‘‘तूर विकावी लागेल! दुसरं काही नही...’’
ग्रंथनामा - झलक
अशोक कौतिक कोळी
  • ‘रक्ताळलेल्या तुरी’चं मुखपृष्ठ
  • Fri , 29 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक रक्ताळलेल्या तुरी Raktalalelya Turi अशोक कौतिक कोळी Ashok Kautik Koli

अशोक कौतिक कोळी यांची ‘रक्ताळलेल्या तुरी’ ही नवी कादंबरी नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाली आहे. कापूस पिकवणारा एक शेतकरी शासनाच्या हमीभावामुळे तुरीचं पीक घेतो. या तुरीच्या पिकावर मुलीचं लग्न, मुलाची सायकल आणि हजार देणेकरांचं देणं असं सगळं अवलंबून असतं. या तुरीच्या विकण्यावरून एका कुटुंबाची होणारी फरपट या कादंबरीत मांडली आहे. त्यातील हा काही भाग...

.............................................................................................................................................

अशानं अशी बितली होती मुकुंदावर!

काय करावं आन् काय करू नाही, ह्याबाबतीत काही एक नव्हतं कळत त्याला. त्याला नाही की त्याच्या घरच्यांना नाही. सारेच कसे भांबरे भूत झाले होते. डोळ्यांतील आसवंही आटले होते. डोळ्यांतून आसवं नाहीत, की ओठातून शब्द नाहीत... सारंच कसं संपल्यासारखं... काही नव्हतं जगण्यासारखं... जीव तेवढ्यात तेवढा होता अडकलेला...

तेवढीच थोडीफार धुगधुगी होती. तुरीच्या गाड्यांसोबत तीही अडकलेली.. नाही तर केव्हा स्मशानात रूपांतर झालं असतं त्या घराचं.. नाही तरी घराचं घरपण नव्हतंच राहालेलं आताशा त्याच्या. गावात किंमत ठरली होती ना घरादारात त्यांना. गल्लीतील कुत्रंही हुंगत नव्हतं. जवळचे मानसं दूर गेले होते. कुणीही त्यांना जवळ घ्यायला तय्यार नव्हतं.

उसनवारी, पासनवारी सोडा- प्रेमानं कुणी बोलायला तय्यार नव्हत! गरिबी ठाण मांडून बसली होती घरात त्यांच्या म्हणून नव्हते का बोलत शेजारी? का गावभर झालेल्या कर्जाबद्दलच्या बेइज्जतीमुळे? कशानं काही कळायला मार्ग नव्हता.

सुरुवातीला कापड दुकानदारानं उचललं होतं हत्यार बेइज्जतीचं! उधारी ठेव म्हणत होता. घराच्या लक्ष्मीची इज्जत झाकायलासुद्धा साड्या नव्हत्या दिल्या त्याने. एका साडीवर सुनंदाचं दिवस काढनं सुरू होतं. फाटलेली साडी, तुटलेला संसार सांभाळून घेत होती. एक तेवढी तुरीची आशा लागलेली होती तिला. मुलीप्रमाणे वाढवलेली तूर पांग फेडेल आपले, ह्याबाबत खात्री होती तिला. जुगू-जुगू संसार होती करत.

किराणा दुकानदारानेही लगोलग नाकाबंदी करून टाकली होती. उधारीवर सामान द्यायचं बंद करून टाकलं होतं. त्या दिवसापासून बिगर तेलामिठाचा स्वयंपाक खात होते. बिगर दुधाचा चहा पीत होते. साखर, चहा संपल्यावर तोही बंद झाला होता. पुढे चालून उपाशी राहायची वेळ आली होती. एक वेळचं जेवन कसं तरी खात होते. त्यासोबत प्यायला पाणीही आता हक्काचं उरलं नव्हतं. घरपट्टी भरली नाही म्हणून ग्रामपंचायतीनं नळ बंद करून टाकला होता. डॉक्टरनं दवाखाला बंद करून टाकला होता.

