जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल, हा विचार नुसता प्रतिगामीच नाही, तर उथळही आहे
ग्रंथनामा - झलक
सुरेश द्वादशीवार 
  • ‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? Sanghache Hindu rashtrache Swapna Sakar Hoil ka? अविनाश दुधे Avinash Dudhe सुरेश द्वादशीवार Suresh Dvadashivar हिंदू राष्ट्र Hindu rashtra राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS

‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’ हा लेखसंग्रह पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केला असून नुकतेच त्याचे नागपुरात प्रकाशन झाले. मीडिया वॉच पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला दै. लोकमत (नागपूर)चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

हिंदूंचा देश आणि हिंदूराष्ट्र या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. इंग्लंड हा प्रोटेस्टंटबहुल देश आहे. पण ते प्रोटेस्टंट राष्ट्र नाही. अमेरिकेबाबत, जर्मनी व फ्रान्सबाबतही ते खरे आहे. इटली व स्पेन हे कॅथलिकबहुल देश आहे. पण कॅथलिक राष्ट्रे नाहीत. हे सारे देश स्वत:ला सेक्युलर म्हणविणारे आहेत. त्यातील कायदे, धर्माच्या आदेशांचे ओझे घेत नाहीत आणि माणसांवर धर्मांची व धर्मश्रद्धेची सक्ती करीत नाहीत. जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रातील धर्मांचे चित्र असे आहे. रशिया व चीन हे देश कम्युनिस्ट विचाराच्या प्रभावाखाली असताना धर्मविरोधी होते. धर्म ही अफूची गोळी आहे, या मार्क्सच्या शिकवणीनुसार त्यांनी तेथील धर्मस्थानांना कुलुपेही लावली होती. सार्वजनिकरित्या धर्माचरण व पूजा करणे हा तेथे अपराध होता. अलिकडे त्यात काहीशी सूट लोकांना दिली गेली आहे. मात्र ते देशही स्वत:ला धर्मराज्ये न म्हणविता सेक्युलर राष्ट्र म्हणतात. सेक्युलॅरिझम हे प्रगत मूल्य आहे आणि तेच जगातील सगळ्यात नव्या व आधुनिक राष्ट्रांनी  स्वीकारले आहे. 

जॉन एफ केनेडी हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी आलेले पहिले रोमन कॅथलिक होते. क्लिंटन हे दुसरे. सर्व कॅथलिकांना रोमचे धर्मवर्चस्व व पोपची आज्ञा ही सर्वोच्च आज्ञा मानण्याची सक्ती होती. त्यामुळे घटनेचा कायदा व पोपचा आदेश यात विसंगती आल्यास केनेडी काय करतील हा प्रश्न त्यांना निवडणुकीत अनेकवार विचारला गेला. त्याला उत्तर द्यायला केनेडींनी दोन तासांची एक स्वतंत्र व प्रगट मुलाखत दूरचित्रवाणीवर दिली. त्या मुलाखतीत ‘कोणत्याही परिस्थितीत मी घटनेच्या बाजूने राहील आणि त्यासाठी पोप व रोमच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करीन’ असे आश्वासनच त्यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले. पुढल्या काळात त्यांनी ते काटेकोरपणे पाळलेही. धर्माच्या अतिरिक्त आहारी गेलेले देश व संघटनाच धर्माच्या आज्ञा शिरसावंद्य मानतात आणि त्या कालातीत व सनातन असल्याचे सांगून त्यातला बदल ते मान्य करीत नाहीत. शिख सम्राट महाराजा रणजितसिंग यांचे असे एक उदाहरण राज्यशास्त्रात सांगितले जाते. ‘मला कोणतीही राजाज्ञा काढण्याची गरज नाही, त्या साऱ्या गुरूग्रंथसाहिबात आल्या आहेत’ असे ते म्हणत. आरंभीची ज्यूंची, रोमनांची आणि इस्लामची राज्ये अशीच होती. त्यातल्या काहींचे अवशेष अजून कायम आहेत. हिंदू धर्मात सुधारणेची एक भव्य परंपरा आहे. वेदांपाठोपाठ ब्राह्मणग्रंथ, नंतर उपनिषदे, पुढे पुराणग्रंथ, बुद्ध, महावीर व चार्वाकादिकांच्या परंपरा इत्यादी. अन्य धर्मांच्या वाट्याला ते फारसे आले नाहीत. ख्रिश्चनांमध्ये पहिली प्रोटेस्टंट परंपरा त्या धर्माच्या उदयानंतर पंधराशे वर्षांनी मिळाली. इस्लाममध्ये तर पहिले सुधारक झाले मौलाना अबुल कलाम आझाद. मात्र त्यांचे कुराणभाष्य परंपरेने कधी विचारात घेतले नाही. 

