ओ.पी. नय्यरांच्या संगीतात किशोरकुमार कुठे आहे?
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • किशोर कुमार आणि ओ. पी. नय्यर
  • Sat , 25 February 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi किशोर कुमार Kishore Kumar ओ. पी. नय्यर O. P. Nayyar मोहम्मद रफीMohammed Rafi महेंद्र कपूर Mahendra Kapoor

हिंदी चित्रपटांचं सुवर्णयुग कळसाला पोचलं, तो काळ म्हणजे १९५३ ते १९६३. या काळाची सुरुवात होते, ती ओ.पी.नय्यरच्या आगमनानं. चालीतलं माधुर्य, आत्यंतिक गोडवा यावर सी. रामचंद्र, नौशाद यांचा हक्क, पार्श्वसंगीताची\वाद्यवृंदाची श्रीमंती म्हणजे शंकर-जयकिशनची जहागीर, शास्त्रीय संगीत-लोकसंगीत-वाद्य संगीत-पाश्चिमात्य संगीत सगळ्यावर सारखीच हुकूमत हे सचिन देव बर्मन यांचं वैशिष्ट्य, पण पंजाबी ठेका, ताल म्हटलं की, आठवतात ते ओ.पी.नय्यरच! 

नय्यर यांना जाऊन दहा वर्षं उलटली. २८ जानेवारी ही त्यांनी पुण्यतिथी. त्यांच्या संगीतात लताचा आवाज नाही. या बाबतच्या दंतकथा वगळल्या तरी तशा जागाच त्यांच्या संगीतात नाहीत हे स्पष्ट दिसून येतं. पण किशोरकुमार बाबत मात्र असं नाही. नटखट, खट्याळ शैली नय्यरकडे ओतप्रोत होती. गीता, आशा यांचा आवाज यासाठी त्यांनी पुरेपूर वापरूनही घेतला. लोकसंगीतातल्या ठसक्यासाठी पंजाबी शमशाद बेगमला वापरलं. रफी तर त्यांचा लाडकाच, पण त्यांनी किशोर कुमारचा वापर अत्यंत कमी का केला? 

१९५२ ला ‘छम छमा छम’ या चित्रपटात पहिल्यांदा किशोर कुमारचा आवाज नय्यरकडे उमटला. तेव्हापासून १९७२ च्या ‘इक बार मुस्कारो दो’पर्यंत दोघांच्या चित्रपटांची संख्या जेमतेम १० इतकीच भरते. वीस वर्षांत दहा चित्रपट म्हणजे फारच थोडे. यातही नऊ चित्रपटांत स्वत: किशोर कुमारनेच नट म्हणून काम केलं आहे. म्हणजे त्याचा आवाज वापरणं आलंच. जेमतेम एकच चित्रपट निघतो, ज्यात किशोर कुमारचा केवळ पार्श्वगायक म्हणून नय्यर यांनी वापर केला आहे.

पहिल्या ‘छम छमा छम’ चित्रपटात तसं पाहिलं तर एकही विशेष गाणं नाही. ‘ये दुनिया है बाजार’ या गाण्यावर सगळी छाप शमशाद यांचीच आहे. थोडीफार संधी आशा भोसले यांना मिळाली, पण किशोरचा आवाज पार दबून गेलेला आहे.

१९५५ला आलेला ओ.पी.नय्यर आणि किशोर कुमार यांचा ‘बाप रे बाप’ मात्र धूम करून गेला. आशा भोसलेंसोबत किशोर कुमारचं ‘बिना का गीतमाला’मध्ये गाजलेलं गाणं ‘पिया पिया पिया मेरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैंया संग तुम्हारे’ हे यातलंच. जां निसार अख्तरसारख्या प्रतिभावंत कवी-गीतकाराने या चित्रपटाची गाणी लिहिली होती. नय्यर यांचा गाजलेला टांग्याचा ठेका या गाण्यात मस्त वापरला आहे. मुळात गाणंच टांग्यात आहे. किशोर कुमारच्या यॉडलिंगचाही सुयोग्य वापर आहे. याच चित्रपटात खास किशोर कुमारच्या मस्तीखोर शैलीतलं ‘एैसी शादीसे हम तो कुवारे भले’ गाणं ऐकल्यावर लक्षात येतं की, वरवरच्या नटखटपणातून जी एक आंतरिक मनाला भिडणारी सुरावट नय्यर मांडू पाहतात त्याला किशोर कुमार न्याय देऊ शकत नाही. हे संतुलन मोहम्मद रफी यांना चांगलं साधलं होतं. म्हणूनच पुरुष आवाजासाठी केवळ आणि केवळ रफीवरच नय्यर यांचा भर राहिला. किशोर कुमारशिवाय मन्ना डे, मुकेश, तलत मेहमूद यांचा वापर त्यांनी क्वचितच केला.

