टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी-अमित शहा, उद्धव ठाकरे, भारतीय हॉकी टीम, सुब्रमण्यम स्वामी, झैनाब अब्बास, विराट कोहली, मिरवाईज उमर फारुख आणि गौतम गंभीर
  • Mon , 19 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भारतीय हॉकी टीम Indian Hockey Team सुब्रमण्यम स्वामी Subramanian Swamy झैनाब अब्बास Zainab Abbas विराट कोहली Virat Kohli मिरवाईज उमर फारुख Mirwaiz Umar Farooq गौतम गंभीर Gautam Gambhir

१. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन कान टोचल्यानंतर शिवसेना नरमेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच सेनेनं भाजपवर जाहीर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत, आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. मात्र, आम्हाला मध्यावधीचे काय होणार यापेक्षा काश्मीरचे काय होणार? याची जास्त चिंता असल्याचे सांगून सेनेनं भाजपला खोचक टोला लगावला आहे.

शिवसेनेचं नामांतर ‘टाइमपास सेना’ असं करायला काय हरकत आहे? सत्तेत राहून सत्तेतल्या जोडीदाराला विरोध हा जो काही पायावर कुऱ्हाड मारण्याचा अद्भुत उद्योग सुरू आहे, त्यातून या पक्षाबद्दल काही मोजक्या मराठी माणसांच्या मनात उरलेलं उरलंसुरलं प्रेमही संपून जाईल. इकडे यांना महाराष्ट्रात शेजारच्या राज्यातले लोक आलेले, राहिलेले चालत नाहीत आणि इथं बसून थेट काश्मीरची चिंता. तिकडे शाखा काढा, सत्तेत जा आणि चिंता वाहा. प्रादेशिक संकुचितवाद्यांना राष्ट्रीय बाणा शोभत नाही.

……………………………………………………………………………………………

२. वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करून टाकला. पाकिस्तानच्या संघाला तब्बल ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करून टीम इंडियाने या स्पर्धेतली आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

ज्या कोणा क्रीडापत्रकाराच्या लेखणीतून ही बातमी उतरली आहे, त्याच्यावर बिचाऱ्यावर क्रिकेटमधल्या भारताच्या विजयानंतर करायची ‘सुपडा साफ’ वगैरे पाकिस्तानविषयक ‘अलंकारां’ची पखरण हॉकी सामन्यावर करायला लागली आहे. चँपियन्स ट्रॉफीची मॅच भारत जिंकला असता, तर हॉकीतला हा मोठा, दणदणीत विजयही कोपऱ्यात फेकला गेला असता. काही लोकांनी बॅटी तासून हॉकीस्टिक बनवण्याची चित्रं एकमेकांना पाठवली खरी; पण, त्या स्टिक्सनेही हे लोक दोनच दिवसांत पुन्हा क्रिकेटच खेळू लागतील. आपल्याला समाज म्हणून दुसऱ्या कशात रसही नाही आणि गतीही नाही.

……………………………………………………………………………………………

३. पाकिस्तानी टीव्हीसाठी काम करणाऱ्या झैनाब अब्बास या पत्रकार महिलेबरोबर ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक अंधश्रद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू शून्यावर तरी बाद झाले आहेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रविवारच्या सामन्याआधी युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अरे देवा, म्हणजे आपल्या देशात बीसीसीआयचा क्रिकेट संघ जिंकावा म्हणून जे यज्ञयाग-होम हवन केलं गेलं, त्यातल्या सगळ्या पुण्यसंचयाला एका पाकिस्तानी तरुणीचा अपशकुन भारी पडला... म्हणजे तिचा धर्म आपल्या धर्मापेक्षा पॉवरफुल आहे की काय? ओह माय गॉड!!!

……………………………………………………………………………………………

४. गायींचा देखभाल निधी उभारण्यासाठी पेट्रोलवर एक रुपयाचा अधिभार लावण्याची कल्पना भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी ‘गौरवशाली भारतीय गाय’ या परिषदेत मांडली. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात सैन्याच्या खर्चासाठी स्त्रियांनी हातातल्या सोन्याच्या बांगडय़ा काढून दिल्या होत्या. गायींच्या संरक्षणासाठी तर सर्वच जण मदत करतील, असंही त्यांनी सांगितलं. दूध व पुनरुत्पादनाची क्षमता संपलेल्या गायी सांभाळणं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. मात्र या गायींचं मूत्र तसंच शेणापासून उत्पादनांची निर्मिती करून तसेच इतर गायींचं दुग्धोत्पादन वाढवून शेतकऱ्याला भाकड गायीही सांभाळणं कठीण जाणार नाही, असं परिषदेतील विविध सत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी सांगितलं.

बैलबुद्धीचा (म्हणजे सरकारी भाषेत गो-पुत्र हो!) आणखी एक आविष्कार. त्यासाठी सुब्रम्हण्यन स्वामींना चीनच्या युद्धाचा दाखला देण्यातही कसलीही भाडभीड वाटत नाही, यात आश्चर्य नाही. असली संमेलनं भरवणाऱ्या गो-पुत्रांनी दोनपाच आया ऐपतीनुसार सांभाळायला घ्याव्यात. घरी नेऊन त्यांचं शेणमूत काढावं. यातले जे शहरी गणंग मोठ्या सोसायट्यांमध्ये राहतात, त्यांनी आवारातच गोशाळा काढण्याची कल्पना मांडून पाहावी. यांच्यातले काही बिल्डरही आहेत. त्यांनी आपल्या आरामदायी, शाही निवासी प्रकल्पांमध्ये एकेका गोठ्याची व्यवस्था करावी फ्लॅटगणिक.

……………………………………………………………………………………………

५. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने या विजयाबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केलं आहे. मिरवाईजच्या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मिरवाईज सीमारेषा का ओलांडत नाही? तुला तिथं चांगले (चायनीज) फटाके मिळतील? ईद तिथं साजरी केली जाते. मी तुम्हाला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करेन,’ असं प्रत्युत्तर गौतम गंभीरने केलं.

गौतमने इतक्या गंभीरपणे क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं तर? गड्या, मिरवाईज आणि त्याच्या राज्यातल्या अनेकांना सीमा ओलांडून पलीकडे जाण्याऐवजी आमचीच बहुसंख्या आहे, असं दाखवून सीमाच अलीकडे आणायची इच्छा आहे. त्यांना तो सल्ला दिलास तर ते म्हणतील, मित्रा, आमचंही तेच म्हणणं आहे. आपण चिडून अशी प्रतिक्रिया द्यावी, म्हणूनच कोणी टोचणारं वक्तव्य करतं, तेव्हा आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसतं.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......