'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि रग्गड पदव्या असलेला मालक
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
बाळासाहेब राजे
  • वसंत लामतुरे अहमदपूरच्या बसस्थानकासमोरच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर'मध्ये 
  • Tue , 16 January 2018
  • पडघम कोमविप वसंत लामतुरे Vasant Lamture ग्रॅज्युएट खिचडी सेंटर Graduate Khichadi Centre पीएच.डी. Ph.D.

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या! एम. ए., बी. एड, सेट, पेट या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवतो म्हणून त्याचं कौतुक करावं की, उच्चशिक्षित असूनही वशिलेबाजी व पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो. पेट ही पीएच. डी.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन वसंत आता स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात 'हिंदी - मराठी दलित आत्मकथाओं का तुलनात्मक अध्ययन' या विषयावर पीएच. डी. करत आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा जिद्दीचा असून हे सारं त्यानं स्वतःच्या बळावर केलंय हे विशेष.

अठरावविश्वे दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. वसंत हे अकरावं अपत्य असून शेंडेफळ आहे. अकरापैकी चार बालकं दगावली. उरलेल्या सातपैकी चार भाऊ, तर तीन बहिणी. वडील हिरामण लामतुरे हे लाकडं फोडायचे, तर आई गयाबाई निंदण, खुरपण, गवत कापणं यासारखी शेतमजुरीची कामं करायची. कळत्या वयात शाळेत जाणारा वसंत केसाला लावायला खोबरेल तेल हवं म्हणून हट्ट करी, तेव्हा "तू मोठा झालास की आपण खोबरेल तेल आणू" म्हणून आई त्याची समजूत घालत असे.

बालवयातल्या गरिबीच्या चटक्यांनी वसंतला अकाली प्रौढत्व आलं. पैसा कमावल्याशिवाय कुटुंबाचा गाडा ओढणं अशक्य आहे, हे ओळखून त्यानं आयटीआयचा कोर्स पूर्ण करताच पुणं गाठलं. पुण्यातल्या एका कंपनीत तुटपुंज्या पगारावर फिटरचं काम करत असताना त्याच्यासमोर झालेल्या अपघातात एका बंगाली कामगाराला आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवानं आपलाही असाच अपघात झाला तर आपल्या आई-वडिलांवर कोणती आपत्ती कोसळेल, म्हणून त्यानं पुणं सोडलं आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

सकाळी सहा वाजल्यापासून घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकायची, सव्वाआठ ते दोन वाजेपर्यंत कॉलेज करायचं, कॉलेजहून आल्यावर पाच वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, पाच ते आठ वाजेपर्यंत पिग्मी एजंट म्हणून काम करायचं आणि रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत अभ्यास करायचा, पुढची आठ वर्षं हीच त्याची दिनचर्या झाली. खेळकर वृत्तीचा वसंत घरोघर जाऊन वर्तमानपत्रं टाकण्याच्याकामाला 'Morning Walk With Earning' असं म्हणतो. वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर तो अभ्यासाचे पॉइंट लिहिलेला कागद डकवत असे नि ते पॉइंट घोकत घोकत सायकलला पायंडल मारत असे.

वसंत कॉलेजला शिकत होता तेव्हाचा एक प्रसंग आहे. बऱ्याचदा पुस्तकं, वह्या घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसत. त्यावेळी अहमदपूरच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर असलेला इसम डॉक्टरचे कपडे इस्त्रीसाठी घेऊन येत असे. त्यावेळी एका ड्रेसच्या इस्त्रीला पाच रुपये दर होता. वसंतने त्या इसमाला पटवलं. एका ड्रेसमागे एक रुपया कमिशन देऊन वसंत स्वतःच इस्त्री करू लागला आणि त्यानं पैशाचा प्रश्न काही अंशी का होईना सोडवला.

एके दिवशी वसंतच्या मनात विचार आला, रिक्षाचा नंबर यायला दोन तास वाट पहावी लागते आणि एका फेरीत कमाई होते फक्त वीस-तीस रुपये. याऐवजी आपण छोटंसं हॉटेल सुरू केलं तर? त्यानं आपला मनोदय आईला सांगितला. त्याची आई म्हणाली, "वसंता, इमानदार माणसाच्या हातातल्या मातीला सोन्याचं मोल असतंय. तू इमानाला जाग. तुला काई कमी पडणार न्हाई." पदवीचं शिक्षण घेताना दहा-बारा विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करून डबा पुरवण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होताच. त्याचा उपयोग या व्यवसायात खूप झाला. बी.ए., राज्यशास्त्र व हिंदीत एम. ए., बी. एड अशा चढत्या क्रमानं तो शिकत राहिला.

