डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुशील धसकटे
  • डॉ. अनिल अवचट
  • Fri , 22 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो डॉ. अनिल अवचट Anil Awachat महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation मुक्तांगण Muktangan

काल महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले. यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी एका तरुण कादंबरीकारानं लिहिलेला हा लेख...

.............................................................................................................................................

१.

डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे. एक, त्यांच्या खास ‘अवचट शैली’तील ‘रिपोर्ताज’ या लेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे.

माझा त्यांचा प्रत्यक्ष फार परिचय नसला तरी, अवचट मला भेटले ते मी विद्यार्थी असताना, म्हणजे पहिल्यांदा शाळेत असताना पाठ्यपुस्तकांमधून. माझी आठवण बरोबर असेल तर त्या पाठाचं नाव होतं - ‘अनिकेत’. या ‘अनिकेत’नं एक अनामिक हूरहूर त्यावेळी लावली होती. पुढे बी.ए.ला आल्यावर मात्र त्यांचा ‘माणसं’ हा लेखसंग्रह अभ्यासाला होता आणि तिथंच खऱ्या अर्थानं त्यांच्या लेखनाशी चांगला परिचय झाला. त्यावेळी मी ‘माणसं’ किमान सहा-सात वेळा तरी वाचलं असेल. त्यातलं जे समजलं नाही, ते समजून सांगायला शिक्षक होतेच, त्यामुळे ‘माणसं’ उत्तम रीतीनं समजून घेता आली. पुढे एम.ए.ला पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आलो आणि काय वाचावं आणि कसं वाचावं याचं भान येऊ लागलं. अगदी अख्खाच्या अख्खा एकेक लेखक वाचून काढायचा असं ठरवून आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रा. रं. बोराडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, भास्कर चंदनशिव, बी. रघुनाथ इत्यादी इत्यादी अनेक लेखक अक्षरश: झपाटून वाचून काढले. त्यातील अनिल अवचट हे एक नाव.

अवचटांच्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लेखनानं त्यावेळी मला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्न /समस्या घ्यायची, त्याच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करून तीचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचट शैली’त त्याचं संगतवार विश्लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा हा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला, हे नि:संदिग्ध.

२.

तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले - फिरले आहेत. एवढेच नव्हे तर एसेम जोशी, जेपी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी बिहारमधल्या पुर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. तसेच पुर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. (‘पुर्णिया’ पुस्तकाला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे.) समाजातील विविध प्रश्नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन खऱ्या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो. त्यांचं संबंध लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित माणसांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं, धडपडणारं एका ‘सच्च्या’ कार्यकर्त्याचं मन आहे.

ज्या विषयाकडे एरव्ही कुणाचं सहज म्हणून लक्ष जात नाही, आणि समजा गेलंच तर, ते फार महत्त्वाचं वाटत नाही, अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या उपेक्षित विषयांचं अवचटांनी तळमळीनं नेतृत्व केलं आहे. ‘वेध’च्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर लिहितात, “किंबहुना त्याची भोवतालच्या घटनांकडे किंवा माणसांकडे बघण्याची नजर विलक्षण चौकस, शोधक आणि मुळात शंकेखोरच आहे.” त्यांच्या एकूण लेखनावर एक नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसते. उदा. ‘माणसं’, ‘वस्त्या माणसांच्या’, ‘अंधेर नगरी निपाणी’ (माणसं); ‘बावड्याचा बहिष्कार’, ‘पारधी मेळावा’, ‘मराठवाडा दंगल : दोन घटना’, ‘सत्याभामेची विटंबना’, ‘पोलीस कोठडीतील मृत्यू’ (कोंडमारा); ‘अंधश्रद्धांचे गुरू’, ‘अंधश्रद्धांची केंद्रे’, ‘अंधश्रद्धांचे बळी’ (संभ्रम); ‘वस्त्या वेश्यांच्या’ (धागे उभे आडवे); ‘बस्तरचं अरण्यरुदन’ (प्रश्न आणि प्रश्न) इत्यादी इत्यादी. या सर्वांमधून अवचट अन्यायग्रस्तांचे, पिचलेल्यांचे, नाडलेल्यांचे आणि महत्त्वाचे म्हणजे जगण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्यांचे अक्षरश: कितीतरी ‘प्रश्न आणि प्रश्न’ उपस्थित करतात.

