जादुई वास्तववादी शैलीतल्या अदभुत, उत्कंठावर्धक कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद थत्ते
  • ‘तथाकथित’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras तथाकथित विजय तांबे आनंद थत्ते मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

विजय तांबे यांचे ‘सहजतेच्या त्रासाची सुरवात’ आणि ‘ज्याचा त्याचा’ हे दोन कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. ‘तथाकथित’ हा त्यांचा तिसरा कथासंग्रह.

विजय तांबे हे गेली २०-२५ वर्षे सातत्याने आणि निष्ठेने कथालेखन करत आहेत. ते बहुप्रसवा लेखक नाहीत. त्यांच्या कथा चोखंदळ वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. २००७ ते २०१२ या काळातल्या पाच दीर्घकथा या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या सर्व कथा ‘नवअनुष्टुभ’, ‘मिळून आपण सारे’ आणि ‘चौफेर समाचार’ या नियतकालिकांतून पूर्वप्रसिद्ध झाल्या आहेत. 

या सर्व कथांची रचना सर्वसाधारण कथांप्रमाणेच आहे. म्हणजे आरंभ, मध्य, उत्कर्ष, कळस आणि शेवटी त्याचे यथायोग्य विसर्जन. एखाद ठिकाणी केलेला फ्लॅशबॅक तंत्राचा वापर सोडला तर कालाची गुंतागुंतीची रचना, सरमिसळ दिसून येत नाही. आणि तरीही या कथा प्रयोगशील आहेत. मग या कुठल्या पातळीवर प्रयोगशील आहेत असा प्रश्न साहजिकच पडतो.

तांबे यांच्या आधीच्या दोन्ही संग्रहांतील कथा वास्तववादी शैलीत आहेत. या संग्रहात मात्र त्यांनी त्याच्याशी फारकत घेतली आहे. ‘भीतीचा मॉल’ ही कथा सोडली तर इतर कथांमध्ये ‘जादुई वास्तववाद’ (Magical Realism) या तंत्राचा/शैलीचा वापर करण्यात आला आहे. ‘जादुई वास्तववाद’ म्हणजे काय? तर कथेत एखादी घटना किंवा कृती ही वास्तव नसते. ती त्याच्या पल्याड जाते. ती विलक्षण असते, चमत्कृतीपूर्ण असते. यातुशक्तीने भारलेली असते. कल्पक असते. पण या घटनेमुळे होणारे बदल, क्रिया-प्रतिक्रिया या वास्तवातील इतक्या बारकाव्यानिशी येतात की, तो सर्व पट वास्तव जगातील आहे असे वाचकाला वाटायला लागते. आणि त्या संपूर्ण काल्पनिक, जादुई, अदभुत, ज्ञात वास्तवाबाहेरील घटनेचा वाचक एक वास्तव घटना म्हणून स्वीकार करतो. या जादुई वास्तववादी तंत्राचा/शैलीचा वापर अतिशय प्रभावीपणे या कथांमध्ये केला आहे.

वास्तववादाने मराठी साहित्यसृष्टीत गेल्या काही दशकांत अशी एक दहशत माजवली आहे की, चांगल्या साहित्याचा ‘वास्तववादी असणे’ हा (च) जवळजवळ एकमेव निकष होऊन बसला होता. या समजुतीला या कथा जबरदस्त हादरा देतात आणि कल्पिताचे/जादुई गोष्टींचे कथनात्मक साहित्यातील महत्त्व खणखणीतपणे अधोरेखित करतात. याबद्दल विजय तांबे यांचे अभिनंदन.

या सर्वच कथांमधला आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यांची वाचनीयता. आता पुढे काय, ही ओढ लागून राहते. कथा वाचत असताना आपली उत्कंठा सतत वाढत जाते. ती एका परमोच्च बिंदूपर्यंत वाढत जाऊन अखेर विसर्जित होते. यामुळे कथांची वाचनीयता वाढते.

वर्णन, निवेदन, संवाद आणि भाष्य या निवेदनाच्या चारही पद्धतींचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. ‘उठ मुली, दार उघड’ या कथेची मागणी वर्णन या कथन प्रकाराची आहे. वर्णनात्मक कथनपद्धतीची एक मर्यादा म्हणजे ती सहजपणे पाल्हाळिक होऊ शकते.  आणि कथा रेंगाळू शकते. पण या कथेत तसे होत नाही. वर्णने जेवढी आवश्यक तेवढीच येतात. अत्यंत नेमक्या शब्दात आणि ताकदीने येतात. आणि म्हणून कथानकाच्या गतीला खीळ बसत नाही.

या कथांची कथाबीजे कशी वेगळी आहेत हे देखील पाहण्यासारखे आहे. एखादी विलक्षण न पेलवणारी विद्या एखाद्याला दान म्हणून मिळाली तर तिचे ओझे त्याला सहन होत नाही. त्या विद्येच्या विलक्षणपणामुळे, त्या असह्य भारामुळे त्याचे सगळे आयुष्यच कसे भरकटते याचे यथार्थ चित्रण ‘अखून’ या कथेत येते. ही कथा  अखेरीस इच्छा-मरणाच्या मुद्द्यापर्यंत आणून सोडते.