अशानं अशी नाकेबंदी करून टाकली होती त्यांची. चहासाठी दूध मिळत नव्हतं की गिरणीवाला पीठ दळून देत नव्हता. एक एक करून त्यांच्या जगण्याच्या वाटा बुजवल्या जात होत्या. कोणत्याही परिस्थितीत मोकळा श्‍वास घेता येत नव्हता. त्यामुळे पुरते जेरीस आले होते. एवढे की भुकेकंगाल, शब्दकंगाल झाले होते. भावना पुरेपूर दबून गेल्या होत्या. आर्थिक, जैविक नाकेबंदीसोबतच भावनिक कोंडीही पुरेपूर झाली होती. अंगावरचे फाटलेले कपडे कुणी शिवून द्यायला तयार नव्हतं, की शेरभर दाने कोणी उगवत नव्हतं. अशानं अशामुळे पुरती कोंडी झाली होती त्यांची.

आपल्याच घरात परके झाले होते. आपल्याच गावात पोरके झाले होते. घर तर एखाद्या छावनीसारखं वाटतं होतं. छळछावनी झाली होती घराची... अंधारकोठडी वाटत होती. कोण्या जन्माचं पाप फेडत व्हते कान्नू? अंधारकोठडीत जन्मठेप झालेली होती त्यांना.

बाहेर बहिष्कार होता. तोंड दाखवायला जाग नव्हती... तर आत घरात अंधारकोठडी... वीजबिल न भरल्यामुळे घरातला वीजपुरवठा केव्हाच कट झालेला होता. त्यामुळे यातना, उपेक्षेची अंधारकोठडी अशानं असे भोगत होते.

आपल्याच घरात चोर झाले होते. आपल्याच गावात अपराधी म्हणून जगत होते. अशी कोणती शिक्षा भोगत होते? कशानं काय अपराध घडला होता त्यांच्याकडून? कशानं काही नव्हतं कळत. कोणत्या अपराधाबद्दल शिक्षा भोगतोय, याबद्दलही विचारायची सोय नव्हती. कोणाला म्हणून विचारणार होते?

काही काही नव्हतं कळत... कोन्हाला विचारायची सोय नव्हती, बाहेर तोंड दाखवायलाच जागा नव्हती, विचारणार तरी कोन्हाला व्हते? आत्ता तर प्रत्येकाची भीती वाटू लागली होती त्यांना. कुणाविषयी विश्वास नव्हता वाटत. करायला जावे काय, आन् उलटे व्हावे पायऽ! अशानं अशीच परिस्थिती होती त्यांची.

जिथे हात टाकावा, तिथून तो पोळून येत होता. हातोपायी खोड, दोन्ही डोये फोड! अशी गत झाली होती. तूर इकडून तिकडून पेरली, त्यात देनेदार असे भंडावून सोडत व्हते. घरीदारी त्यांच्या छळाने वैतागलेलं मुकुंदाचे कुटुंब...

असं वाटत व्हतं मुकुंदाले, की नाहक पेरली साली आपन्हं तूर! तूर तर पिकली पन जिवाले घोर लावून बसली. नाही पिकती तेवढं चांगलं झालं असतं. अशानं असा घोर लागला नसता जिवाले... तोंड लपवत फिरनं पडलं नसतं... आपल्याच गावात आपण अपराधी ठरलो नसतो. घराची अशी छळछावणी झाली नसती.

खरी होती मुकुंदाची गोष्ट! तो एकटाच मेटाकुटीला आला होता आसं नव्हतं. सगळं घरदार घानीमानी फिरत व्हतं. सगळ्यांनाच तो त्रास होता. धड जगताही येत नव्हतं आन् मरताही येत नव्हतं. त्यांचं एकमेकाला आधार देणं सुरू होतं. एकमेकाला जगण्याचं काम सुरू होतं. मुकुंदा लेकरंबाळं, बायको आई-वडिलांचे मन धरत होता. त्यासाठी छोटीमोठी धडपड करत होता. त्यातही म्हणावे तसे यश येत नव्हते. त्यामुळे जास्त मेल्याहून मेल्यासारखं होत होतं त्याला. कुटुंबप्रमुख म्हणून सपशेल अपयशी ठरत व्हता. त्याच्या त्या विचाराने नैराश्य वाढतच होतं मनावरचं त्याच्या. अशा अवस्थेत मुकुंदाने मान टाकू नये म्हणून सुनंदा, यशोदाबाई होत्या प्रयत्न करत. घरातले इतर सदस्यही ताण वाढवत नव्हते मनावरचा त्याच्या, प्रसंगी मन मारून जगत होते, उपासतापास सहन करत होते.