त्यामुळे सगळे धर्म ग्रंथबद्ध व काहीसे हवाबंदच राहिले. त्यांच्यावर नुसतीच काळ व धूळ यांची जळमटे जमत राहिली. त्यातून काही धर्म व त्यांचे ग्रंथ समाजाच्या हातीच लागणार नाहीत अशी व्यवस्था त्यांच्या महंतांनी केली. त्यात हिंदूंचे ऋषीमुनी व मनु यांच्यासह ख्रिश्चनांचे धर्मगुरू आणि मुसलमानांचे मौलवी असे सारेच होते. ज्या धर्मांनी आपले ग्रंथ लोकांच्या हाती दिले त्यांनीही ते अर्थावाचूनच त्यांना पाठ करायला लावले. त्यामुळे ग्रंथ मुखोद्गत पण अर्थ न कळलेला अशी माणसे सगळ्याच समाजात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. वास्तविक वेद, तोराह, जुना व नवा करार आणि कुराण इत्यादी ग्रंथ वाचायला व समजायला सोपे आहेत. ते वाचणाऱ्यांना व अभ्यासकांना कळतातही. मात्र ते हाती न लागल्याने व बहुदा अनेकांपासून दूर राहिल्याने ते आदरणीय वाटत असते. नरहर कुरुंदकरांसारखा विचारवंत गंमतीने म्हणायचा, आपले धर्मग्रंथ आपल्याला कमालीचे आदरणीय वाटतात याचे एक महत्त्वाचे कारण आपण ते वाचत नाहीत हे आहे. सबंध वेदात पुरुषसुक्त महत्त्वाचे. पण तेही एखाद्या कवितेसारखे आहे. त्यात फार मोठा व गहन अर्थ दडला आहे असे म्हणणाऱ्यांनीही तो अर्थ सांगता येत नाही हे वास्तव आहे. 

कुराण ही प्रत्यक्षात पैगंबराची चरित्र कहाणी व त्याने वेळोवेळी केलेल्या उपदेशांची गाथा आहे. नव्या करारात येशूच्या चार शिष्यांनी लिहिलेले त्याचे छोटे चरित्रच तेवढे आले आहे. बाकी धर्मग्रंथही उपदेश करतात, व्रते सांगतात, नीती शिकवितात. त्यात अवघड वा न समजण्याएवढे सारखे काही नसते. उपनिषदेत गीता यांचे पठण व वाचन भाषेच्या अज्ञानामुळे वा ती न समजणारी असल्यामुळे अवघड होते. त्यांचे सरळ साधे अनुवाद कोणाच्याही आकलनात येऊ शकणारे आहेत. त्यांच्या वाटेला न जाणारी व त्यांच्या नुसतीच  पाहणारी व पूजणारी माणसे या ग्रंथांना मानवी कक्षेबाहेर व आकलनाबाहेर ठेवत असतात एवढेच यातले सत्य. 

