शिक्षण म्हणावं की भिकेचे डोहाळे? बरेच मुद्दे आहेत. विस्तारभयास्तव इथेच थांबतो. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......