टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रशीद लतिफ, सरफराज अहमद, पाकिस्तान क्रिकेट संघ, बाबा रामदेव, अमित शहा, कैलाश विजयवर्गीय, रामनाथ कोविंद आणि रामविलास पासवान
  • Tue , 20 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रशीद लतिफ Rashid Latif सरफराज अहमद Sarfraz Ahmed पाकिस्तान क्रिकेट संघ बाबा रामदेव Baba Ramdev अमित शहा Amit Shah कैलाश विजयवर्गीय Kailash Vijayvargiya रामनाथ कोविंद Ram Nath Kovind रामविलास पासवान Ram Vilas Paswan

१. पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. यानंतर पाकिस्तानचे माजी यष्टिरक्षक रशीद लतिफ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विजयावर भाष्य केले. भारताच्या खेळाडूंवर, विशेषत: वीरेंद्र सेहवागच्या ‘बाप आणि बेटा’ या प्रतिक्रियांवर लतिफ यांनी भाष्य केले आहे. ‘पाकिस्तानच्या या विजयाला कोणतेही उत्तर असू शकत नाही. पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीतूनच सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांबरोबर खेळलं पाहिजे. आशिया ही क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहे. अॅशेससारख्या मालिकादेखील भारत-पाकिस्तानपेक्षा मोठ्या नाहीत आणि आयसीसीलादेखील माहित आहे. आशियामध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानसारखे संघ आहेत. हे संघ क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवतात. त्यामुळे या देशांमध्ये मालिका व्हायला हव्यात. आयपीएलमध्येदेखील पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळायला हवी. यासोबतच भारतीय क्रिकेटपटूदेखील पीएसएलचे भाग व्हायला हवेत,’ असे लतिफ यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

रशीदभाऊ, भारत आणि पाकिस्तान ही क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहेच. पण, त्याहून मोठी बाजारपेठ ती धर्मवेडाची आणि परस्परद्वेषाची आहे. दोन्हीकडचे राजकारणी गणंग आणि पाकिस्तानातले लष्करशहा या आगीवरच तर इकडे पोळी आणि तिकडे तंदूरी भाजून घेत असतात... दोन्ही देशांमध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं तर या सगळ्या बेरोजगारांना कुठे धाडणार?

……………………………………………………………………………………………

२. चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने अंतिम फेरीत भारतावर मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरल्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. चॅम्पियन्स करंडकविजेत्या संघाचं मंगळवारी पाकिस्तानात आगमन झालं. यावेळी कर्णधार सरफराज अहमदच्या स्वागतासाठी त्याच्या घराबाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.

हा खेळ, तो खेळणारे हे दोन देश, या देशांमधले क्रिकेटचे चाहते आणि त्यांचे रागलोभ हे सगळंच किती अजब आहे... हा सामना पाकिस्तान हरला असता, तरी त्याच्या ‘स्वागता’ला हजारो चाहते (बहुधा आता आले तेच) गोळा झालेच असते- फक्त माहौल वेगळा असता आणि सरफराजसह अन्य सगळ्या क्रिकेटपटूंच्या घरांभोवती कडेकोट पहारा बसवावा लागला असता... ‘चाहत्यां’च्या ‘प्रेमा’पासून त्यांचं संरक्षण करायला.

……………………………………………………………………………………………

३. गुजरातमधील अहमदाबादमध्येही आयोजित योग शिबिरात योगगुरू बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्यासाठी योग कसं उपयुक्त आहे, याची अनेक उदाहरणं दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी योगासनं करून २० किलो वजन कमी केलं, असं त्यांनी सांगितलं.

अमित शहा यांचं वजन कमी झालं, असं बातमीचं शीर्षक ऐकून भाजपच्या नागपूर गोटात हर्षाची लाट उसळली होती म्हणे. स्वत:च्या वजनाची चिंता न करता लोकांनी संत्राबर्फी वाटली आणि स्वत:ही चाखली. पण, हे शारीरिक वजन घटलं आणि त्याने शहा यांची ‘कार्य’क्षमता आणखी वाढलीच आहे, हे कळल्यावर संत्र्याची साल दाताखाली आल्यासारखी तोंडं कडू झाली त्यांची.
……………………………………………………………………………………………

४. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या दलितत्वाचे भांडवल करणाऱ्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वर्तनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दलित मतांसाठी भाजपने चालवलेल्या राजकारणावर आणि कोविंद यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीवरही टीका होते आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यावर म्हणाले, ‘कोविंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, यात गैर काय? संघाचे लोक पाकिस्तानी आहेत का?’

विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या नकळत मिळणारी माहिती मौलिक आहे. यांना पाकिस्तान-सिंड्रोम झालेला आहे. कोणत्याच अर्थाने भारताच्या बरोबरीचा नसलेला एक देश असल्या पाकिस्तानद्वेष्ट्यांच्या सततच्या भयव्याकूळ उल्लेखामुळे भारतीयांना दखलपात्र आणि तुल्यबळ वाटू लागला आहे. पाकिस्तानी लोक असले तर काय होतं कैलाशकाका? घाबरायला होतं? कसला राग येतो? की घाबरल्यामुळेच रागाचा देखावा करता?

……………………………………………………………………………………………

५. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. कोविंद हे उत्तर प्रदेशमधील दलित समाजातील आहेत. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा न देणारे दलितविरोधी समजले जातील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान त्यांनी दिली.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सत्तासुख कार्यक्रमात आता ऐकूयात, ताटाखालचे मांजर या चित्रपटातील एक शास्त्रीय गीत... गीताचे शब्द, स्वर आणि संगीत आहे सुरलाचार रामविलास पास्वान यांचं... बोल आहेत ‘कुणी कोविंद घ्या, कुणी कोविंद घ्या, सगळे कोविंद घ्या, फक्त कोविंद घ्या’... श्रोतेहो, हे गाणं ‘जो सरकारविरोधी तो देशविरोधी’ या लोकप्रिय गीतावर बेतलेलं आहे, हे आपल्या लगेच लक्षात येईल.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......