अशानं अशा वेळी नीलेश आला होता, कुठून आला होता, कसा आला होता... कळायला मार्ग नव्हता, बरोबर शेवटच्या क्षणी आला होता, तो, जणू त्याच्या हातचं शेवटचं पाणी पिण्यासाठी शेवटच्या घटिका मोजत होता मुकुंदा!

नीलेश आल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. कोणीही त्याला वाईट, वंगाळ बोललं नव्हतं, की तुच्छतेनं पाहिलं नव्हतं. क्षणात त्यांचा त्याच्याविषयीचा राग गळून पडला होता. जो तो नीलेशसाठी हात पसरू लागला होता. मनोमन याचना करू लागला होता, ‘वाचव रेऽ भोऽ आम्हालेऽ...’ यशोदाबाई बोलली होती,

‘‘पाहा रे भावू नीलेशऽ! मुकुंदा कसा झाला...’’

‘‘काय झालं? काम्हू आसा बसला रेऽ भोऽ सुतक पडल्यावानी?’’

मुकुंदा एक नाही की दोन बोलत नव्हता. डोळ्यात म्हणा का शरीरात कुठलं प्राण उरलं नव्हतं त्याच्या. मात्र एक झालं होतं. नीलेशच्या येण्याने मन बहरलं होतं त्याचं. थोडीफार हालचाल करू लागला होता. किलकिल्या डोळ्यांनी पाहू लागला होता.

तेवढ्यानं आशा जागी झाली होती. नीलेशच्या येण्याने आशेची तिरीफ डोकावली होती जणू त्या घरात, तेवढ्याने बर्‍याकरता बरं वाटलं होतं.

नीलेश कोणी परका आहे, आसं वाटलंच नव्हतं. तसा तर परका नव्हताच तो. भावकीतलाच होता त्याच्या. बांदाशेजारी बांद जमिनीचा त्यांचा. शिवाय नीलेश-मुकुंदाची मैत्री होती चांगली. मध्यंतरी काही कारणांनी दुरावा होता त्यांच्यात. आजमातर नेमक्या वेळेला नीलेश आलेला होता.

नीलेशला अशानं असा पाहून गहिवर दाटून आला होता मुकुंदाचा. त्यानिमित्ताने आसवं आली होती डोळ्यांत आन् बोलही फुटले होते,

‘‘कसं काय समजलं तुल्हे...’’

‘‘कशाचं’’

‘‘आमच्या घरात सुतक पडल्याचंऽ!’’

‘‘काही तरीच काय बोलतू हायेस मित्राऽऽ येडा झाला का तू...’’

त्यांच्यतील अशा संवादानं पुन्हा बांद फुटले. सुनंदासह यशोदाबाई रडू लागल्या होत्या. मुकुंदाच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. मुलंही भेदरून गेली होती.

सुरुवातीला फुटलेले बांद मोकळे होऊ दिले. त्यानंतर निलेश बोलला होता,

‘‘वेड्यासारखे वागू नका! वेड्यासारखे करू नका. शांत रहा आधी...’’

‘‘...................’’

‘‘काही झालं नि तुम्हाले... कशाचे सुतक पडीन...’’

‘‘काहून मंग लोक आमच्याशी अशी वागून राहाले?’’

‘‘कशे?’’

‘‘बहिष्कार टाकल्यावानी... कोन्ही आमच्याशी बोलत नाही... कोन्ही आमच्या मदतीले धावून येत नाही...’’

‘‘कोन्ही उधार द्यू नि राहालं आम्हाले गावातून... कशानं काय गुन्हा झाला बरं आमचा?’’

‘‘बरं! कर्जबाजारी आम्हीच हायती का... आमच्याच घरावर जप्ती काहून? आमचं नळ कनेक्शन कसं काय बंद झालं? आमच्याच घरात अंधार कसा काय पसरला?’’

