शेक्सपिअरच्या नसलेल्या पात्रासाठी मानपत्र
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
महेंद्र तेरेदेसाई
  • प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Sun , 07 May 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो विल्यम शेक्सपिअर William Shakespeare विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य के. रं. शिरवाडकर K. R. Shirwadkar

२३ एप्रिल हा जगविख्यात नाटककार शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यदिनही. शेक्सपिअरचा जन्मदिन ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअरच्या नाटकातील अनेक पात्रं अजरामर झाली आहेत. त्यांचे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न जगभरचे समीक्षक करत असतात. म्हटलं तर शेक्सपिअरच्या म्हटलं तर त्याच्या नसलेल्या एका पात्राला लिहिलेलं हे मानपत्र...

……………………………………………………………………………………………

“लहानपणी तुमच्यात असलेल्या गुणांचं खूप कौतुक होतं. जस जसं तुमच्या गुणांचं चीज होऊ लागतं तसे तुमचे मित्र… तुमचा सहवास वाढू लागतो. लोक तुम्हाला जवळ करू लागतात. पुढे तुम्हाला मिळणाऱ्या यशामुळे तुम्ही अनेकांच्या नजरेत येऊ लागता. आता लोक तुमच्या जवळ येऊ लागतात. याच लोकांना बरोबर घेऊन तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुरू करता. आधी तुम्ही त्यांच्या बरोबरीनं चालता. मग हळूहळू तुमचा वेग... तुमची ताकद जशी वाढू लागते, तसे तुमच्या बरोबरीचे मागे पडू लागतात. आता ते तुम्हाला फॉलो करू लागतात. पण सगळेच नाही. त्यातले काही तुम्हाला विरोधही करतात. काहींचा विरोध खरा असतो, तर काहींचा मत्सरी. त्यातला फरक नेमका ओळखून, निंदक समोर असण्यापेक्षा शेजारी असलेला बरा या विचारानं, चांगल्या विरोधकाला निर्विष करून तुम्ही तुमच्या जवळ करता. मत्सरी विरोधकांची मात्र कोणालाच गरज नसते.

लहानपणीच्या तुमच्या गुणांमध्ये आता शतपटीनं वाढ झालेली असते. यात सत्त्व, रज आणि अगदी तामसी गुणांचीही भर पडते. (राजा होण्यासाठी या तिघांचं रसायन गरजेचं असतं). तुमचा हा प्रवास कधी ठरवून, तर कधी सवयीनं, नकळत होत राहतो.

मोठं होण्यानं हळूहळू तुमची प्रतिमा तुमच्यापेक्षा वेगळी होऊ लागते. आता तुम्ही विभागले जाता. तुमच्यात आणि तुमच्या प्रतिमेत. हाच तो काळ जिथं तुमची पूर्ण कसोटी लागते. काय जपावं? स्वतःला की स्वतःच्या प्रतिमेला? याच काळात तुमचे मत्सरी विरोधक किंवा खरे स्पर्धक कार्यरत होऊ लागतात. तुमच्या चुकांची वाट पाहात किंवा मुद्दाम तुम्हाला त्या करायला भाग पाडून तुमच्या पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो.

एव्हाना तुमच्या लक्षात आलेलं असतं की, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या फेऱ्यात आलेले आहात. सूर्याच्या (सत्तेच्या) जवळ जाण्यानं दाह वाढतो याची जाणीव तुम्हाला असते, पण तेजही वाढतं, हे सत्य तुम्हाला आवडू लागलेलं असतं. काही काळ त्या फेऱ्यात राहून सत्तेच्या जास्तीत जास्त जवळ जात राहता. तशातच सत्तेचं तेज तुमच्यावर पडत राहतं. तुम्ही उजळून निघता. हा काळ तुम्ही लांबवू पाहता. आणि तुमच्यातल्या गुणांमुळे (ज्यात तिन्ही आले.) तुमचा हा काळ तुम्ही लांबवू शकता. या काळात तुमचे विरोधक लपून बसतात, तर स्पर्धक तुमच्याशी हातमिळवणी करतात.

