बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत
ग्रंथनामा - झलक
इरावती कर्णिक
  • ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा झलक बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत Batlitalya Rakshasinich Manogat इरावती कर्णिक Irawati Karnik

तरुण नाटककार इरावती कर्णिक यांचा ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ हा लेखसंग्रह नुकताच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालाय. या पुस्तकातील त्याच शीर्षकाचा हा लेख...

.............................................................................................................................................

सकाळी खिडकीबाहेरच्या ग्रिलमध्ये लक्ष जातं आणि आठवतं की, आपण गेले अनेक दिवस झाडांना पाणी घालायला विसरतोय. आजीने नागपूरहून पाठवलेलं रोपटं मेल्यासारखं दिसतंय. आपल्याला स्वत:ला सांगावंसं वाटतं की, पाणी घालून बघू; दोन दिवसांत नीट होईलही. पण ज्या तऱ्हेनं त्यानं मान टाकलीय, त्यावरून आपल्याला आत कुठेतरी कळतं की, ते मेलंच आहे. भयानक अपराधीपणाची भावना येते. वाटतं, आपण आयुष्यात काहीच नीट करू शकत नाही. सतत जवळच्यांना निराश करतो. आजपर्यंत आपण निरर्थक कोर्सेस, क्लासेसवर आई-बाबांचे केवढे पैसे फुकट घालवलेत! सगळं चुकलंय. आता काहीही सुधारण्याची वेळ उलटून गेलीय. आपण एक मोठ्ठं फेल्युअर आहोत.

केस कापायला गेलं असताना आपण वाट बघत बसलेले असतो. एक चकचकीत मासिक आपण चाळायला घेतो. त्यात माओरी आदिवासी जमातीबद्दल एक स्टोरी असते. त्यांची घरं, त्यांचे कपडे, त्यांचं जेवण, त्यांचे दागिने, त्यांची शस्त्रं, त्यांची चित्रं! अचानक आपली नजर एका रेखाटनावर पडते. गोलाकारात एक नक्षीदार शार्क मासा एका वेलीत गुंफलेला असतो. मध्यभागी फुलपाखरासारखा दिसणारा पाण्याखालचा मँटा रे नावाचा प्राणी असतो. हे त्या जमातीत मैत्री आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं लिहिलेलं असतं. आपल्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. आपण गेले इतके महिने टॅटूसाठी जे डिझाइन शोधतोय ते हेच- याची खात्री पटते. आपण स्वत:ची त्या टॅटूसकट कल्पना करतो. कोणी विचारलंच, की हेच का, तर विलक्षण वाटेल असं उत्तर माहिती वाचून घोकून ठेवतो. आयुष्यात सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडतंय असा विश्वास वाटतो. पुढेही आपण ठरवू तेच घडेल, हे पटतं. वाटतं, सगळं जसं असायला हवं तसंच आहे.

घरातून बाहेर पडायची घाई असते. धावपळीत अर्ध्या गोष्टी सापडत नसतात. हेअर ड्रायर, डिओ, लोशन, कपडे पटापटा निवडावे लागतात. नशिबाने टॉपला इस्त्री असते. जीन्समध्ये दोन्ही पाय घालून ती चढवायची वेळ येते आणि लक्षात येतं की, खूप जोर काढावा लागतोय. धुतल्या धुतल्या जीन्स थोड्या घट्ट असतात हे खरं, पण इतकी मेहनत नाही घ्यावी लागत घालताना. कशीबशी जीन्स घातली जाते आणि पराकोटीच्या प्रयत्नानंतर बटण लागतं. एव्हाना बाहेर पडायचा उत्साह संपलेला असतो. वाटतं, आपण किती कुरूप आहोत! आपल्याकडे का कोणी बघेल! आपल्यासोबत हिंडणाऱ्या व्यक्तीला किती त्रास होत असेल! आपली घाणच वाटत असणार सगळ्यांना. आता बारीक झाल्याशिवाय घराबाहेर पडायलाच नको. आता काही खायलाच नको. कशालाच काही अर्थ नाही.

आपण केबलवर वेळ लक्षात ठेवून एक सिनेमा बघायचा ठरवलेला असतो. त्याच वेळी लाइट जातात. आपला राग राग होतो. तेवढ्यात ग्रुपमधल्या एकाचा फोन येतो. सगळे झेंझी नावाच्या क्लबमध्ये जायचा प्लॅन करत असतात. आपण एका पायावर तयार होतो. रात्री खूप नाचतो. खूप पितो. टाइट होतो. खूप हसतो. वाटतं, आपल्याला आणखी काही नको! याला म्हणतात सुखी असणं!

