साडेमाडे नेमाडे
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
संपादक अक्षरनामा
  • भालचंद्र नेमाडे
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April Bhatchandra Nemade

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

काही महिन्यांपूर्वी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य अकादमी या राष्ट्रीय पातळीवरील साहित्यसंस्थेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या काहींना असुरी आनंद झाला. त्यांनी आपल्या भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खाजगीत, प्रसारमाध्यमांकडे आणि सोशल मीडियावर व्यक्त केल्या. त्या पार्श्वभूमीवर नेमांड्यांविषयी...

.............................................................................................................................................

मराठीच्या अभिजाततेची चर्चा चालू असताना आणि त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने साहित्य अकादमीकडे पाठवलेला असतानाच २०१५ साली डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, ‘विशाखा’कार कुसुमाग्रज आणि यंत्रयुगाचा पुरस्कार करणारे विंदा करंदीकर या त्रिमूर्तीनंतर नेमाडे यांना ज्ञानपीठ या भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे अतिशय उचित झाले. नेमाडे यांच्यामुळे मराठीतील ज्ञानपीठ त्रिकोनाला चौथा कोन मिळून तो समभूज कोनात बदलला.

नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्याविषयी आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. सलमान रश्दी यांनी ‘ग्रम्पी ओल्ड बास्टर्ड’ असा उल्लेख करत नेमाडे यांच्याबद्दल ट्विट केले आणि वादंगाला तोंड फुटले. गंभीर मुद्दा होता\आहे तो नेमाडे यांच्याविषयी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यावर तेव्हापासून सुरू असलेल्या चर्चेचा. त्यावरून नेमाडे हे अनेकांचे प्रात:स्मरणीय तिरस्काराचा विषय आहेत, हे सिद्ध होते.

वारेमाप पूर्वग्रह आणि अनेकांच्या द्वेषाचे धनी असलेले नेमाडे हे मराठी साहित्यात तरी एकमेव असावेत. ही गोष्ट खरी आहे की, नेमाडे आपल्या फटकळ बोलण्याने अनेक मराठी साहित्य-सारस्वतांचा अहम् सतत दुखावत असतात. ‘कथा हा वाङ्मयप्रकार नाही’, ‘साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे’, अशा शेरेबाजीने ते मराठी साहित्य शारदेच्या अंगणात अधूनमधून बॉम्बस्फोट करत असतात. लेखक म्हणून आपले दुकान बंद होण्याची भीती नेमाडे यांना नसली तरी मराठीतल्या बहुतांश साहित्यिकांना असते. त्यामुळे त्यांच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्यांना नेमाडे पचनी पडत नाहीत.

नेमाडे यांच्याविषयी साहित्याच्या आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे, ती याचमुळे. यातून वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष याच गोष्टी नेमाडे यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. अलीकडच्या काळात त्यांना अजून जोर आला आहे. ‘नेमाडेपंथी दहशतवाद’, ‘नेमाडे यांचाही लेखकराव झाला’ यासारखी टीका तर त्यांच्यावर वीस-पंचवीस वर्षांपासूनच केली जात आहे. त्यातून त्यांच्या कादंबऱ्याही सुटलेल्या नाहीत.

२०१० साली नेमाडे यांची ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीची यथायोग्य आणि यथाशक्ती समीक्षा करण्यात कुणालाही यश आलेले नाही. नेमाडे यांच्या नावाचीच कावीळ झालेली असल्याने ते शक्यही नाही.

‘हिंदू’ या भारतीय जनमानसाला व्यापून टाकणाऱ्या संकल्पनेची पुनर्तपासणी करून तिची पुनर्मांडणी करणाऱ्या ‘हिंदू’ चतुष्ट्यमध्ये नेमाडे यांनी जो व्यापक पट उभा केला आहे, तो केवळ आणि निव्वळ स्तिमित करणारा आहे. पण हिंदूकडे आपली वैयक्तिक मते, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकेल असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. ‘‘‘हिंदू’ धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला विविध अंगांनी भिडणाऱ्या आणि अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल’’, असे लोकव्यवहाराचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणतात.