अशानं आसं, तशानं तसंऽ! तशानं तसंच का, अशानं असंच का? अशानं असा संताप करत होते. नीलेशजवळ! आपल्या भावना मोकळ्या करत होते.

नीलेश काही कोन्ही अधिकारी व्यक्ती नव्हता. सरकारी अधिकारी नव्हता, की गावातला कोणी पदाधिकारी.... सरपंच, पोलीस पाटील वगैरे... यापैकी कोणीही नव्हता तो. तरीही त्याच्याजवळ सगळं सांगत होते. मनात साचलेलं होत फक्त.

बर्‍याच दिवसांपासून अशानं अशी कोंडी सुरू होती त्यांची. छळछावणी सुरू होती. कोणीही जवळ फिरकून नव्हतं त्यांच्या, ना त्यांना कोणी उभं करत होतं. त्यामुळे जास्तच कोंडमारा होता झालेला. त्याचा निचरा नीलेशपुढे असा होत होता.

नीलेशही ऐकून घेत होता सगळं. त्यांचं ऐकून घेण्यासाठी आला होता जणू तो. अशानं असा दाखवत होता. समझदारीनं वागत होता. एकरूप होऊन ऐकून घेत होता सगळं. एक एक शब्द साठवून घेत होता.

बोलू दिलं त्याने त्यांना सगळं... ओकू दिलं मनातलं... सगळं सगळं रितं झाल्यावर बोलला.

‘‘हे सगळं थांबू शकतंऽ! एका झटक्यात सुटका हू शकते तुमची ह्या सगळ्यांतून...’’

‘‘कशी काय त्ये?’’

‘‘काहीस नही! एका झटक्याचं काम हाये.’’

‘‘काय काम हाये, सांग तर खरं...’’

‘‘त्येवढ्यासाठीच तर आलो हाये मी!’’

अशानं अशी गुगली टाकली होती नीलेशने! आला होता कशासाठी आन काय सांगत होता. मुकुंदाला आणि त्याच्या घरच्यांना वाटलं होतं आला असेल हा सहज... काय परस्थिती आहे काय नि... सुखदुःखाच्या गोष्टी करायला... आपलं सांत्वन करायला.

तो तर देवदूत निघाला होता. खरोखरच शेवटच्या क्षणी तोंडात पाणी टाकायला आला होता. जीव वाचवायचा म्हनत होता. सगळ्या जाचातून सुटका करायचा म्हनात होता. देवदूतापेक्षा कमी नव्हती त्याची भूमिका त्यामुळे.

नीलेशच्या अशा वक्तव्यामुळे मुकुंदासह सगळ्यांचेच डोळे विस्फारल्या गेले होते. कशानं काय सांगू लागला हां? काय आहे मनात याच्या? जाणून घेत बोलला होता मुकुंदा,

‘‘कशानं काय शक्य हाये हे, सगळं?’’

‘‘सगळं शक्य हायेऽ!’’

‘‘काय... काय...?’’

‘‘तुमच्या मुलीचं लग्न ठरल्यापरमानं परमिला ताईच्या मुलासोबत होऊ शकतं...’’

‘‘कसं काय त्ये? देनेदार छाताडावर उभे आहेत आमच्या...’’

‘‘त्यांचाही बंदोबस्त होऊ शकतो!’’

हे, तर फारच अद्भुत वाटत होतं मुकुंदाला. कशानं काय सांगू राहाला हां? आपली टर उडवायला तर नाही आला? बाकीचेही घरातले संशयाने पाहू लागले. मागे एकदा याच्या नादी लागून गळफास होता घेतला मुकुंदानं. मरता मरता वाचला होता. आत्ता पुन्हा कुठला डाव खेळायला आला हां? -अशानं आसं वाटू लागलं त्यांना.

 

ताबडतोबीनं घराबाहेर घालवावसं वाटत होतं त्यांना नीलेशला. पन तसं नव्हते करू शकले. दिवस खराब आलेले होते त्यांच्यावर. पडतीचा काळ होता. पडतीचा म्हणण्यापेक्षा शेवटाचा. शवेटच्या घटका मोजन्याचं काम चाललं होतं. असा वेळेला नीलेश आलेला होता. आला तर आला दिलासा देण्याच्या गोष्टी करत होता.