धर्म व त्यांची शिकवण ही कोणत्याही एका वर्गासाठी नसते. ती साऱ्या जगासाठी असते. पैगंबरावर उतरलेले पवित्र कुराण केवळ क्युरेश या त्याच्या जमातीच्या उद्धारासाठीच आले नसते, ते मानवजातीच्या कल्याणसाठी आले असते. वेदातले ब्रह्म केवळ हिंदूंसाठीच वा ब्राह्मणांसाठी नसते, ते साऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी असते. ज्ञानेश्वर ‘दूरितांचे तिमीर जावो’ असे म्हणतो, ‘हिंदूंचे तिमीर जावो’ असे म्हणत नाहीत. धर्मांचे व धर्मवचनांचे हे सार्वत्रिक स्वरूप समजून घेतले की त्यांना संघटित करणारे व इतरांना त्यापासून दूर ठेवणारे लोकच त्यांना बंदिस्त करतात हे लक्षात येते. धर्मांना संघटित करणारे व इतरांना त्यांच्या झेंड्याखाली आणणारे त्याला आक्रमक स्वरूप देतात हेही मग ध्यानात येते. मुळात धर्म आक्रमक नसतो. त्याचे संघटित अनुयायी आक्रमक असतात. हिंदूधर्म आक्रमक नाही, मात्र हिंदुराष्ट्र म्हणविणाऱ्यांची संघटना आक्रमक आहे. मुळात कुराण शांतता सांगते, इस्लामी राज्याचे समर्थक मात्र त्याला जिहादी धर्म बनवून आक्रमक होतात. येशू हा तर शांतता आणि सद्भावच सांगत आला. ख्रिश्चनिटीचे संघटन मात्र सारे जग त्याच्या विचाराच्या विळख्यात अडकवायला निघाले. धर्म संघटित झाले, राज्यकर्ते झाले आणि त्यासाठी युद्धात उतरले, ते आक्रमकच नव्हे व हिंस्र होतात. मुळात हिंदूधर्म भारतात जन्माला आला, येथेच रुजला आणि वाढला. तो त्याच्या सीमेपलिकडे फारसा कुठे गेला नाही. त्याचे जे अंश बाहेर गेले ते तिकडे फारसे टिकलेही नाहीत. त्याची प्रचिती कुठे थायलंड, बाली वा अन्य पौर्वात्य देशांत राहिली, मात्र धर्माचे मूळ स्वरूप भारताच्या सीमेतच राहिले. या धर्माचे स्वरूप काहीसे समंजस, इतरांशी जुळवून घेणारे आणि बरेचसे चिवट राहिले. त्यातली जातीव्यवस्था आणि तिच्यातून आलेली धर्माची बंधने त्याचे ते स्वरूप टिकवीत राहिले. 

वेदांपासून उपनिषदांपर्यंत व पुढे पुराणांच्या काळातही हा धर्म आक्रमक झाला नाही. राजकीयदृष्ट्या तो कधी संघटितही झाला नाही. या देशात जन्मलेले बुद्ध व जैन हे धर्म प्रसाराच्या मार्गाने विदेशात गेले पण हिंदू धर्माने तेही केले नाही. कारण या धर्मात आत्मशुद्धी व आत्मशोध यावर भर असायचा. मोक्षप्राप्ती हे त्याचे ध्येय आहे. त्याचा इतरांशी संबंध नव्हे. तो स्वत:कडून स्वत:कडे जाण्याचा उपदेश आहे. शत्रू, मित्र, स्नेही, आप्त इत्यादींपासून दूर होऊन जेवढे आपल्या आत वळता येते तेवढे ते मोक्षाच्या जवळ जाणारे आहे असे त्याचे सांगणे आहे. जग त्याज्य, जीवन त्याज्य, जगणे ही अडगळ आणि त्यापासून दूर होणे ही मुक्ती असे म्हणणारा धर्म माणसाला एकाकी व एककेंद्री बनविल. त्याला संघटित करणे हाच मुळी धर्मविरोधी विचार होतो.

या पार्श्वभूमीवर माझे तरुण स्नेही अविनाश दुधे यांनी त्यांच्या ‘मीडिया वॉच’ या वार्षिकांकात प्रकाशित केलेला परिसंवाद व त्यात या अवघड विषयासंबंधी संपादित केलेले लेख वाचनीय आहेत आणि ते या पुस्तकात संकलित  केले आहेत. त्यात संघासारखा धर्म व राजकारण यांचा संयुक्त प्रचार करणाºऱ्यांचा एक वर्ग आहे तर काही वैज्ञानिक व सेक्युलर वृत्तीचे विचारवंत सहभागी झाले आहेत. त्यांच्या भूमिका टोकाच्या व परस्परविरोधी असणे स्वाभाविक आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहेच, त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही, ही त्यातल्या एका वर्गाची भूमिका. जो समाज ज्या देशात संख्येने मोठा असतो त्याच्या संस्कृती व परंपरांचे वर्चस्व त्या देशावर असते. परिणामी त्याला हिंदू राष्ट्र म्हटले काय, न म्हटले काय भारत हे हिंदू राष्ट्र आहेच अशी काहीशी ही भूमिका आहे. परंतु अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाज, स्पेन हे देश ख्रिश्चनबहुल आहेत. मात्र ते सेक्युलर आहेत. ते स्वत:ला ख्रिस्ती राष्ट्र म्हणवीत नाहीत. 