धर्म नावाच्या गोष्टीला थेटपणे भिडणारी ही कादंबरी भारतीय समाजजीवनातील स्त्रीशोषणाच्याही अनंत पैलूंचा वेध घेते. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांचे शोषण एकाच वेळी किती पातळ्यांवर होते, याविषयी आजवर एकाच काय पण सर्व ग्रामीण साहित्यिकांना सांगता आले नाही, ते नेमाडे यांनी ‘हिंदू’च्या पहिल्याच भागात नेमकेपणाने सांगून टाकले आहे. पण ते समजून न घेता ‘हिंदू’ला स्त्रीविरोधी, दलितविरोधी ठरवण्यात काहींनी आघाडी घेतली आहे. नेमाडे यांना ठोकूनच काढायचे एवढाच एककलमी कार्यक्रम राबवायचे ठरवल्यानंतर यापेक्षा वेगळे काही घडूही शकत नाही.

‘हिंदू’चे तीन भाग अजून प्रकाशित व्हायचे आहेत. पण पहिल्याच भागाने त्यांना ज्ञानपीठाचा  दावेदार केले होते. त्यानुसारच हे घडले असल्यामुळे नेमाडे यांना मिळालेला पुरस्कार ही अजिबात अनपेक्षित किंवा धक्कादायक बातमी नव्हती. पण तसे मराठी साहित्यातील धुरंधर किती मनमोकळेपणाने मान्य करतील तर ना! ‘सतत वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे आहेत नेमाडे’ असे ‘लेबल’कार ‘नेमाडे यांनी हा पुरस्कार दिल्लीत लॉबिंग करून मिळवला आहे’, असा आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.

‘कोसला’ या सलग तीन पिढ्यांमध्ये प्रभाव टिकून असलेल्या कादंबरीने नेमाडे यांना ‘विसाव्या शतकाला सर्वोत्कृष्ट कादंबरीकार’ असा बहुमान दिला. ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केलेल्या नेमाडे यांनी कादंबरी या वाङ्मयप्रकाराचीही समीक्षा केली आहे, मोजक्याच पण वेगळ्या कविताही लिहिल्या आहेत. त्यांनी ‘देशीवादा’ची मांडणी केली, तशीच साहित्य अकादमीसारख्या संस्थेत सक्रिय राहून संस्थात्मक कामही केले आहे.

चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत, यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आणि त्यांच्या इतर लेखनाने तशी सोय करूनच ठेवली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या, त्यांना प्रमाण मानणाऱ्या ‘नेमाडेपंथीय’ नावाच्या लेखकांच्या दोन पिढ्या मराठी साहित्यात काही चांगले पायंडे पाडू पाहात आहेत.

खरे म्हणजे नेमाडे यांची चिकित्सा त्यांच्या लेखनावरून केली जायला हवी. पण त्याविषयी न बोलता त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले म्हणजे मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि गदारोळ उडतो. तोच उडवून देण्यात सध्या अनेकजण धन्यता मानत आहेत. पण त्यांची ही बोंबाबोंब अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. या साऱ्या प्रकारावर नेमाडे नेहमीप्रमाणे शांत राहत आले आहेत. आणि हेच या टीकाखोरांच्या पोटशूळामागचे खरे कारण आहे. नेमाडेविरुद्धच्या बोंबाबोंब आंदोलनामुळे नेमाडे यांचे साहित्यातील योगदान आणि ‘हिंदू’ची यथोयोग्य समीक्षा या गोष्टी बाजूला पडल्या आहेत.

वैयक्तिक दुगाण्या झाडायला अभ्यासाची, व्यासंगाची गरज नसते. ते सप्रमाण सिद्ध करायला मात्र कष्ट करावे लागतात. तो न करता सारमेय संप्रदायाचा कित्ता गिरवणे हा सोपा पर्याय असतो. त्यातून आपला आवाज मोठा होता असला तरी ते स्वत:चेच चारित्र्यहनन करण्यासारखे असते. नेमाडे यांच्या विरोधकांकडे नेमक्या याच तारतम्याची वाणवा आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ranveer bhalepatil

Wed , 07 November 2018


vishal pawar

Sat , 05 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......