मोठाच दिलासा देण्याचे शब्द फुटत होते त्याच्या तोंडून. लहान तोंडी मोठा घास तर घेत नाही ना हा? का आपली मजाक घेत असेल? अशानं असी शंका बळावनं साहजिक होती त्याच्याबद्दल. होताच तसा बेफिकीर, उडाणटप्पू तो.

आसं आसलं तरी व्यवहारी बी होता म्हना तो! वेळप्रसंग पाहून वागत होता. त्यातूनच त्याने आपला विकास साधलेला होता. आपल्या व्यवहारचातुर्याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला होता त्याने. मुकुंदाचं आकंठ बुडनं पाहवलं नव्हतं त्याच्याकडून. वाईट, वंगाळ काहीही घडू नये म्हणून सरसावलेला होता पुढे.

मुकुंदाला, त्याच्या घरादाराला मरू द्यायचं नव्हतं नीलेशला. गेल्या वर्षीची आपल्या हातून झालेली चूक सुदरवायची ही संधी चालून आली होती त्याला. ही संधी त्याला अर्थातच एका व्यक्तीने उपलब्ध करून दिलेली होती. त्याच्या संमतीनेच तो मुकुंदाच्या घरी आलेला होता. सर्व जाचातून सुटका करू इच्छित होता त्याची.

तशानं तसा प्रस्ताव त्याने शिंदे कुटुंबीयांसमोर ठेवला होता. त्याच्या अशा प्रस्तावानं डोळे दिपून जाणं साहजिक होतं त्यांचं. शंका, कुशंका, नाना प्रश्नांचं मोहळ उठणं साहजिक होतं. तशान तसे हबकून गेले होते, दबून गेलेले होते. दबलेल्या अवस्थेमुळेच ऐकून घ्यावं लागत होतं त्यांना. नीलेश पुढे सांगत होता,

“हे पहा ऽ! सगळं व्यवस्थित होईल... तुमच्या मनासारखं सगळं...लोकं बी बोलतील तुमच्याशी आन लग्न बी धूमधडाक्यात होईल.”

“उधरी, देनेदारांचं काय?”

“त्येच्हा बंदोबस्त ताबडतोबीनं व्हईन! कोन्ही सायबडा म्हना का बांडाभुरका- मास्तरडा फिरकणार नि तुमव्ह्या दारापुढी...उधारी मांध्याले नही की कर्जवसुलीसाठी नही...”

“.........”

“कोन्ही फिरकणारच नही तुमव्ह्या घराकडी. कोन्ही वाकडा नजरनं पाहाणार नही. कोन्हाचा बहिष्कार म्हना का काही राहणार नाही...”

“.........”

“पयल्ह्यासारखं जाते टवटवीत टमाट्यासारखे हून जासान तुम्ही...निराशा म्हना का अपमान, आसपास भटकणार नही तुमच्या... पहिल्यासारखं गुबगुबीत गोबीसारखं हून जाईन घर तुमचं...’’

‘‘कशानं काय व्हनार हाये पण हा बदल? कोण करणार हाये?’’

‘‘तूर तुमची!’’

‘‘ते तं रांगेत लावलेली हाये. सरकारी तूर खरेदी केंद्रावर. नंबर लागून तूर विकली की करणार आहोत आम्ही यातल्या काही गोष्टी...’’

‘‘काही म्हणजे कोणत्या?’’

- यावर उत्तर कुठे होतं मुकुंदाजवळ! तूर सरकारी खरेदी केंद्रावर उभी होती, ही गोष्ट खरी होती. मात्र त्यातून मिळणार्‍या पैशांतून काय काम करावं? हा मुकुंदासमोरचा मोठा गहन प्रश्‍न होता. मुलीचं लग्न करावं का देनेदारांची देनी द्यावी? अशानं अशा तिठ्यावर तो उभा होता. सगळं कुटुंब त्याच्या झळा सोसत होतं, होरपळून निघत होतं. नेमका असा अवघड, जीवघेणा प्रसंग सोडविण्याचा प्रस्ताव नीलेशने ठेवलेला होता.

