‘पाऊस’च, पण ‘त्याच्या’ आवाजातला, नजरेतला, गाण्यातला!
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 24 June 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi लता मंगेशकर Lata Mangeshkar सलिल चौधरी Salil Chowdhury शैलेंद्र Shailendra

लताच्या आवाजात नितळ पाऊस अनुभवता येतो, गीताच्या आवाजात पावसाची मादकता जाणवते, शास्त्रीय संगीताचा आधार घेतलेली गाणी आलापीसारखी नाजूक वळण घेऊन मनाच्या कठड्यावर अलगद येऊन बसतात. पण पुरुष गायकांच्या आवाजात एक वेगळाच पाऊस हिंदी चित्रपटगीतांत उतरला आहे. हा पाऊस प्रेमाची याचना करणारा आहे, विरहात पोळलेला आहे, संहारक घनगंभीर आहे, प्रेमात पूर्ण रसरसून उपभोग घेणारा आहे.

पावसाळी युगलगीतात पुरुषांचा आवाज आहे, पण १९५८ पर्यंत स्वतंत्रपणे पुरुषाच्या आवाजात पावसाचं गाणं उल्लेख करावा असं नाही. ‘राजतिलक’ (१९५८) मध्ये सी. रामचंद्र यांनी रफीच्या आवाजात एक गाणं दिलं आहे. राजेंद्र कृष्ण यांच्याशी गीतकार म्हणून मतभेद झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच चित्रपट. लेखक व गीतकार पी.एल.संतोषी सोबत ते काम करू लागले. या गाण्याचे बोलही संतोषी यांचेच आहेत. वैजयंतीमाला, जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन, पद्ममिनी यांच्या या चित्रपटात हे नावेवरचं गाणं सहाय्यक नटावर चित्रित आहे. ‘हो देखो आयी रे काली घटा, छायी रे काली घटा, जागा दिलों का प्यार’ असे साधेच शब्द आहेत. पण रफीने ठसक्यात हे गाणं म्हटलं आहे. 

याच वर्षीच्या ‘चलती का नाम गाडी’मधलं किशोर कुमारचं ‘एक लडकी भिगी भागीसी’ मात्र अप्रतिम. या गाण्याला लोकप्रियताही भरपूर लाभली. पावसात भिजलेली मधुबाला, तिच्या केवळ केस झटकण्यापुरता यात पाऊस दिसतो. बाकी सगळा पाऊस आहे, तो किशोरच्या स्वरात आणि मधुबालाच्या अदामध्ये. 

एक लडकी भिगी भागी सी

सोती रातों मे जागी सी

मिली इक अजनबी से 

कोई आगे न पिछे

तुमही कहो कोई बात है

मजरूहच्या या ओळींना एरव्ही एखादा संगीतकार आकार देऊ शकला नसता. पण एस.डी.बर्मन यांनी किशोरचा आवाज ध्यानात ठेवूनच गाण्याची रचना अशी केली की, सगळी मस्ती फुलून यावी. पावसात भिजून आलेली एक तरुण ‘लडकी’. तिच्याबाबत एका तरुणाच्या मनात जाग्या झालेल्या तारुण्यसुलभ भावना. ही ‘लडकी’ बिगडी बिगडी आहे, धुंदलाती हुई, भुली भटकी मचली मचली अशी म्हणजे तीही प्रेमाच्या शोधातच जणू निघाली आहे. हे सगळं आपल्या खट्याळ अदात सार्थ सादर करत मधुबाला ‘दिल ही दिल में चली आती है’ अशी येते. 

उषा खन्नाचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट होता ‘दिल दे के देखो’ (१९५८). शम्मी कपूरच्या कारकिर्दीला वळण देणारा ‘तुमसा नही देखा’नंतरचा हा त्याचा दुसरा आणि आशा पारेखचा पहिला चित्रपट. यातील गाण्यांवर ओ.पी.च्या संगीताची छाया पडली आहे. यातलं पावसावरचं गाणं उषा खन्नाने वेगळ्याच धाटणीत, लोकसंगीताचा बाज देत, कोरसचा अप्रतिम वापर करत सादर केलं. रफीचा आवाज लतासारखाच कसाही फिरतो. लोकगीताचा बाज असल्याने मजरूहनेही तसेच शब्द रचले आहेत

ओ मेघा रे बोले घनन घनन

पवन चले सनन सनन

पायल बाजे छनन छनन

जियरा मोरा डोले, आजा पिया मोरे

एरव्ही गाण्यात स्त्री आपल्या प्रियकराला आभाळ दाटून आलं की बोलावत असते. इथं उषा खन्नाने ते उट्टं काढलं असावं. आभाळ भरून येताच तिनं पुरुषाला आपल्या प्रियेची आठवण काढून बोलवायला लावलं आहे. रफीचे हे चांगलं गाणं फार कमी ऐकायला मिळतं.