पुढच्याच वर्षी किशोर कुमार-मीना कुमारी यांचा ‘नया अंदाज’ हा चित्रपट आला. याला संगीत नय्यर यांचं होतं. याच वर्षी आलेल्या ‘सी.आय.डी.’ च्या गाण्याने हल्लकल्लोळ माजवला. नय्यर यांचाच ‘श्रीमती 420’ हाही रफी -गीता-आशाच्या आवाजानं बहरलेला चित्रपट. यात ‘नया अंदाज’मधील किशोर कुमारच्या आवाजातील गाणी बाजूलाच राहून गेली. ‘मेरी ख्वाबों मे तुम, मेरी निंदो मे तुम’ हे किशोर-शमशाद यांच्या आवाजातील गाणं ऐकताना स्वच्छपणे लक्षात येत राहतं की, नय्यर यांनी निव्वळ तडजोड केली आहे. रफी-आशा किंवा रफी-गीता अशा आवाजात हे गाणं विलक्षण गोड वाटलं असतं… संस्मरणीय ठरलं असतं. केवळ नटखटपणाशिवाय आवाजाची जी एक रेंज संगीतकाराला अपेक्षित असते, ती किशोर कुमारमध्ये या काळात दिसत नाही. शमशाद यांच्या आवाजाला तर मर्यादा होत्याच आणि त्या मर्यादेतच त्यांचा आवाज शोभायचा. दुसरं एक मजेदार गाणं ‘चना जोर गरम बाबू मैं लायी मजेदार’ यातच आहे. हे गाणं पुढे ‘क्रांती’ या चित्रपटातही वापरलं गेलं. केवळ शाब्दिक चमत्कृती व किशोरची मस्ती या शिवाय यात काही नाही. याच वर्षी ‘भागम भाग’ चित्रपटात नय्यर यांनी किशोर-रफी यांना सोबत गायला लावलं आहे, पण हेही गाणं काही विशेष नाही.

‘रागिणी’ हा १९५८ मध्ये आलेला अशोक कुमार यांचा चित्रपट. म्हणजे किशोर कुमारसाठी घरचा चित्रपट.  यातील ‘मन मोरा बावरा’ या गाण्यासाठी तर किशोर कुमारला चक्क मोहमद रफीचाच आवाज नय्यरनी वापरला आहे. (तब्बल ११ चित्रपटांतून किशोर कुमारसाठी इतर गायकांचा आवाज वापरण्यात आला.) शास्त्रीय संगीतावर आधारित चालीला किशोर न्याय देऊ शकणार नाही, असाच संगीतकार नय्यर आणि निर्माता अशोक कुमारचा ग्रह झाला. परिणामी पडद्यावरच्या किशोर कुमारसाठी आवाज मात्र रफीचा असं चित्र दिसतं. यातील आशा भोसले बरोबरची तिन्ही गाणी ‘पिया मैं हू पतंग, तू डोर’, ‘मुझको बार बार’ आणि ‘मैं बंगाली छोकरा’ चांगली आहेत. ‘मै बंगाली छोकरा’ तर ‘बिनाका…’ हिट गाण्यात आहे.

हे वर्षच नय्यर यांच्यासाठी सगळ्यात यशस्वी ठरलं. कारण ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ (‘फागुन’),  ‘मैं मैं कार्टून’ (‘मि.काटून एम.ए.’), ‘इट की दुक्की पान का इक्का’ (‘हावरा ब्रीज’), ‘प्यार पर बस तो नहीं’ (सोने की चिडीया) ही गाणी ‘बिनाका…’ हिट होती. शिवाय गीता दत्तचं ‘मेरा नाम है चीन चुन चु’ (‘हावरा ब्रीज’), गीता-रफीचं ‘तुम जो हुए मेरे हमसफर’ (‘12 ओ क्लॉक’ ) याच वर्षीचं. किशोर कुमार यांचं नय्यर सोबतचं एक गाणं याच वर्षी बिनाकात गाजलं. ‘सुरमा मेरा निराला, आँखो में जिसने डाला, जीवन हुआ उजाला, है कोई नजरवाला’ (‘कभी उजाला कधी अंधेरा’) अशी गंमतशीर शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची आहे. किशोरने यॉडलिंग आणि स्वरविकृती करून गाणं धमाकेदार बनवलं आहे. 

नंतर जवळपास दहा वर्षं नय्यर आणि किशोर कुमार यांनी एकत्र काम केलं नाही. पुढे एकदम १९६६ च्या ‘अकलमंद’मध्ये दोघे सोबत होते. त्यातही परत ‘ओ बेखबर तुझे क्या खबर’ या कव्वालीत किशोर कुमारसाठी महेंद्र कपूरचा आवाज वापरला आहे. किशोरच्या आवाजातील ‘ओ खुबसुरत साथी’ हे एक वेगळं गाणं नय्यरनी दिलं. पुढे ज्या पद्धतीनं किशोर कुमारची क्रेझ वाढत गेली, ज्या पद्धतीची गाणी येत गेली, त्याच्या खुणा या गाण्यात सापडतात. 

