समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं
ग्रंथनामा - झलक
नलेश पाटील
  • निसर्गकवी नलेश पाटील यांच्या ‘हिरवं भान’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 June 2018
  • ग्रंथनामा झलक नलेश पाटील Nalesh Patil हिरवं भान Hiravan Bhan

कविता आणि जाहिरात अशा दोन्ही सर्जनशील क्षेत्रांत सहजतेनं वावरणारे कवी नलेश पाटील यांच्या कवितांची भुरळ रसिक मनावर कायमच राहिली. शब्दांची, त्यांतील अर्थाची, नादाची, लयीची, उत्तम जाण, चित्रमय मांडणी ही नलेश पाटील यांच्या कवितेची वैशिष्ट्यं. ‘कवितांच्या गावा जावे’ या जाहीर कार्यक्रमातून त्यांची कविता रसिकांपर्यंत पोहोचली, लोकप्रिय झाली. मात्र त्या कविता पुस्तकरूपानं उपलब्ध नाहीत याची खंत त्यांच्या चाहत्यांना सदैव वाटत होती. काल मुंबईत त्यांच्या कविता पुस्तकरूपानं पॉप्युलर प्रकाशनातर्फे ‘हिरवं भान’ या नावानं प्रकाशित झाल्या आहेत. या संग्रहाला नलेश पाटील यांनी लिहिलेलं हे मनोगत.

.............................................................................................................................................

समुद्रकिनाऱ्याला वसलेल्या ‘अक्करपट्टी’ या निसर्गरम्य अशा खेड्याचे माझ्या मनावर, जडणघडणीवर व माझ्या कवितेवर खोलवर परिणाम झाले.

सटवाईने किंवा नियतीने म्हणा हवं तर, ललाटी निसर्गाच्या जबरदस्त आकर्षणाचे लेख लिहून जन्माला घातल्यामुळेच कदाचित, या रानोमाळी भटकताना त्यातले मनोहारी विभ्रम मनाच्या खोल पटलावर गोंदले गेले. म्हणून ‘चित्रकार’ व ‘कवी’ होण्याचं भाग्य मला लाभलं, नव्हे तर ते क्रमप्राप्तच होऊन गेलं नि त्यामुळेच माझ्यातला चित्रकार कवी म्हणतो,

फुलास जिथे फुलता येते

अन् पाखरास नाचता येते,

ते झाडच माझे पुस्तक आहे

ज्याचे पान अन् पान वाचता येते.

कवितेशी निवांत गुज करताना तेजाचा एक नितळ प्रवाह आपल्याशी आतून सोबत करत असल्याची सतत जाणीव होत असते. तिच्या पवित्र डोहात डुबकी घेताना आपणही एक तेजाचाच लोळ होऊन जातो आणि त्यात विलीन होत असंख्य फांद्या फुटून, उजेडाचा महाकार वृक्ष होऊन सळसळू लागतो. सूर्यपाखरांचा थवा मग किरणांच्या काड्यांची घरटी त्यावर विणू लागतो अन् अवघा वृक्ष आनंदाने सोन्याचं गाणं गात डोलू लागतो.

असो, हे झालं माझ्यापुरतं, पण सर्वसामान्यपणे कवितेचं चिंतन करताना असं वाटतं की, कविता ही निश्चितपणे स्वान्तसुखाय, मनाला अस्वस्थ करत जगण्याची एक गूढ, परंतु तितकीच आकर्षक अशी अनुभूती देत जन्माला येते.

एखादं बीज जेव्हा अंकुरतं, तेव्हा वर कोंभ व खाली मूळ धरण्यापूर्वीचं द्विदल बीज हे डोळ्यांसमोर आणलं तर त्याचं दृश्र स्वरूप हे उदगार- चिन्हासारखं वाटतं; किंबहुना तो निसर्गाचा उदगारच वाटतो, तद्वतच कवितेचंही आहे.

अंतःस्थ ध्यानावस्थेतील तंद्रीत कवितेचा जन्म हा त्या उदगारासारखाच असतो. प्रसूतीचा क्षण, सर्जनाच्या वेदनेचा परमोच्च असा हा बिंदू एका तरल तरतरीत नवजात विचाराला कवितेतून प्रकट करतो. असे क्षण व त्याची सतत नशा चढल्यागत ध्यास असणे, हेच कवीचं जगणं व हीच त्याच्या कवितेची निर्मळ पारदर्शक भूमिका असं माझं प्रामाणिक मत आहे.

‘आर एम अ पोएट, लिसन टु मी !’, ‘हा माझा आवाज आहे, ही माझी कविता आहे, तिला माझा चेहरा आहे’ इतकं ठणकावून सांगण्याइतपत ती कविता त्या कवीशी नातं सांगणारी हवी. अस्सल मातीतली, कसलेली, नकलेच्या जवळपासही न फिरकणारी अशीच कविता मी सदैव देईन, अशा दृढनिश्चयाने कवीनं आपला पुढील प्रवास चालू ठेवावा, असं मला वाटतं.

कवितेच्या तळमळीनं सर्जनाच्या ऊर्जेनं व्यापक होत जाताना कवीची घालमेल होते, कस लागतो व शेवटी ऐरणीवर त्याची सांगता होते. तिचा आस्वाद घेताना, ती किती खोलवर भिडतेय, भंडावून सोडतेय, निखळ आनंद देतेय, अस्वस्थ करतेय की अंतर्मुख करते याचाच विचार व्हावा आणि म्हणूनच ती चांगली किंवा वाईट या दोनच निकषांवर दाद देऊन तिचा आस्वाद घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. कारण कविता ही समीक्षातीत आहे असं मला नेहमीच वाटत आलंय.

या हिरव्या वस्तीमधले हे प्राणवायूचे घर,

मज इथे निवारा मिळतो, अन इथेच हिरवा सूर...

माझ्या हातांच्या रेषा, पानांत उमटल्या कशा

पानातून कुठे निघाल्या त्या शोधीत हिरव्या दिशा?

हातावरूनी पानी, पानावरूनी दूर

मज इथे निवारा मिळतो, अन इथेच हिरवा सूर...

समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला ‘त्या’ अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं हीच माझी भूमिका, हेच माझं मनोगत व हेच माझं व्रत.

आपल्या ओंजळीत ही आकाशगंगा सोपवताना मला विशेष आनंद होत आहे.

.............................................................................................................................................

या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4430

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dust Golden

Fri , 22 June 2018

*


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......