हे सगळं वाचल्यावर आपल्यासमोर नक्कीच एक प्रश्न उभा राहतो, की अवचट हे जे मांडतायत ते आपल्याच देशातील-समाजातील आहे काय? किंवा भारतातलं, नव्हे महाराष्ट्रातलंच आहे काय? याचं उत्तर ‘होय’. आपल्याच देशाच्या व समाजाच्या या दुसऱ्या चित्राशी आपण किती अनभिज्ञ असतो हे अवचटांचे लेखन वाचल्यावर जाणवते आणि असा प्रश्न आपल्यासारख्या ‘सुरक्षित’, ‘आपल्याच कोषात असणाऱ्या’, ‘आत्ममग्न जीवन शैली’त मश्गूल असणाऱ्यांच्या मनाला पडणंही साहजिक आहे. कारण आपल्या भोवती, आपल्याच समाजात जनावराचं जीवन जगणारे कुणीतरी आहेत, दोन घासांसाठी परिस्थितीशी नाना तऱ्हेनं संघर्ष करणारे कुणीतरी आहेत किंवा एकूण समाजव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असणारं काहीतरी समाजात घडतंय, याची कानोकानी खबरही आपल्याला नसते. किंबहुना ‘जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय?’, या खुशाल व बेफिकीर वृत्तीतून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अवचटांच्या दृष्टीनं ही स्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असते आणि याच अस्वस्थतेतून ते सामाजिक बांधीलकीच्या नात्यानं तटस्थपणे या सर्व समस्यांची-प्रश्नांची उकल करू पाहतात. त्यांच्या मुळाशी जातात. प्रत्यक्ष भिडतात.

३.

‘माणूस’ हा अवचटांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि लेखनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. माणसांविषयी त्यांना कमालीची आस्थाही आहे. माणूसपणाच्या व माणुसकीच्या उत्कट ओढीतूनच ते माणसांविषयी पोटतिडिकीनं लिहितात. त्यामुळे त्यांचं लेखन जिवंत, प्रसंगी धगधगीत वाटतं. पण या धगधगीतपणामध्ये नुसत्याच ज्वाळा आहेत का? तर नाही, त्याला लालित्याची व बोलीभाषेची जोड आहे; व्यापक दृष्टी व अभ्यास आहे; परखडपणा आहे; तटस्थवृत्तीनं केलेलं विश्लेषण व मार्मिक निरीक्षण आहे. हे सर्व करताना अवचट त्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच गुंतलेले असतात - त्यात ते अडकून पडत नाहीत. त्यातूनच त्यांची म्हणून एक स्वत:ची लेखनशैली तयार झालेली आहे, जी वाचकांना तितकीच खिळवून ठेवते.

अवचटांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका हाही एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा आहे. अर्थगर्भ व सूचक भाष्य करणाऱ्या अर्पणपत्रिकेच्या ओळी मनाला स्पर्शून व खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. उदा. ‘समाजाने ज्यांना भटकंती बहाल केली त्या सर्व उपऱ्यांना अपराधी भावनेनं अर्पण’ (माणसं); ‘नशिब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरुण) भाग्यविधात्यांना... काळजीपूर्वक’ (अमेरिका); ‘गावागावांतल्या दहशतीविरुद्ध एकाकी लढणाऱ्या अप्रसिद्ध कार्यकर्त्यांना - हा थोडा हातभार’ (कोंडमारा) इत्यादी इत्यादी.

‘तेच ते’ अशा प्रकारची टीका त्यांच्या लेखनावर झाली खरी, पण एक गोष्ट मोकळ्या मनानं मान्य करावी लागते. ती म्हणजे अवचटांचं लेखन हा मराठीतील एक महत्त्वाचा सामाजिक व वाङ्मयीन दस्तऐवज आहे. त्यांच्या ‘रिपोर्ताज’नं मराठी वाङ्मयात निश्चित अशी चांगली भर घातली हे निर्विवाद.

४.

अवचट भाषणं करतात, व्याख्यानं देतात, परंतु ती रूढार्थानं भाषणं नसतात : आपुलकीनं साधलेला ‘लोकसंवाद’ असतो.

संत कबीर हा त्यांच्या मनस्वी चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे : कधी कधी ते जाहीरपणे कार्यक्रमांमधून कबीराची कवनंही गातात.

अवचट चित्रकारही आहेत : हातात कागद व पेन्सिल घेऊन पुणे विद्यापीठाच कॅम्पसमध्ये चित्रे रेखाटणत मग्न अवचटांना मी कैक वेळा पाहिलंय.

अवचट उत्तम ओरिगामी करतात : अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा इतरांची भाषणं चालू असतात, तेव्हा अवचटांचे कान त्या भाषणांकडे व डोळे हातातल्या ओरिगामी-कागदावर.

एक स्वच्छंदी, आनंदी आणि भरभरून आयुष्य जगणारा व माणसांवर उत्कट प्रेम करणारा माणूस - बहुतेकांचा ‘बाबा’ असलेला.

.............................................................................................................................................

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......