किशोर कुमारने काम केलेला आणि नय्यरचं संगीत असलेला ‘श्रीमानजी’ (१९६८) हा शेवटचा चित्रपट. यात आशा-किशोर याचं एक द्वंद गीत आहे. ‘पहलू में यार हो तो किस बात की कमी है’ यात आशा भोसलेंचा आवाज जसा नय्यरच्या संगीतात मिसळून जातो, तसा किशोरचा मिसळत नाही हे लक्षात येतं. किशोर कुमारच्या आवाजाचा नेमका पोत नय्यर लक्षात घेत नाहीत किंवा नय्यरचा बाज किशोर समजून घेत नाहीत. परिणामी एकसंध परिणाम ऐकताना जाणवत नाही, जो नय्यरच्या आशा-गीता-रफी यांच्यासोबत गाण्याचा जाणवतो.

नय्यरच्या चित्रपटात नायक नसताना किशोर कुमार गायला असा एकमेव चित्रपट म्हणजे ‘इक बार मुस्कुरा दो’. किशोरचं बऱ्यापैकी गाजलेलं गाणं ‘रूप तेरा ऐसा दर्पण में ना समाये’ यातीलच. मोहम्मद रफींचंच वाटावं असं यातील एक गाणं ‘तू औरो की क्यूं हो गयी’.  यात देव मुखर्जीचा अभिनय म्हणजे शम्मी कपूरची कॉपी आणि आवाज म्हणजे रफीची. ही चालच नय्यरची वाटत नाही. चित्रपट संगीतातील बदल नय्यरसारख्या प्रतिभावंतावर विलक्षण परिणाम करून गेलेले दिसतात. याच चित्रपटात एक अतिशय वेगळं गाणं नय्यरनी किशोरकडून गाऊन घेतलं. 

‘सबेरे का सुरज तुम्हारे लिये है, 

ये बुझते दिये को ना तुम याद करना, 

हुये एक बिती हुई बात हम तो, 

कोई आसू हमपर ना बरबाद करना’

देव मुखर्जी हे गाणं तनुजाला उद्देशून म्हणत आहे, पण मुळात नय्यर हेच सूर जणू काही हिंदी गाण्यांच्या रसिकांसाठी आळवत आहेत. कारण तेव्हा त्यांची कारकीर्द उताराला लागली होती. किशोरच्या आवाजाचा नेमका पोत त्यांच्या लक्षात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पण हा दोष नय्यर यांचा नसून किशोरचाच असावा. कारण त्यांनी नायक म्हणून स्वत:साठीच पार्श्वगायन करण्याचा अट्टाहास चालवला होता. परिणामी त्यांच्या आवाजातील विविध शक्यता आजमावून पाहणं संगीतकारांना शक्य झालं नाही.

कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला किशोरच्या आवाजावर सैगल यांचा प्रभाव होता. १९५२ च्या ‘काफिला’मध्ये हुस्नलाल भगतराम यांनी किशोर यांच्याकडून ‘वो मेरी तरफ यु चले आ रहे है’ हे किशोरच्या मूळच्या शैलीत गाऊन घेतलं आहे. ही सुरेख शैली परत सापडायला किशोरला २० वर्षं लागली. नय्यर यांचं ‘सबेरे का सुरज’ हे गाणं असंच आहे.  

आज नय्यर हयात असते तर ९० वर्षांचे झाले असते. १९५२ ते १९७२ इतकीच त्यांची खरी कारकीर्द. पुढे त्यांचे काही चित्रपट अधूनमधून १९९५ पर्यंत येत राहिले, पण कोणाच्याच लक्षात आले नाहीत. होमिओपॅथीची आपली प्रॅक्टिस करण्यात त्यांनी उर्वरित आयुष्य शांतपणे व्यतित केलं. ‘विविधभारती’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, ‘तेव्हा सारंगीवादक रामनारायण, सरोदवादक अली अकबर, सतारवादक विलायत खाँ- रईस खाँ, सनईवादक बिस्मिल्ला खाँ अशा कितीतरी प्रतिभावंत वादकांचं साह्य आम्हाला मिळालं. म्हणून आम्ही सुंदर संगीत तयार करू शकलो.’ आपण काय आणि कोणतं संगीत दिलं याची पूर्ण जाणीव नय्यर यांना होती. आपल्या संगीताच्या मर्यादाही त्यांना कळत होत्या. आपला पंजाबी ठेका, तालाचं वर्चस्व, आशा-गीता-रफी यांच्या जादुई आवाजाची करामत आठवतानाच त्यांना भारतीय वाद्य संगीतातील मोठमोठ्या प्रतिभावंतांची आठवण यावी हे विलक्षण आहे. त्यातही परत तालवाद्यांची आठवण त्यांनी काढली नाही हे विशेष. त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर येतो. त्यांनी वापरलेला टांग्याचा ठेका आधीपासून म्हणजे जवळपास १९४३ पासून कसा वापरला गेला हेही त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. दिलेल्या संगीतापेक्षा न दिलेलं संगीत फार मोठं होतं, ही खंत त्यांच्या बोलण्यातून उमटत जाते.      

a.parbhanvi@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......