‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) बंद करावं लागतंय…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुनील-माधव गाडगीळ
  • पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरील, मॉडर्न कॅफे चौकातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’
  • Fri , 09 March 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो पॉप्युलर बुक हाऊस Popular Book House

‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’, ‘अभिनव पुस्तक मंदिर’ ही पुण्यातली फर्ग्युसन रोडवरील पुस्तकांची दुकानं गेल्या काही वर्षांत बंद झाली. गेल्या वर्षी ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद झालं. आता मॉडर्न कॅफे चौकातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होतंय. हे दुकान बंद करताना त्याचे मालक असलेल्या सुनील-माधव गाडगीळ यांनी प्रसिद्धीसाठी दिलेलं निवेदन जसंच्या तसं...

.............................................................................................................................................

गेली ६४ वर्षं आपल्यासारख्या शेकडो पुस्तक प्रेमींचं, आप्तमित्रांचं, लेखक, प्राचार्य, ग्रंथपाल, हितचिंतक, अनेक मान्यताप्राप्त संस्था, व्यावसायिक बंधू आणि आमचा आजी-माजी स्टाफ यांचं प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही हा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवू शकलो.

या व्यवसायानं आम्हाला एक ओळख दिली... एक आयडेंटिटी... अनेक मान्यवरांचे पाय आमच्या उंबऱ्याला लागले ते यामुळेच. यात लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी असे दिगग्ज होते. त्यातील बऱ्याच जणांशी आमची चांगली मैत्री झाली, जी टिकून आहे. त्यांनी व पुस्तकप्रेमींनी आमचं कायमच कौतुक केलं. देशी-विदेशी वाचक पुण्यात आले की, मुद्दाम आमच्याकडे येऊन जात... तीन-चार पिढ्यांशी आम्ही जोडलो गेलो होतो.

पुस्तकांबरोबरच काळानुरूप आम्ही कायमच वेगवेगळे प्रयोग केले... कॉम्पुटर, मॅनेजमेंट, हिंदी या विषयांची पुस्तकं वाचकांसमोर आणणारं बहुतेक आमचं दुकान पहिलं होतं... सीडी, व्हीसीडी,  डीव्हीडी, ऑडिओ बुक, किंडल, पेन ड्राईव्ह, सारेगामा कारव्हाची विक्री आम्ही ग्राहकांसाठी सुरू केली. 

पुण्यातील पहिलं एसी, तसंच व्यवहारात कॉम्पुटरचा पहिल्यांदाच वापर ही आमची आणखी काही वैशिष्ट्यं.

काही प्रकाशक संस्थांच्या नवीन पुस्तकांचं प्रकाशन आमच्या इथं झालं. अनेक पुस्तक प्रदर्शनांत आमचा सहभाग असायचा. आमचे ‘दिवाळी धमाका सेल’, ‘न्यू इयर सेल’, ‘वन डे सेल’ हेही खूप लोकप्रिय होते. वाचकांसाठी ती पर्वणीच असायची.

पहिलं ऑनलाईन बुक स्टोअर आम्ही सुरू केलं होतं, पण ते काळाच्या फार आधी सुरू केलं असं मागे बघताना आता जाणवतं... त्यात आम्हाला सपशेल अपयश आलं.

जगप्रसिद्ध ‘टाईम’, ‘न्यूजवीक’ या साप्ताहिकांचे आम्ही पुण्यासाठी अनेक वर्षं मुख्य वितरक होतो. दर आठवड्याला शेकडो ‘टाईम’ आणि ‘न्यूजवीक’ आम्ही संपूर्ण पुण्यात वाटायचो... ‘नॅशनल जिओग्राफिक’चं देखील असंच.

सांगण्यास अभिमान वाटतो की, जितकी वर्षं ही वितरणाची व्यवस्था आमच्याकडे होती, त्या सबंध कालावधीत एकदाही खंड पडला नाही.

नवीन तंत्रज्ञान आम्ही कायमच वापरात आणलं. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ई-मेल याचा वापर भरपूर केला. त्याजोगे आम्ही आमच्या ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ या व्हॉट्सअॅप ग्रुपनं अनेक मित्र दिले. या ग्रुपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

व्यवसायात राहूनदेखील आम्ही कधी कोणाशी ‘स्पर्धा’ केली नाही. ग्राहक कायम खूष आणि संतुष्ट कसे राहतील याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं.

पण ....

परिस्थिती बदलली... आवड बदलली, प्रायोरिटीज बदलल्या आणि एक वेळ अशी आली की, ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद करावं लागणार या कटू सत्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही मनाची तयारी केली…

‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) लवकरच आपला निरोप घेईल.

चौसष्ट वर्षं... इतका प्रदीर्घ काळ, आमचं या व्यवसायाशी नातं होतं, पुस्तकं हेच आमचं जग होतं... ते तुटणार म्हणून खंत आहे... दुःख आहे...

‘पॉप्युलर बुक हाऊस’ला दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत...आणि राहू…

त्याच जागेत लवकरच एका नव्या रूपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत. या नव्या ‘व्हेंचर’ला आपला पाठिंबा मिळणार याची खात्री आहेच....

धन्यवाद

आपले

सुनील गाडगीळ - माधव गाडगीळ

.............................................................................................................................................

लेखक सुनील गाडगीळ व माधव गाडगीळ हे पॉप्युलर बुक हाऊसचे मालक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......