टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शरद पवार, संजय राऊत, मोहन भागवत आणि माते महादेवी
  • Thu , 24 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या शरद पवार Sharad Pawar संजय राऊत Sanjay Raut मोहन भागवत Mohan Bhagwat माते महादेवी Mate Mahadevi

१.  ‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक जिंकली, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत केला. निवडणुकीत भाजपचा प्रचार करणाऱ्या जैन मुनींवरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. या जैन मुनींनी जातीच्या आधारावर मतं मागितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्या राजकारणासाठी एखाद्या जैन मुनीसमोर लोटांगण घालणं, हा आचारसंहितेचा भंग आहे.

उगी उगी उगी! रूमाल आहे ना खिशात? या तथाकथित मुनीसमोर आपण लोटांगण घातलं होतं, त्याचं काय? मिराभाईंदरमध्ये अवघी ३० हजार लोकसंख्या असलेल्या जैनांनी पर्युषणकाळात आठ दिवसांची मांसाहारबंदी लादली, तेव्हा सत्तेत भागीदार असलेले शिवसेनेचे नगरसेवक चिडीचूप्प होते. कोळी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आणि मराठीजनांकडून शिवसेनेचे वाभाडे निघाले, तेव्हा ते आयत्या आंदोलनाचे नेते झाले. त्यानंतर जैन शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भेटलं आणि आम्ही जैनांच्या भावनांची कदर करतो वगैरे मखलाशा कशाला केल्या? शिवाय राजकारणात धर्माचं गदळ आणि साधू, महंत, योगी वगैरेंची वर्दळ घेऊन येण्याच्या पातकात शिवसेनाही तेवढीच मोठी भागीदार आहे, त्याचं काय?

.............................................................................................................................................

२. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आमच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नका, असा थेट इशारा या समाजाच्या नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना दिला. भागवत यांनी काही दिवसांपूर्वी हुबळीमध्ये लिंगायत समाजातील गुरूंची भेट घेऊन स्वतंत्र धर्माचा हट्ट सोडून देण्याचा अनाहूत सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कालच्या मोर्च्यात माते महादेवी यांनी भागवत यांना खडे बोल सुनावले. आम्ही भागवतांप्रमाणे पुराणकालीन मूल्यांना नव्हे, तर आधुनिक लोकशाहीच्या मूल्यांना धरून जगत आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काडीमात्र गरज नाही, असं माते महादेवी म्हणाल्या.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या धुरीणांनी या देशाची एकंदर प्रकृती लक्षात घेऊन अतिशय दूरदृष्टीने आणि विचारपूर्वक फक्त राज्यघटनेवर आधारलेलं, धर्मनिरपेक्ष, कोणत्याही धर्मावर अधिष्ठित नसलेलं, संघराज्य प्रस्थापित केलं. त्याला सुरुंग लावून या देशाचं हिंदुराष्ट्र बनवायला निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा घरचा अहेर आहे. या कालबाह्य अस्मिता गुंडाळून भारतीयत्वाच्या झेंड्याखाली पुढे कूच करण्याऐवजी हिंदुत्वाचं मर्यादित आकलन राष्ट्रीयत्व म्हणून लादण्याचा हा उद्योग देशात किती चिरफळ्या निर्माण करू शकतो, त्याचे हे अशुभ संकेत आहेत.

.............................................................................................................................................

३. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार चार दिवसांत पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं विधान माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. वेधशाळेचा अंदाज खरा ठरल्यानंतर पवारांनी कर्मचाऱ्यांसाठी बारामतीवरून साखर पाठवली. पावसानं दडी मारल्यानंतरही, चांगला पाऊस होईल, असा अंदाज मागील आठवड्यात पुणे वेधशाळेनं वर्तवला होता.

वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांनी पुरेशा सावधतेनं बारामतीची साखर स्वीकारावी आणि शक्यतो इतरांमध्ये वाटून द्यावी किंवा इतर ठिकाणच्या साखरेमध्ये थोडी थोडी मिसळूनच तिचं सेवन करावं, अशा सूचना वेधशाळेच्या वरिष्ठांनी केल्या आहेत म्हणे! ही साखर ज्याच्या तोंडात पडते, तो बारामतीकरांचीच ‘री’ ओढायला लागतो, त्यांचीच भाषा बोलायला लागतो, असा या साखरेचा लौकिक आहे म्हणतात! काय सांगावं, उद्यापासून ढगही बारामतीच्या कलानं पाऊस पाडू लागतील.

.............................................................................................................................................

४. सांगलीमधील मणेराजुरीमध्ये असलेले म.पा.सा हायस्कूल बॉम्बनं उडवू, शाळेत कोणतीही परीक्षा घ्याल तर खबरदार! अशा धमकीचं पत्र प्राचार्यांना मिळाल्यानं तातडीनं पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत हा सगळा प्रकार दोन विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

शाळेच्या परीक्षेची मुलांना धास्ती असतेच, पण ती इतकी असावी? शिवाय, शाळेत परीक्षा घेतली तर ती उडवून देऊ असं कोणतीही दहशतवादी संघटना का सांगेल? हे पत्र म्हणजे आपल्याच शाळेतल्या उपद्व्यापी पोरट्यांचा प्रताप आहे, हे शाळेतल्या एकाही शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला वाटू नये! त्यासाठी पोलिस बोलवावे लागतात?

.............................................................................................................................................

५. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठाच्या काळात दलितांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात त्यांना मंदिर प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली असून तशी नोटीसच दलितांच्या घरांवर लावण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दलितांमध्ये प्रचंड संताप पसरला असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दलितांचं अस्तित्व अशुभ मानलं जात असल्यानं गावात कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं जातं, असं या गावातील दलितांनी सांगितलं.

अरेच्च्या, आगामी हिंदुराष्ट्राचे हे दोन्ही घटक अजून हिंदू म्हणून एकवटलेले नाहीत काय? देशात, राज्यात कट्टर हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार असताना असं कसं झालं? की हिंदुराष्ट्रात शूद्रांना शिक्षणाचा, समानतेचा अधिकार नाकारला जाणार आहे पुरातन काळासारखा? हे तथाकथित पुजारी रामायणाचा पाठ पढतात, तेव्हा ते शंबुक वगैरे शूद्रांचे उल्लेख गाळतात की, प्रत्येक उल्लेखागणिक गोमूत्र प्राशन करून जीभ स्वच्छ करतात? तेवढ्या भागाचं वाचन खरंतर त्यांनी गायीच्या पार्श्वभागाखालीच बसून करायला हवं.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......