……………………………………………………………………………………………

शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे मराठीमध्ये अनुवाद झाले आहेत. पण त्याचं जीवनचरित्र ज्येष्ठ लेखक के. रं. शिरवाडकर यांनी ‘विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य’ या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://goo.gl/t4sXES
……………………………………………………………………………………………

तरीही तुम्हाला अनेक विरोधक आणि स्पर्धक असतातच, पण तुमच्या चाणाक्ष जगण्यामुळे तुमचे शत्रू मात्र कमी होत असतात. अजातशत्रू हे लेबल तसं फसवंच. तुम्हाला ते कधीच लागत नाही. उलट तुमचे शत्रू कोण आणि मित्र कोण, याविषयीचा लोकांच्या मनातला संभ्रम तुम्ही कायम ठेवता. तुमच्याविषयीचे किस्से, कहाण्या, वदंता, अफवा यांना आलेला पूर आणि त्यामुळे उठलेल्या वादळांना कधी तुमच्या हुशारीनं, कधी ताकदीनं तर कधी नशिबाची साथ मिळून तुम्ही परतवलेलं असतात. पण या प्रत्येक वादळानंतरचे तुम्ही फारच वेगळे असता. ही वादळं तुमच्यातली शक्ती वाढवतात हे जसं तुमच्या लक्षात येऊ लागलं, तशी काही वादळं तुम्हीच निर्माण करता. आणि शिताफीनं त्यातून बाहेर पडत तुमच्या प्रतिमेवर साचलेली धूळ साफ करता. हा, आता तुमच्यासाठी एक खेळच झालेला असतो जणू. पण खेळ असला म्हणून काय झालं! तो तुम्हाला दमवतोच. आणि एका टप्प्याला आपण मर्त्य आहोत, याची तुम्हाला जाणीवही करून देतो. आणि तुम्ही शांत पण सतर्क होता.

सत्तेच्या गुरुत्वाकर्षणाचा हा फेरा भल्याभल्यांना गरगरवून टाकतो. यासाठी तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवलेले असावे लागतात हे खरं, पण तुमचे विरोधक व स्पर्धक सतत तुमच्या पायाखालची माती खणून बाजूला करण्याच्या प्रयत्नात असतात. अनेकदा तुम्हीच त्यांना तशी संधी देता. अशा समरप्रसंगी विरोधक त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायला तुम्हाला भाग पाडतात. तसा तो ठेवून तुम्ही त्या विरोधालाच तुमचं सामर्थ्य करता. तुम्ही आणखी वर जाता. यामुळे सत्तेतला तुमचा काळ वाढतो खरा, पण तुम्ही स्थैर्य गमावता. कारण तुमचा पाय मातीत न राहता विरोधकाच्या डोक्यावर असतो. आणि विरोधक कधीच स्थिर नसतो. एव्हाना सत्तेइतकंच स्थिरतेचं तुम्हाला महत्त्व पटू लागलेलं असतं. हा काल आत्मभानाचा (introspection) असतो. आत्मभान येणं हा प्रगल्भतेचा उच्चतम बिंदू.

आयुष्याच्या शाळेतल्या फळ्यावर लिहिलेल्या सुभाषितांनी सुरू झालेला हा प्रवास, त्यातल्या भाबडेपणाच्या आणि कटू वास्तवाच्या जाणीवेपर्यंत येऊन ठेपलेला असतो. स्तुती, कौतुक, टीका, घणाघाती टीका, संशय, आरोप, वाद-संवाद, संघर्ष या सगळ्या धातूंनी तयार झालेला तुमचा ग्रह आता गुरुत्वाकर्षणाचं कवच भेदण्याच्या प्रयत्नाला लागतो. सत्ताही राहील आणि स्थैर्यही, अशी ती जागा. गुरुत्वाकर्षणा पल्याडची. आज सगळी ताकद एकवटून, गुरुत्वाकर्षणाचं कवच भेदून, आपल्याला हव्या असलेल्या जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात असलेले, तुम्ही…”

लेखक चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sandeep Shinde

Fri , 12 May 2017

Each of us struggle . What I understand and u mean is eternal stability one to achieve needs special quality tags in life? Is it not possible to achieve it without compromises as u suggest I think some clarity is required. But a good Lekh


Rohit Deo

Sun , 07 May 2017

Changla lekh


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......