नीलेशच्या अशा वागण्या-बोलण्याचा अचंबा वाटत होता त्यांना आणि अप्रूपही वाटत होतं. तो पुढे बोलला होता,

‘‘माझं कधी आयकलं तुम्हीनं तर सगळे प्रश्‍न सुटता तुमचे...’’

‘‘नाही आयकलं तर?’’

‘‘गुंता आझून वाढत जाणार आहे. तुमच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच आवळला जाणार आहे.’’

‘‘..................’’

‘‘काय करावं लागेल आम्हाला यातून सुटण्यासाठी?’’

‘‘तूर विकावी लागेल! दुसरं काही नही...’’

‘‘त्ये तर करतोच आहे आम्ही... तूर, सरकारी केंद्रावर उभी आहे आमची...’’

‘‘हेच तर चूक झाली तुमचीऽ!’’

‘‘नुस्ती देनेदारांची रीघ नही, चहूबाजूनं कोंडी केल्या गेली तुमची...’’

‘‘म्हणजे उधारीवाले, बँकवाले, तलाठी, ग्रामसेवक, दुकानदार, डाक्टर, दवाखाना, गिरणीवाला, वायरमन...’’

‘‘तुमचा मावसभावू शांताराम मास्तरसुद्धाऽ!’’

‘‘एवढे सम्दे कशे काय तुटून पडले आमच्या घरावर?’’

‘‘तुरीमुळे!’’

‘‘तुरीमुळे कशे काय?’’

नीलेश सारखा कोड्यात बोलत होता. बोलत होता का मजाक करत होता? कशानं काही कळत नव्हतं त्याचं. एक मात्र होतं, त्याच्या बोलण्यातून तळमळ दिसून येत होती. विश्‍वास ठेवा माझ्यावर... आत्ता फसविणार नाही मी तुम्हाला... असा भाव डोळ्यांतून पाझरत होता त्याच्या!

शिवाय दुसरा कुठला पर्यायही नव्हता दिसत मुकुंदासमोर... एकमेव तुरीची आवक होती... तूर बाजारात उभी होती... आन् तिच्याविषयी नीलेश घरी सांगत होता,

‘‘तूर बाजारात नेवून चूक केली तुम्हीनंऽ!’’

‘‘यात कसली चूक? सरकारी खरेदी केंद्रावर तूर नेण्यात कसली चूक?’’

‘‘हांऽ! चूक झाली तुमची...’’

‘‘काय कर्‍याले पायझे व्हतं मंग?’’

‘‘बंडूशेठले विकून टाकायला पायझे व्हती तूर!’’

‘‘का?’’

‘‘एवढ्या यातना, उपासमार, अपमान, अवहेलना, कुचंबना, बहिष्कार-काहीही भोगावलं लागलं नसतं तुम्हाला...’’

‘‘म्हणजे ह्या सगळ्यामागे बंडूशेठ व्हता?’’

‘‘व्हता नि; हाये!’’

‘‘कसा काय?’’

‘‘तुम्हीनं बंडूशेठच्या साम्राज्याले तडा देण्याचा प्रयत्न केला. उधारीवर बी-बियानं, खत मटरेल घेतलं नाही त्याच्याकडून आन् मालही त्याला विकला नाही. म्हणून त्याचं पित्त खवळलं.’’

‘‘मीन्हं काय केल्हं पन त्येचं वाईट?’’

‘‘दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न केला न्!’’

‘‘......................’’

अशानं आसं समजल्यावर आझूनच हापकून गेला मुकुंदा...

कशानं काय करावं आन् काय नाही...आत्ताच्या आत्ता जमिनीने वाट मोकळी करून द्यावी आपल्याला... आन त्यात अंतर्धान पावावे... नाही तर घर तरी कोसळून जावे आंगावर आपल्या...

अशानं आसं वाटू लागलं त्याला... आत, पुन्हा आत, खचून जावू लागला... आपलेच हातपाय आतमध्ये खेचून घेत, गोगलगायसारखा आपल्याच कोशात निघून गेला.

.............................................................................................................................................

रक्ताळलेल्या तुरी - अशोक कौतिक कोळी,

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4436

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......