सेक्युलर असणे याचा अर्थ देशात होणाऱ्या कायद्यांवर व प्रशासकीय आदेशांवर धर्माचे वर्चस्व व त्याचा रंग असू नये हा आहे. जे मानवीय व्यवहारासाठी आवश्यक आहे आणि असावेत अशा मनुष्यकेंद्री व्यवहाराचा तो धर्म आहे. राज्य आणि धर्म या दोन स्वतंत्र व्यवस्था आहेत आणि त्यांच्यातील अंतर राखणे हे आधुनिक लोकशाहीचे खरे लक्षण आहे. धर्मांध शक्तींना सेक्युलर व्यवस्थेचे नेमके हेच स्वरूप मान्य नाहीत. त्याचमुळे त्या अतिरेकी होतात. तालिबान, खिलाफत, इसिस किंवा सनातन धर्म यासारख्या कमालीच्या कर्मठ व प्रसंगी हिंस्र होणाऱ्या संस्था त्यातून जन्म घेतात. त्यांना धर्माचे राज्यावरील वर्चस्व हवे असते. 

धर्म ही आजच्या, कालच्या व उद्याच्याही जीवनावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. तिला तिच्या नियंत्रणातून जीवनाचा कोणताही भाग वगळणे मान्य नाही. जीवनाचे धार्मिक व सेक्युलर हे विभाजनच ती अमान्य करतात. उलट सेक्युलर व्यवस्था राज्य ही वर्तमानातील मानवी जीवनाला वळण देणारी व प्रसंगी त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मानते. विचार व संघटना यांना वाहून घेतलेली माणसे वेगळा विचार मान्य करीत नाहीत. किंबहुना त्याच्यासाठी वेगळेपण अयोग्यच असते. ही एकारलेली माणसे प्रचारक, झेंडेकरी व वारकरी झाली असतात. आपल्या श्रद्धेय भूमिकांहून वेगळे बोलणे त्यांना अमान्य तर असतेच, शिवाय त्यांना ते पापही वाटत असते. त्यामुळे या बांधील माणसांच्या संघटित विचारांबाबतच्या भूमिका न वाचताही सांगता येतात. त्यांच्या सांगण्यात रंगादिकाचा थोडासा फरक असला तरी त्यांची दिशा एक असते व प्रतिपादनही बहुदा सारखेच असते. इतरांच्या भूमिकांत काही बरे असू शकेल असे त्यांना मुळातच वाटत नाही. 

भारत हा मुळात बहुधर्मी, बहुभाषी व सांस्कृतिकदृष्ट्या बहुआयामी म्हणावा असा देश आहे. यात भाषा व संस्कृतीच नव्हे तर धर्माविषयीचा उपासना पद्धतीही प्रदेशपरत्वे बदलणाऱ्या आहेत. त्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केवळ अवघडच नाही तर अशक्य कोटीतला आहे. येथे ८० टक्क्यांएवढे हिंदू राहत असले तरी त्यात १७ कोटी मुसलमान, दोन कोटी ख्रिश्चन, तेवढेच शीख, ४० लाख बुद्ध व तेवढेच जैन राहतात. एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेले शंभर देश जगात आहेत हे लक्षात घेतले की, भारतात एका धर्माचे संघटन अवघड आहे हेही लक्षात येते. त्यातून भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मुसलमान देश आहे आणि धर्माच्या नावावर त्याचे शकले याआधीही झाली आहेत. 

मूळात हिंदू हा धर्मही शेकडो जातीपातीत विभागला गेला आहे. (चातुर्वर्ण्य ही कविता आहे, हे वास्तव नाही) प्रत्यक्षात हिंदू धर्मातच एकात्मता आणणे अवघड आहे. परधर्माचा द्वेष हा अशा ऐक्याचा काहीसा सोपा मार्ग आहे मात्र तो चिरस्थायी होण्याची शक्यता फारशी नाही. झालेच तर हा देश प्रकृतीनेच मध्यममार्गी आहे. तो बुद्ध व गांधींच्या मार्गाने जाणारा आहे. प्रसंगविशेषी तो उजवा किंवा डावा कल घेतो. पण तो प्रसंग मिटला की त्याला पुन्हा आपल्या नेहमीच्या मार्गावर यावेसे वाटते. सारे संघटित कडवे असावे लागतात. त्यांना टोकाच्या भूमिका गरजेच्या असते. मध्यम मार्ग हीच त्यांची खरी अडचण असते. भारताबाबतची ही भीती त्यावर चारशे वर्ष राज्य केलेल्या मुस्लिम व दीडशे राज्य केलेल्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांना वाटत आली. आता तर देश मुक्तच आहे.