रस्त्यातून जाता जाता एका बिल्डिंगच्या कडेला झोपलेलं एक लहान बाळ दिसतं. त्याच्या अवतीभोवती कोणीही नसतं. ते नागडंच झोपलेलं असतं. थोडं बाजूला किंचित अन्न सांडलेलं असतं. चिंध्या पडलेल्या असतात. काळा चिखल सुकलेला असतो. बाळाभोवती माश्या घोंघावत असतात. तरी ते गाढ झोपून राहतं. आपल्याला स्वत:ला शिव्या द्याव्याशा वाटतात. आपण किती वायफळ खरेदी करतो! नको तेवढे पैसे खर्च करतो. आपल्याला काही लाजच नाही. खरेदी करताना काही कंट्रोलच राहत नाही. आपण फालूत आहोत. आपली जगण्याची लायकी नाही. आपण नालायक आहोत. आपण मरून जावं किंवा निदान आपल्याला जोरात लागावं आपलं फार वाईट चाललंय.

फेशियलची खोली अत्यंत आरामदायक असते. आपण निर्धास्तपणे मागे रेलतो. तिथली बाई हळूहळू आपल्या चेहऱ्यावर निरनिराळे लेप थापत राहते. मसाज करत राहते. अख्खं शरीर आपोआप शिथिल होत जातं. आपण डोळे मिटून म्हणतो- याला म्हणतात आयुष्य.

फोन वाजतो. लाडकी रिंगटोन. स्क्रीनवर बॉयफ्रेन्डचा फोटो. आपण उत्साहात फोन घेतो. आपण प्रेमात येणार तेवढ्यात तो आपल्याला थांबायला सांगतो आणि गंभीर आवाजात आपलं नातं संपवण्याची वेळ आली असल्याचं सांगतो. आपल्याला काय चाललंय, काहीच कळत नाही. आपल्याभोवतीचं आपलं अख्खं जग आपल्याला कोसळताना दिसतं. हातातून सगळं निसटत चाललंय असं वाटतं. हरवल्यासारखं, हताश वाटतं. आपण बटर घालून मॅगी खातो. चीज सिंगल खातो. चॉकलेट्स खातो. आपलं ठरतं- आयुष्याला काहीही अर्थ नाही.

आज नेटचं कनेक्शन फारच फॉर्मात असतं. क्लिक करताच साइट्स ओपन होतात. आपलाही मेंदू पटापटा चालतो. आज चॅटरूममध्ये आपल्याला खूप चमकदार आणि चतुर बोलायला सुचतं. स्वत:चा हजरजबाबीपणा आपल्याला थक्क करतो. स्वत:चं इतकं आकर्षक व्यक्तिमत्त्व आपण निर्माण करतो, की एक नाही, दोन नाही, तीन अनोळखी मुलं आपल्याशी फ्लर्ट करतात. आपल्याला वाटतं, आपण आहोतच अशा. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकानं खरं तर स्वत:ला लकी मानलं पाहिजे. सगळ्यांना आपण बनावंसं वाटत असणार. लाइफ कसं जगावं? आपल्यासारखं!

एक दिवस अगदी रिकामी दुपार असते. वर्णन नसलेली. आणि पाऊस येतो. सगळं नवं, स्वच्छ, हिरवं होतं. बाटलीतून बाहेरचं हिरवं दिसतच असतं. आतलंही हिरवं होतं. आपण भिजतो. सगळं ओलं होतं... आणि लक्षात येतं की, याचा अर्थ बाटलीचं झाकण उघडंच आहे.

बाहेरचं जग कसं असेल? तिथं आयुष्याला अर्थ असेल का नसेल? ते आपल्याबद्दल असेल का नसेल? आपल्याला माहीत नसलेलं तिथे किती असेल? कोणास ठाऊक, कदाचित तिथं आपल्याला न सुचणारे प्रश्नही असतील तर? आणि उत्तरं मिळण्यासारखी असतात. बाटलीतून बाहेर पडून फक्त त्याआधी ती आडवी पाडावी लागणार. सगळं सुरळीत चालू असताना गदागदा हलवून बॅलन्स घालवावा लागणार.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4392

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......