असा सापडला फास्टर फेणे!
ग्रंथनामा - झलक
लिलावती भागवत
  • फास्टर फेणे पुस्तक संच
  • Fri , 03 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक फास्टर फेणे Faster Fene भा. रा. भागवत B. R. Bhagwat

फास्टर फेणे हा अनेक मुलांचा लाडक साहसवीर. भा. रा. भागवत यांनी वीस पुस्तकांच्या माध्यमातून फास्टर फेणे आबालवृद्धापर्यंत पोचवला. नुकताच त्यावर चित्रपट आला असून तोही लोकप्रिय होतो आहे. त्यानिमित्ताने फास्टर फेणेच्या पुस्तक संचाची मागणी वाढते आहे. या पाश्वभूमीवर फा.फे. कसा जन्मला, त्याचं बारसं झालं, याविषयी लिलावती भागवत यांनी सांगितलेली कथा.

.............................................................................................................................................

१.

मला पुष्कळदा लोक विचारतात, “अहो, भागवतांना फास्टर फेणे कसा सुचला? असा कुणी मुलगा होता का? की एकदम कल्पनेतच त्यांनी बघितला?”

आणि मग तो कसा सुचला याचं उत्तर मला सापडलं. बरेच दिवस त्यांच्या मनात घोळणारा हा पोरगा त्यांना प्रत्यक्ष एक दिवस त्याची चुणूक दाखवून गेला.

आम्ही मुंबईला गिरगावात एका चाळीत राहात होतो. त्या वेळी एकदा ‘जगबुडी’ची अफवा पसरली होती. आमचा धाकटा मुलगा चंदर, त्याची घरातून बाहेर, बाहेरून घरात धावपळ चालू होती. काहीबाही वस्तू घेऊन जात-येत होता. आम्ही गॅलरीत त्याच्या मित्रांची काही तरी गडबड बघितली आणि गॅलरीत गेलो. तर, चंदर आणि त्याची चार-पाच मित्रांची गँग चाळीच्या जिन्यासमोरच्या छोट्या चौकात जमली होती. भोवती दगड, बत्ते, काठ्या अशा बऱ्याच वस्तू होत्या, दोरखंडाचं एक बंडल होतं.

“हे काय चाललंय?” विचारल्यावर चंदर म्हणाला, “जगबुडी झाली, तर आम्ही ही फरशी फोडून पाताळात जाऊन लपणार आहोत.” आणि भागवतांना त्यांच्या कल्पनेतला किडकिडीत, तुडतुडीत, अचाट साहसाची कल्पना करणारा पोरगा सापडला.

अर्थात, पुढे तो स्वत:चं स्वतंत्र, वेगळं रूप घेऊन प्रत्यक्षात आला. भाराभर पुस्तकांतून आपल्या सर्वांना भेटला.

२.

आता बहुतांशी, नव्हे सर्वस्वीच शहरी मुलगा, फुरसुंगीचा कसा, असा प्रश्न पडतोच. त्याचं उत्तर आहे भागवतांच्या लहानपणीच्या जुन्या आठवणीत. फुरसुंगीजवळच्या लोणी गावात त्यांच्या काकांचं शेत होतं. तुम्हाला खोटं वाटेल; पण दादांना आपण आता सगळ्यांसारखं ‘दादा’च म्हणू या, शेतकरी व्हायचं होतं. बरं झालं, ते शेतकरी न होता लेखक झाले. नाही तर आपल्याला फा.फे. कसा भेटला असता? तर, या लोणी गावाला जायला पुण्याहून मिरजेला जाणारी एक छोटी आगगाडी होती. तिच्यातून जावं लागे आणि उतरायचं स्टेशन होतं फुरसुंगी. तिथून पुढे दहा-पंधरा मिनिटं पायवाटेनं चालत गेलं, की लोणी गाव. त्या गावात दर सुट्टीत दादा आणि त्यांची आते-मामे भावंडं सगळी जमायची शेतावर. प्रचंड धम्माल करायची. ते गाव, तिथला परिसर, गाई, म्हशी, घोडे ही त्यांची मित्रमंडळी. पुढे एका पुस्तकात तुम्ही वाचलेली, ‘भागी गाय चुलाण्यात पडली’, ती तिथलीच. तिथले थैमान्या, जर्मन्या ही बैलजोडी; सोमाजी, गोमाजी पाटील आणि पोरांना हवं तसं हुंदडायला देणारा शेतावरचा गंगाराम आणि उसाचं गुऱ्हाळ लागलं, की ताजा गूळ आणि नंतर गुळाची पुरणपोळी खायला घालणारी त्याची बायको. हे सगळं या पोराला अनुभवायला मिळावं, तर तो एकदम उडून फुरसुंगीला कसा जाईल? म्हणून मग दादांनी त्याला जन्मालाच घातला फुरसुंगीला.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

३.