बाबूल हा फारसा परिचित संगीतकार नाही. १९५७ मध्ये त्याने बिपीन दत्तसोबत जोडी जमवून ‘बिपीन-बाबूल’ नावानं संगीत दिलं होतं. ‘चालीस दिन’ हा त्यांचा स्वतंत्र संगीत दिलेला पहिला सिनेमा. याच बाबूलच्या संगीतात ‘रेश्मी रूमाल’ (१९६१) मध्ये तलत मेहमुदने एक सुंदर पावसाळी गीत गायलं आहे- 

जब छाये कही सावन की घटा

रो रो के न करना याद मुझे

ए जाने तमन्ना गम तेरा

कर दे न कही बरबाद मुझे

मदनमोहनचा लाडका गीतकार राजा मेहंदी अली खान याची ही रचना आहे. तलतच्या कापर्‍या आवाजात हे दु:ख जास्तच ठळक वाटतं. मनोजकुमार आणि शकिलावर हे गाणं चित्रित आहे. मनोजकुमारचा चेहरा तसा भावविहीन आहे, पण शकिलाने फार नेमके भाव चेहर्‍यावर दाखवले आहेत. गुरुदत्तच्या चित्रपटात वहिदाच्या आधी शकिलाच असायची. शकिलाचा चेहरा विलक्षण बोलका आहे. कसबी कॅमेरामन तिच्या चेहर्‍यावरचे भाव नेमके पकडतो. 

देव आनंदचे चित्रपट म्हणजे एस.डी.बर्मनचं किंवा शंकर जयकिशनचं संगीत. फार तर ओ.पी.नय्यर. त्यामुळे इतर संगीतकारांकडचा देव आनंद फारसा लक्षात येत नाही. देव आनंद-मधुबालाच्या ‘शराबी’ (१९६४) ला मदन मोहनचं संगीत आहे. मदनमोहनचा दुसरा लाडका गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी एक गाणं यात दिलं आहे-

सावन के महिने में एक आग सी सिने में

लगती है तो पी लेता हूं दो चार घडी जी लेता हूं

देव आनंदसाठी गाताना रफी एक वेगळाच आवाज लावतो. रफीची खरंच कमाल आहे. देवआनंद-शम्मी कपूर-जॉनी वॉकर यांच्यासाठी गाताना तो आवाजात जो बारीक फरक करतो, तो अफलातून आहे. इतर वेळी त्याचा आवाज वेगळाच असतो. या गाण्यात पहिल्याच कडव्यातील ओळ आहे-

बरसो छलकाये मैने, ये शीशे और ये प्याले, 

कुछ आज पीला दे ऐसी, जो मुझको ही पी डाले

या वेळी देव आनंद रस्त्यावरच्या कुत्र्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याच्या कानांशी खेळवतो. रफीचा सूरही या वेळी जास्त खेळकर बनतो. एक कोडं उलगडत नाही. त्या काळात गायक-संगीतकार-गीतकार-नट-दिग्दर्शक यांचं इतकं घट्ट रसायन कसं काय जुळून यायचं? हे सगळे म्हणजे ‘दोन दिल धडक रहे है और आवाज एक है, नगमे जुदा जुदा है मगर साज एक है’ असं अनुभवायला येतं.

एस.डी.बर्मन यांनी गायक म्हणून बंगालीत मोठं नाव कमावलं होतं. पण हिंदीत ते संगीतकार म्हणूनच जास्त रूळले. त्यांची जी काही अतिशय थोडी गाणी आहेत ती मोठी लक्षणीय आहेत. ‘गाईड’ (१९६५) मध्ये एक अतिशय वेगळं असं भजन आहे. त्याचा स्वर स्वत: सचिन देव बर्मन यांचाच आहे. 

अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे रे तू, 

रामा मेघ दे, श्यामा मेघ दे

एरव्ही रामाला श्यामाचा अनुप्रास कुणीही जोडला असता, पण शैलेंद्रसारखा गीतकार या श्यामामध्ये पावसाळी ढगांचा श्याम रंग अपेक्षित करतो. या भजनातला पावसाचा आर्त रंग वेगळाच आहे. ना.धों. महानोरांची एक ‘पांगलेला पावसाळा’ नावाची कविता आहे. तिचा शेवट असा आहे, ‘पापण्यांच्या कातळाशी खोल विझला पावसाळा’. सचिन देव बर्मन यांच्या आवाजात अशीच एक आर्तता दाटून येते. 

पुरुषांच्या आवाजातील ही पावसाची गाणी म्हणजे तशी जंत्रीच आहेत. बर्‍याच गाण्यांत केवळ पावसाचा मेघाचा उल्लेख येतो, पण परत पावसाचा काहीच संबंध येत नाही. पण हिंदीतील सगळ्या पावसाच्या गाण्यात एक गाणं असं आहे की, ज्याचे शब्द, ज्याचे संगीत, ज्याचा सूर आणि नायिकेची अदा या सगळ्याचा मिळून पावसाचा असा काही रंग जमून आला आहे... तसा आजतागायत परत जमला नाही.

