सावध ऐका पुढल्या हाका…
पडघम - गुजरात निवडणूक २०१७
देवेंद्र शिरुरकर
  • प्रेम कुमार धुमल, नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि वीरभद्र सिंग
  • Wed , 20 December 2017
  • देशकारण प्रेम कुमार धुमल Prem Kumar Dhumal नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi वीरभद्र सिंग Vikramaditya Singh

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन विधानसभांचे निकाल लागले आहेत. दोन्हीकडे प्रस्थापितांविरोधी जनमानसिकता स्पष्टपणे समोर आली आहे. गुजरातमध्ये भलेही भाजपला पगडी राखण्यात यश आले आहे, मात्र तब्बल २२ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेल्या गुजरातमध्ये प्रस्थापितविरोधी लाट थोपवण्यासाठी मोदी-शहा दुकलीला कराव्या लागलेल्या कष्टांची जाणीव भक्तांना होणार नाही.

या दोन राज्यांच्या निकालाकडे दूरदृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे. मोदी लाट कायम आहे, एवढा संकुचित अर्थ त्यातून येत नाही. प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर सत्ता मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण मिळवलेल्या सत्तेचे जनहितासाठी नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. ‘पॉवर टेंडस टू करप्ट अॅब्सोल्युट पॉवर करप्टस अॅब्सोल्युटली’ या जॉन एमरिख एडवर्ड डालबर्ग यांच्या वचनातून या दोन्ही निकालांकडे पाहावे लागेल.

निर्विवाद सत्तेतून सत्ताधाऱ्यांच्या मनात एक अहंभाव निर्माण होतो. आपण करू त्यातच जनतेचे हित सामावलेले आहे, असा एक चुकीचा गंड निर्माण होत असतो. म्हणून तर लोकशाही शासनपद्धतीत प्रभावी विरोधी पक्षाची गरज प्रतिपादित केलेली आहे. जनहिताच्या एखाद्या मुद्द्यात आपलेच दृष्टिकोन कसे योग्य आहेत, या गैरसमाजाला छेद देत त्यातील उणीवा जगजाहीर करण्याचे कर्तव्य जबाबदार विरोधी पक्षाकडून बजावले जाणे अपेक्षित असते. जनकल्याणासाठीच्या धोरणातील सत्ताधाऱ्यांची मते आणि विरोधकांनी व्यक्त केलेली मतांतरे यातून सर्वसमावेशक असा तर्क निघणे अपेक्षित असते. कर्तव्याप्रती एकांगी दृष्टिकोनाचा आग्रह, एखाद्या भूमिकेबाबतचा अट्टाहास, विकासाबद्दलच्या एकारलेल्या भूमिका यासुद्धा डालबर्थ यांच्या ‘अॅब्सोल्युट करप्शन’ या संकल्पनेत मोडतात.

मोठ्या अपेक्षेने लोकांनी सोपवलेली सत्ता त्या अपेक्षापूर्तीसाठी राबवण्यात तुम्ही फारसा रस दाखवत नसाल तर लोक तुम्हाला पर्याय शोधत असतात. गुजरातमधील जनतेला राहुल गांधी यांच्या रूपाने हा पर्याय दिसला. अन्यथा १८२ जागांपैकी १५०चे मिशन ठेवणाऱ्या रणनीतीकारांना ९९ वर समाधान मानण्याची वेळ आली नसती. कशीबशी सत्ता संपादन करता आलेल्या भाजपसाठी आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही धोक्याची घंटी आहे. एकाच वेळी सर्व समाजघटकांना समाधानी करता येणे प्रत्येकासाठी अशक्यप्राय असते हे मान्य करूनही मोदी यांनी आता आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यास हरकत नाही.

काळा पैसा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ, रोजगारनिर्मिती, नव्या भारताची उभारणी अशा मुद्द्यांचा जाहीरनामा आणि प्रत्यक्षातील वाटचाल भक्तांच्या मांदियाळीपासून दूर राहून तपासावी लागले. विमुद्रीकरण, जीएसटी, एफआरडीआय अशा वित्तीय आघाडीवरील सर्वच मुद्द्यांमधील धरसोडपणाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे २०१९पर्यंत गत साडेतीन वर्षांत केलेल्या चुका सुधारण्याची संधी गुजरातच्या जनतेने काट्यावरील सत्ता देऊन भाजपच्या पदरात पडली आहे. ही संधी वारंवार मिळेलच याची शाश्वती नसते. पुढच्या वर्षी काही निर्मायक राज्यांच्या विधानसभा आहेत. २०१९ची लोकसभा डोक्यावर आहे.