मुलांनी साहसी बनावं; नाही, बनलंच पाहिजे, नाही तर ती मुलं कसली? हे दादांचं मनापासूनचं मत. त्यांना साहसाची आवड होतीच; पण त्यांना ते कधी फारसं जमलं नाही. तसे ते किल्ले चढले. मुलांना घेऊन ट्रिपा काढल्या. त्या ट्रिपा सुरळीतपणे पार पडल्या नाहीत, की त्यांना जास्त मजा वाटायची, हे खरं; पण त्यांचा स्वभाव तसा कुणामध्ये फारसं मिसळण्याचा नव्हता. मग एकट्यानं काय करणार? तेव्हा बनेश फेणेच्या – हो, फा.फे. – जन्मल्यापासूनच्या पहिल्या दहा दिवसांतच त्याचं कापडात गुंडाळलेलं मुटकुळं बैलगाडीतून पडलं, नंतर सापडलं शिंदीच्या बनात, म्हणून तो बनेश फेणे – तेव्हा त्याला साहसाला साथ देणारी मित्रमंडळी नकोत का? मग दादा ज्या मुलांमध्ये मिसळायचे, गोष्टी सांगायचे, त्या मुलांमधूनच त्यांनी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वृत्तीची मुलं शोधायला सुरुवात केली आणि मग बनली त्यांची एक टोळी किंवा टोळकं. त्यातलाच शरद शास्त्री, सुभाष, थापाड्या पण फा.फे.शी स्पर्धा करणारा नंदू नवाथे, गर्विष्ठ श्रीमंत इंद्रू इनामदार वगैरे मंडळी. पण या सगळ्या दांडगटपणाला एक प्रेमळ, कोमलपणाची साथ असावी म्हणून त्यांनी फा.फे.ची बहीण माली त्यांच्यात आणली. ती मात्र त्यांना, उषा या आपल्या छोट्या चुणचुणीत बहिणीवरून सुचली, असं ते सांगायचे.

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

४.

‘फास्टर फेणे’ हा एखाद्या इंग्रजी पुस्तकातून मराठीत अवतरला असावा असं काही लोकांना वाटायचं, पण तो परदेशी नाही. अगदी मराठी मातीतला देशी मुलगा आहे. मग त्याचं नाव ‘फास्टर’ कसं? कारण तो फास्ट धावतो म्हणून. त्याचं हे बारसं झालं आणि नवीन नाव ठेवलं गेलं त्यानं मारलेल्या विद्याभवनमधल्या उडीवरून. त्याला पुण्याच्या विद्याभवनात प्रवेश घ्यायचा होता. माला आणि ते दोघं निघाले, पण त्याचं शत्रुत्व करणारा इंद्रू इनामदार पण भावाला प्रवेश घ्यायला निघाला. इंद्रू ऐटीत वडिलांच्या गाडीतून निघाला. इंद्रूच्या आधी तर पोचायला हवं. वाटेत किती अडथळे आले, पण फा.फे. म्हणजे सगळ्या अडचणींवर मात करणारा. त्याच्या तुडतुड्या पायांनी त्याने वाटेतले सगळे अडथळे पार करून जी धाव मारली, ती एकदम शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत उडी घेतली. इंद्रू आधीच पोचलेला, पण त्याच्या भावाला प्रवेश न मिळता आपल्या फा.फे.लाच मिळाला. कारण? कारण फा.फे.ची जिद्द, त्याची हुशारी हे तर होतंच, पण इंद्रूनं आणली होती गुळाची ढेप मुख्याध्यापकांना द्यायला. तिथेच नडलं आणि प्रवेश मिळाल्यावर मुलांनी जल्लोष करून त्याचं ‘फास्टर’ म्हणून स्वागत केलं. फा.फे.ला प्रवेश मिळाल्यावर जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा त्याला गुळाच्या ढेपेची लाच न स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकांबद्दल आदर वाटला. शिवाय ते त्याच्या धाडसाबद्दल रागावलेही नव्हते. उलट त्यांनी ‘फास्टर’ म्हणून त्याचं कौतुकच केलं आणि मग त्याचं बनेश नाव जाऊन तो बनला – ‘फास्टर फेणे’. इंग्रजी नावाचा चक्क देशी मुलगा.

(‘फास्टर फेणेचा कंपू’ या लिलावती भागवत यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

.............................................................................................................................................

‘फास्टर फेणे’च्या २० पुस्तकांच्या संचाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4264

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......