‘बरसात की रात’ (१९६०) ला आता ५७ वर्षे उलटून गेली. पण ‘जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात’चा ओलावा आजही रसिकांच्या कानात तसाच टिकून आहे. रफी-रोशन-साहिर-मधुबाला यांपैकी कुणी कुणासाठी हे गाणं तयार केलं/गायलं/सादर केलं कळत नाही. साहिरच्या शब्दांना पुरेपूर न्याय देत रोशननं संगीत रचलं आहे. रफीनं गाताना त्याला अजून उंचीवर नेलं आहे. आणि पडद्यावर सादर करताना मधुबालानं तर कळसच चढवला आहे. वैद्यकशास्त्रात फार आनंदानंही हृदयविकाराचा झटका येतो असं म्हणतात. अशीच परिस्थिती या गाण्यात आहे. पण नजर लागू नये किंवा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून भारत भूषणच्या तोंडी हे गाणं देऊन चोख व्यवस्था केली आहे. (भारत भूषणच्या चाहत्यांची माफी. भारतभूषणचा जन्मदिवस याच महिन्यात १४ जूनचा आहे.)

साहिर लिहीताना कधीच गीत म्हणून लिहीत नाही. त्यामुळे त्याच्या रचनांना संगीत साज चढवणं तसं आव्हानात्मक असतं. पण एखाद्या उत्तम कलाकृतीला अंगचीच लय असते, तशी या कवितेला आहे. ती नेमकी रोशनला उचलता आली-

सुर्ख आचल को दबाकर जो निचोडा उसने

दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने

आग पानी में लगाती हुई हालात की रात

या ओळीत पदराशी बोटांनी खेळत मधुबाला ‘काहीतरीच काय’ असे भाव व्यक्त करत मानेला नाजूक हिसडा देते आणि पडद्यावर कविताच आपण पाहतो आहोत असा भास प्रेक्षकांना होतो. हे गाणं साहिरनं मधुबालासाठीच लिहिलंय की काय? (साहिरची प्रेयसी कवयित्री अमृता प्रितमही सुंदर दिसायची हा भाग वेगळा).

हेच गाणं लताच्याही आवाजात आहे. पण रफीची मजा त्यात नाही. पुरुषांच्या आवाजात गाजलेली गाणी लतानेही स्वतंत्रपणे गायली आहेत. (‘तुम तो दिल के तार छेड के’ (तलत- शंकर जयकिशन), ‘रूप की रानी चोरों का राजा’, १९६२, ‘कभी कभी मेरे दिल में’ (मुकेश-खय्याम,‘कभी कभी’, १९७६, ‘एहसान तेरा होगा मुझपर’ (रफी-शंकर जयकिशन, जंगली, १९६१) पण का कुणास ठाऊक, प्रत्येक वेळी पुरुषांच्याच आवाजातील गाणी जास्त गाजली आणि आजही लक्षात राहतात.     

पावसाची इतरही गाणी आहेत, ज्यात पुरुषांचा आवाज उमटला आहे. पण ती स्वतंत्र गाणी नाहीत. युगलगीतं आहेत.

हेमंतकुमारच्या ‘नास्तिक’ (१९५४) मध्ये ‘गगन झनझना रहा’ या लतासोबतच्या गाण्यात हेमंतकुमारचा सूर शिवाच्या संहारक रूपातला सूर वाटतो, तर हेमंतदाचाच आवाज सलिल चौधरीच्या ‘परिवार’ (१९५६) मध्ये लतासोबत ‘झिर झिर बदरवा बरसे’ म्हणत शृंगारात फुलून आला आहे. ‘रेश्मी रूमाल’ (१९६१) मध्ये मन्ना डे-आशा चे सुंदर पावसाळी गाणे ‘जुल्फों की घटा लेके सावन की परी आयी’ आहे.

असं परत परत वाटत राहतं की, आभाळाचा आवाज म्हणजे पुरुषाचा आवाज आणि धरतीचा सूर म्हणजे स्त्रीचा. या दोघांना सांधत कोसळत राहतो तो पाऊस. असे काहीतरी चित्र सगळ्या पावसाळी गाण्यांमधून उमटत राहते. 

(पावसाची अजून खूप गोड गाणी आहेत. शैलेंद्रचंच पदार्पणातलं ‘बरसात’ (1949)मधलं पहिलं गाणं ‘बरसात में हमसे मिले तुम’ किंवा ‘तांगावाली’ (१९५५)मधलं ‘रिमझिम झिम झिम बदरवा बरसे’, ‘झिंबो कम्स टू टाऊन’ (१९६०)मधलं ‘ठंडी हवाओ काली घटाओ’,  ‘परख’ (१९६०)मधलं ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘चित्रलेखा’ (१९६४)मधलं ‘छा गये बादल नील गगन पर’,  अशी बरीच गाणी आहेत. पण सगळ्यांवरच लिहिणं शक्य नाही. शिवाय काही गाणी या सदरात आधी येऊन गेली आहेत.)   

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......