जारणमारण विद्या, करणी, मूठ मारणे इत्यादी काळ्या जादूच्या कृतींचा वापर  आपल्याला त्रास देणाऱ्या, आपले वाईट करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी, त्याचे नुकसान करण्यासाठी, त्याला वेदना देण्यासाठी, तळपट करण्यासाठी केला जातो हे सर्वश्रुत आहे. ‘तिठ्यावरचा तोडगा’ या कथेत एखादा सहृदयी माणूस या विद्येचा उपयोग करताना जे करतो त्याने आपण आश्चर्याने थक्क होतो. या कथेत आणखी एका तंत्राचा वापर केला आहे. कथेतला निवेदक कथा सांगता सांगता मधेच कथेची रचना, कथेचे रूप यावर भाष्य करतो. या तंत्रामुळे वाचक कथेच्या संमोहातून, त्यातल्या ताणतणावाच्या वातावरणातून बाहेर येतो आणि अलिप्तपणे विचार करू लागतो. एलिएनेशनचे तंत्र या कथेत चांगले वापरले आहे.

‘तथाकथित’ ही एक समर्थ, प्रदीर्घ रूपककथा आहे. आपल्या समाजाचा एक उभा छेद घेतला तर त्याला प्रतिरूप असे समांतर प्राणी /जंगल विश्व या कथेतउभे केले आहे. सामान्य माणूस, नेता, पुढारी होण्याची आणि सत्तेची  आकांक्षा असणारी दुसऱ्या फळीतली माणसे, कुठल्याही गोष्टीचे विक्रीयोग्य मालात रूपांतर करून पैसा कमावण्याची हाव असणारी माणसे, ही सगळी रूपे आपल्याला या कथेत बघायला मिळतात. उत्तम रीतीने रचलेली ही कथा अतिशय सूक्ष्म बारकाव्यानिशी निवेदकाने उभी केली आहे.

‘भीतीचा मॉल’ ही या संग्रहातील एकच कथा वास्तववादी शैलीत आहे. प्रत्येक बाबतीत मूल्यवर्धन (Value Addition) शोधणे, त्याचा हव्यास करणे, अगदी सामान्य बाबतीतदेखील स्वतःचे काहीतरी वेगळेपण असावे यासाठी आटापिटा करणे अशी वृत्ती मॉलसंस्कृतीने निर्माण केली आहे. त्याचे अगदी टोकाचे रूप आपल्याला या कथेत दिसते. इतके की इतर वेळी  बुद्धिवादी असणारी माणसे कुठल्या थरापर्यंत अंधश्रद्ध होतात याचे प्रभावी दर्शन या कथेत होते. अडचणी येऊन आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, भविष्यातील अनिश्चितता यांनी घाबरूनच तर माणसे अंधश्रद्ध होतात. आपले सगळे नीट व्हावे, त्रास होऊ नये यासाठी माणसे कशी टोकाची कृती करतात याचे दर्शन या कथेत होते.

‘उठ मुली , दार उघड’ या कथेचे कथाबीज गुंतागुंतीचे आहे. स्त्रीप्रधान व्यवस्थेतील पुरुषाचे वागणे पुरुषप्रधान व्यवस्थेतील पुरुषापेक्षा वेगळे असणार. त्या व्यवस्थेत ते नॉर्मल असते. पण पुरुषप्रधान संस्कृतीचे संस्कार असल्याने त्यातील पात्रांना ते समजून घेणे कठीण जाते. वाचकालाही हा धक्का आहे. स्त्रीवादी भूमिका हा कथाबीजाचा एक प्रमुख भाग आहे. अस्पर्श जंगलात माणसाने प्रवेश/अतिक्रमण करून त्याची वाताहात करू नये. पर्यावरणाचा समतोल बिघडवू नये. माणूस स्वतःच्या घमेंडीत निसर्गाला आव्हान देतो, तेव्हा निसर्ग त्याला प्रतिसाद देत नाही, पण जेव्हा ईर्ष्या नसते तेव्हा तो प्रतिसाद देतो. हा या कथाबीजाचा दुसरा महत्त्वाचा भाग. गूढरम्य निसर्गवर्णन आणि चमत्कृतीपूर्ण घटनांची रेलचेल असलेली ही कथा शेवटी ज्या वास्तवाचे भान देऊन जाते, ते फारच परिणामकारक आहे.

या कथांमधला निवेदक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो अत्यंत संवेदनशील आहे. आधुनिक विचारसरणीचा आहे. त्याचे सामाजिक भान सजग आणि तीव्र आहे. तो विज्ञानवादी आहे, तरीही त्याला अदभुताची ओढ आहे. इतकेच नव्हे तर तो अदभुतात रमणारा आहे. तो सामान्य माणसांच्या दुःखांकडे सहृदयतेने बघतो. समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल तीव्र नापसंती असलेला आहे आणि या गोष्टी तो अतिशय बारकाव्यांनिशी नोंदवतो. स्त्री-पुरुष संबंधांची जाण आधुनिक आहे. मनोव्यापारांचे सखोल आकलन आहे. कल्पित आणि वास्तव यांची बेमालूम सरमिसळ करून जादुई वास्तववादाची शैली तो अनुसरतो.

अशा तऱ्हेच्या निवेदकाची निर्मिती हे विजय तांबे यांचे योगदान आहे. असा समर्थ कथासंग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

जाता जाता : विजय तांबे यांच्याकडून आता मी (आणि सगळे वाचक) कादंबरीची अपेक्षा करतोय! त्याबद्दल आगाऊ शुभेच्छा!

तथाकथित – विजय तांबे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने - १९२ , मूल्य – २२० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3737

.............................................................................................................................................

लेखक मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......