एकेकाळी ख्रिस्ती धर्म एकारला होता. तो टोकाचा ज्यू आणि इस्लामविरोधी होता. मुसलमान धर्माचेही असे एकारलेपण जगजाहीर आहे. त्या एकारलेपणाचा इतिहासही मोठा आहे. ख्रिश्चन व इस्लाम या दोन धर्मात झालेले युद्ध सातशे वर्षे चालले आणि त्यातून त्यांचे कडवेपण वाढत गेले. ज्यूंचा कर्मठपणा प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांचे अत्याचार सहन करूनही तो शिल्लक राहिला आहे. हिंदू, बौद्ध वा जैन या भारतीय धर्मांचे स्वरूप वेगळे आहे. ते मूळातच कडवे नाहीत, शस्त्रधारी नाहीत आणि आक्रमकही नाहीत. शिवाय त्यात धर्मचर्चांची व सुधारणांची परंपरा आहे. त्याचमुळे त्यात बदल घडत आले आहेत. अशा धर्मांना आक्रमक बनविण्याचा प्रयत्न करणे हाच इतिहासाचे दिवस उलट्या दिशेने नेण्याचा प्रकार आहे. संघाला भारत हे हिंदूराष्ट्र बनवायचे आहे व ती महत्त्वाकांक्षा त्याने नेहमीच उघड राखली आहे. तरीही या धर्मातला एक मोठा वर्ग धर्मांतर करून बौद्ध झाला. त्याचमुळे इतरही अनेकजण वेगवेगळ्या धर्मात गेले. हिंदूंमधील जातीयतेवर संतापलेले अनेक वर्ग तशी भाषा अजून बोलत आहेत. 

हिंदू धर्मातील जातीची अन्याय्य जातकता कमी होणे, त्यातली विषमता घालविणे, त्यात समतेची पेरणी करणे आणि त्यातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे सन्मानाधिकार प्राप्त करून देणे ही आताची खरी गरज आहे. दिवसेंदिवस व्यक्ती व समाज यांच्या विकासाची दिशा बदलत चाललेली आहे. ही आता डावी वा उजवी राहिली नाही. ती उर्ध्वगामी झालेली आहे. ही दिशा मान्य करणे व तिच्यावरील प्रवास गतीमान करणे ही काळाची मागणी आहे. त्यासाठी व्यक्ती जीवनावरून जाती व धर्माची बंधने घालविणे आणि त्या जागी लोकशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती व सर्वसमावेशकता यासारख्या आधुनिक व मानवतावादी मूल्यांची पेरणी करणे आवश्यक आहे. धर्मनिष्ठेकडून विज्ञाननिष्ठेकडे जाण्याची दिशा जगाने व काळाने स्वीकारली आहे. संघाला त्याच्या प्रयत्नात एखादेवेळी यश जवळ आल्यासारखे दिसेलही, पण कायमस्वरूपी असणार नाही. आजचा माणूस बाह्य बंधने झुगारणारा व स्वयंबधने मान्य करणारा आहे. तशीच त्याची वाटचाल आहे. जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार नुसता प्रतिगामीच नाही तर उथळही आहे. तो नव्या जाणिवांच्या व काळाच्या मानसिकतेचा विरुद्ध जाणारा आहे. विषमता हा अन्याय आहे आणि तो धर्मांनी माणसांवर लादला आहे. त्याला नवी नावे देण्यात अर्थ नाही. परंपरांहून त्याचे गोडवे गाणे हे तर तद्दन मागासलेपण आहे. 

जग आणि समाज स्वयंपूर्ण माणुसकीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याला जन्मदत्त बंधनांच्या बेड्यांपासून मोकळे करणे ही आधुनिकता आहे. ती वर्तमानाची व भविष्याची मागणी आहे. नव्या पिढ्या आणि नवी स्वप्ने यांना अडवून धरण्याची क्षमता जुन्या व वठलेल्या परंपरांमध्ये नाही. त्यांचा यथाकाळ पराभव निश्चित आहे. तो जेवढा लवकर होईल तेवढा माणूस मुक्त व समाज संपन्न होईल.

.............................................................................................................................................

‘संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का?’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4461
.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 21 July 2018

सुरेश द्वादशीवार, जग सेक्युलर बनंतंय तर बनू द्या. काही हरकत नाही. भारत मात्र हिंदूराष्ट्र झालाच पाहिजे. कारण की जगात हिंदू हा एकमेव धर्म विज्ञानाच्या विरोधात नाही. विज्ञानाशी सुसंगत असलेल्या धर्मावर राष्ट्राची पायाभरणी करायला हवीच. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......