अहमदपूरपासून जवळच असलेल्या माळेगावला मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची मोठी यात्रा भरते. नेमकं या यात्रेच्या वेळी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्याकडेची अनेक छोटी छोटी दुकानं, टपरीवजा हॉटेलं उठवली गेली. आता काय करायचं हा प्रश्न आ वासून त्याच्यापुढे होता. त्यानं आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतलं आणि माळेगाव गाठलं आणि यात्रेत खिचडी भज्याचं हॉटेल थाटलं. यात्रेत बऱ्यापैकी गिऱ्हाईक होतं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खपल्यावर चार पैसेही गाठीशी उरत. याच वेळी एम. ए.चं सेमिस्टर चालू होतं. कसाबसा एक पेपर देऊन त्यानं परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यात्रेच्या धावपळीत त्याचा अभ्यासही झाला नव्हता आणि काम नाही केलं तर घर कसं चालणार? चौथ्या सेमिस्टरला तो सर्व पेपरमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. काही दिवसानंतर पुन्हा अहमदपूरमध्ये त्याचं टपरीवजा हॉटेल सुरू झालं. पुढे तो हिंदी विषयाची सेट परीक्षाही उत्तीर्ण झाला. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळते. सेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण नगण्य असतं.

चार पुस्तकं शिकली, एक दोन पदव्या मिळवल्या की, नोकरी मिळेल याची खात्री हल्ली कुणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारखी आठ-दहा शहरं सोडली तर इतर ठिकाणी रोजगाराच्या नावानं बोंबच आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत शिकून धड शिक्षणात अव्वल नाही आणि कष्टाची कामं करायला लाज वाटणारी पिढी वर्षानुवर्षं तयार होतेय. कदाचित तत्कालीन इंग्रज सरकारनं लागू केलेली कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती अंधपणे राबवत असल्याचा हा परिणाम असावा. सुशिक्षित बेरोजगार नावाचं न दिसणारं लेबल लावून हे तरुण आपल्या आसपास फिरताना आढळतात. यातले बरेच व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पडिक राहून आपली हुशारी वाया घालवत असल्याचं चित्र सामान्य आहे.

वसंतच्या गाड्यावरचं 'नोकरी लागत नाही म्हणून काय झालं? काम करताना लाजायचं नसतं,' हे वाक्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खूप काही सांगतं. वसंतच्या 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर’वर दररोज सत्तर ते ऐंशी किलो तांदळाची खिचडी शिजवली जाते. गरमागरम भजी आणि वडापावचा हिशोब वेगळाच. एका ग्रॅज्युएट तरुणाच्या खिचडी सेंटरमुळे दहा-बारा लोकांना नियमित रोजगार मिळाला आहे.

दोन-तीन ठिकाणी प्राध्यापक पदाच्या मुलाखती दिल्यावर वसंतला चांगलाच अनुभव आला. दोन ठिकाणी हा माणूस खालच्या जातीतला आहे, अध्येमध्ये काही भानगड झाली तर उगाच अॅट्रोसिटीचं लफडं नको म्हणून त्याच्या पात्रतेला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आणखी एका शिक्षण संस्थेत असलेला डोनेशनचा आकडा पाहून सेट उत्तीर्ण असण्याला काडीचीही किंमत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याचं वसंत सांगतो.

राजकारण हे मानवी जगण्याचं अविभाज्य अंग आहे. त्यापासून कुणीही अलिप्त राहू शकत नाही. वसंतही राजकारणाच्या धामधूमीपासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. अहमदपूर नगरपालिकेच्या मागील दोन निवडणुका वसंतानं लढवल्या. मात्र शिक्षणातली गुणवत्ता त्याला विजय मिळवून देऊ शकली नाही. राजकारणात निव्वळ गुणवत्ता असून चालत नाही, खिसाही गरम असावा लागतो, याचं भान आता त्याला आलं आहे.

वसंतची आई गयाबाई निरक्षर आहे, काबाडकष्ट करून तिनं त्याला शिक्षण दिलं, कळत्या वयाचा झाल्यापासून वसंत स्वतः कमवून शिक्षण घेतोय. बिकट परिस्थितीत एखाद्याचं शिक्षण पूर्ण झालं नसतं, धडपड करून शिक्षण घेतल्यावरही एखाद्यानं डोनेशनचा आकडा पाहून नोकरीचा नाद सोडला असता. पण वसंतचा निर्धार पक्का आहे. कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत त्या अडचणींचा डोंगर पार करून तो आता पीएच.डी. करतोय. त्याला प्राध्यापक व्हायचंय. निरोप घेताना वसंतची आई पाणावलेल्या डोळ्यानं म्हणाली, "माजा वसंत खरंच मास्तर व्हईल का?"

.............................................................................................................................................

लेखक बाळासाहेब राजे ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे मुक्त लेखक आहेत.

spraje27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Namdev PANCHAL

Sun , 25 October 2020

Very nice writing, and more inspiration story of Vasant lamture.


vishal pawar

Sun , 21 January 2018

त्रिवार सलाम....


Prashant

Tue , 16 January 2018

good


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......