निरकुंश सत्ता मिळाल्याची हवा सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात गेली की, त्यांचा जनतेपासूनचा संपर्क कमी होतो. सर्वसामान्य जनतेनेच ती दिल्याचे वास्तव नाकारण्याएवढा उन्मत्तपणा अंगी येतो. हा उन्मत्तपणाचा फुगा गुजरातच्या जनतेने फोडला आहे. राहुल गांधी यांना ट्रोल करून, भक्तमंडळीच्या माध्यमातून टार्गेट करूनही गुजराती जनतेला ते विश्वासार्ह वाटत असतील, तर भाजपच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाल्याचे वास्तव मोदींना स्वीकारावे लागेल. अन्यथा पुन्हा जनता आपला पर्याय उभा करेल. पूर्वीचे सरकार कसे होते हे वारंवार ऐकण्यासाठी लोकांनी तुम्हाला सत्ता दिलेली नाही, हे घरच्या मतदारांनी मोदीप्रणीत भाजपला ठणकावून सांगितले आहे. रोजगारनिर्मिती करण्यात आपल्याला अपेक्षित पल्ला गाठण्यात आलेले अपयश, आर्थिक सुधारणा राबवण्यात झालेली घाई, या गोष्टीबद्दलची विनम्र कुबली देण्यातच पंतप्रधान मोदी आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे हित सामावले आहे. आकर्षक घोषणा करून गुंतवणूक वाढत नसते. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. उद्योगस्नेही कायद्याच्या आधारे नव्या प्रकल्पांना उभारी द्यावी लागते, हे पंतप्रधान मोदींना उमजायला हरकत नाही.

स्थानिक मुद्द्यांच्या सोडवणुकीमुळेच विकास झाल्याची पोचपावती खेड्यापाड्यांतील जनता देत असते. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या गोरगरिबांना, लोकलमध्ये धक्के पचवत आयुष्य काढणाऱ्या नोकरदारवर्गाला आणि हमीभावासाठी अपेक्षेने सत्ता दिलेल्या शेतकऱ्यांना तुमच्या कल्पनांचे बुडबुडे आणि बुलेट ट्रेनच्या लंब्याचौड्या बाता किती काळ आकर्षित करू शकतील? याचा आढावा उर्फ चिंतन करण्याची ही वेळ आहे. रोजगारनिर्मितीतील अपयशाची परिणती म्हणून पाटीदार, महाराष्ट्रात मराठा व अन्य राज्यांत सुशिक्षित वर्ग असंतोष व्यक्त करतो आहे. विकासाऐवजी अन्य थोतांड व कर्मकांडांना महत्त्व देण्याच्या तुमच्या मानसिकतेमुळे माणसापेक्षा तुम्हाला प्राण्यांचा कळवला जास्त वाटू लागला. म्हणून तर गुजरातमध्ये पटेल, मेवानीसारखे युवानेते यशस्वीपणे सरकारला आव्हान निर्माण करताना दिसत आहेत.

हाच संदेश हिमाचल प्रदेशातील जनतेने वीरभद्रसिंग यांना दिला आहे. निर्विवाद सत्ताधाऱ्यांना जनतेने दिलेला इशारा, राहुल गांधी यांचे प्रगल्भ राजकारण आणि संभाव्य काळात विरोधी पक्षाच्या प्रभावी सक्रियतेचे संकेत अशा विविध अर्थाने या दोन्ही राज्यांतील विधानसभा निकालाचे स्वागत करायला हवे. पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा धडा या निकालाने सत्ताधारी भाजप आणि जबाबदार विरोधी पक्ष बनणाऱ्या काँग्रेसला मिळाला आहे. अपेक्षांच्या कसोटीवर उतरण्यात अपयश आल्यावर जनता आपला पर्याय शोधू शकते, हा गुजराती जनतेने दिलेला इशारा मोदींना समजला असेल हे मात्र निश्चित आहे.

.............................................................................................................................................

हा लेख १९ डिसेंबरच्या दै. एकमतच्या संपादकीय पानावर प्रकाशित झाला आहे. पूर्वपरवानगीने पुनर्प्रकाशित.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर लातूरस्थित पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......