'आजचा सुधारक'चे दयामरण आणि काही प्रश्न (भाग तिसरा)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘आजचा सुधारक’चा शेवटचा अंक
  • Thu , 15 June 2017
  • पडघम सांस्कृतिक आजचा सुधारक Aajcha Sudharak दि.य. देशपांडे D.Y. Deshpande श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ Ravindra R. P.

१. ज्यांच्यात समाज परिवर्तन घडवायचे आहे त्या वर्गातून सर्व प्रकारचा शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी (विशेषतः शिक्षक-प्राध्यापकवर्ग) वगळला जातो आहे. म्हणूनच तर सर्व पातळीवर बौद्धिक दुष्काळ दिसतो. वैचारिक लेखनाचा वाचकवर्ग नेहमी ज्यांना काही सुधारणा, विचारसरणी मान्य असतात, तेच असतात. म्हणजे सुधारणांना मर्यादा पडतात. ज्यांनी खरेच सुधारावे तो लक्ष्यवाचक वर्ग दूरच राहतो.

२. उदाहरणार्थ, टपाल खात्यात पोस्टमन ते टपाल विभागाचा सचिव, टपाल कार्यालय महानिदेशक, टपाल मंडळाचे अध्यक्ष किंवा स्थानीय, विभागीय अधिकारी मंडळी ही वैचारिक, साहित्यिक किंवा कोणत्याही साहित्याचे वाचक असतात का? की ते केवळ नियम, कायदा, शासनादेश आणि वृत्तपत्रेच वाचतात? त्यांना वाचनासाठी वेळ मिळतो का? हा वेगळा प्रश्न आहे. (ज्याला वेळ नाही, त्याला वाचनाची खाजच असेल तो शौचालयातही तेवढ्या वेळेत वाचन करतो. ती निवांत जागा असते.)   

३. केवळ कर्मचारीच नव्हे तर जे समाज रथ चालवतात ते राज्यकर्तेही वाचक नाहीत, हे महत्त्वाचे दुर्दैव आहे. इथे सामान्य दुर्दैवे आणि महत्त्वाची दुर्दैवे असा फरक मी करतो. वैचारिक साहित्यातून किंवा कोणत्याच साहित्यातून राज्यकर्त्यांपर्यंत विचार पोहोचतच नाहीत. मुळात त्यांना सत्तेशिवाय काही नको आहे, त्यात ते वाचक नाहीत. त्यामुळे ते परिवर्तनाच्या कक्षेबाहेर आहेत. अपवाद असू शकतील.

४. राज्यकर्तेच असे विचारबंद असल्याने त्यांची समग्र नोकरशाहीसुद्धा विचारबंदच राहणार यात शंका नसावी. मग अशा मानसिक-वैचारिक घडणीचे नोकर वैचारिक साहित्याला मदत का करतील!?     

५. 'लोकसत्ता'तील लेखात नंदा खरे म्हणतात, "सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ‘प्रगत’ देश मदांध होत गेले आहेत. त्यांना आव्हान मात्र पर्यायी अर्थविचारांतून न येता धार्मिक मूलतत्त्ववादाकडून दिले जात आहे! यामुळे जगभरात धर्माचे आकर्षण वाढत आहे आणि त्याचा पाया वस्तुनिष्ठता नसून श्रद्धा हा आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद नवउदारमताइतकाच असहिष्णु असतो! " या निष्कर्षाप्रत यावे लागते, कारण 'विचारवंत मारला, विचाराचे व्यासपीठ मारले तरी विचार मरत नाहीत', हा पुरोगामी, सुधारणावादी मंडळी इत्यादींचा दावा असतो. तो खराही असतो. पण त्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जाते. विचारात सातत्य राखले जातेच असे घडत नाही, सातत्य धर्म, श्रद्धा, कर्मकांडे, अंधविश्वास यात आणि धंद्यात घडते. विचारात, विचारवंत निर्माण होण्यात सातत्य घडत नाही. कारण प्रत्येक विचारवंत एकमेव राहण्याचाच प्रयत्न करतो. तो आपला उत्तराधिकारी निर्माण होवू नये, आपले एकमेकावाद्वितीयत्व अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.       

६. शिक्षक-प्राध्यापकवर्गाचा विवेकवाद किमान भारतात तरी नेहमीच संशयास्पद राहिला आहे. वाचक ते साहित्य निर्माता या भूमिकेत तो वावरत आला आहे. पण त्यात पारदर्शकतेचा अभाव आहे. परिणामी व्यावसायिक आचारसंहितेचा अभाव आहे.

७. सध्या प्राध्यापक-शिक्षक काय करतात? गेल्या दशकात हा वर्ग प्रकाशक, वितरक बनून थेट साहित्यनिर्माता झाल्याने त्याच्या सर्व साहित्यव्यवहाराला लाभदायक आर्थिक परिमाण मिळाले. आणि धंदेवाईक आर्थिकता नेहमीच संशयास्पदता गडद असते. असो, म्हणजे नसो! (स्वतंत्र लेखाचा विषय आहे हा.)

८. वैचारिक नियतकालिकांमध्ये परस्परांमध्ये काहीएक संवाद असतो का? तसे काही अधिवेशन, परिसंवाद आजपर्यंत आयोजित केला गेला आहे, याचे पुरावे उपलब्ध आहेत का? साहित्य संमेलन हा परस्पर संवादाचा पुरावा होऊ शकतो का? या नियतकालिकांचा दबावगट निर्माण होवू शकतो का?

९. साहित्यिक (लेखक, कवी, नाटककार इत्यादी आणि समीक्षक इत्यादी लेखनकर्मी) आणि प्रकाशक यांच्यात आर्थिक, वैचारिक साहचर्य खरेच असते काय?

१०. वाचक हा साहित्य व्यवहारातील 'साहित्याचा आस्वादक' याच भूमिकेत असतो. त्याला साहित्य व्यवहारातील अर्थकारण, हितसंबंधी मित्रवर्तुळे खरेच परिचित आहे का? (मी गटबाजी म्हणत नाही. कारण तीच मला टाळायची आहे; म्हणजे आपणा सर्वांना टाळायची आहे.)    

११. वाचक, साहित्यिक, प्रकाशक व समीक्षक यांच्यात एक समाज दर्शन घडवणारी किंवा समाज परिवर्तन करणारी किंवा त्याचे एखादे तरी कारण ठरणारी एक सामाजिक संस्था म्हणून सेंद्रिय एकता आहे का?

१२. समाजावर, शासनावर तातडीने किंवा संथ गतीने परिणाम करणारा प्रभावी घटक म्हणून केवळ वृत्तपत्रे, वाहिन्या इत्यादी माध्यमेच आहेत. त्यांना चारपैकी एक खांब म्हणून त्यांची पोहोच सर्वदूरवर असते, हे खरेच. पाचवा खांब (Fifth Estate) म्हणून समाजमाध्यमे पुढे येत आहेत. पाचवा स्तंभ ही संकल्पना लवचिक आहे. १९३२ साली ‘दि टाईम्स’ या लंडनच्या दैनिकाने रेडिओला पाचवा स्तंभ म्हटले, तर १९५५ च्या दरम्यान कामगार संघटना या पाचवा स्तंभ होत्या. आज अनुदिनी (ब्लॉग), संकेतस्थळ, व्हाट्सअॅप इत्यादी ऑनलाईन समाजमाध्यमे आणि विकीलीक्स यांना पाचवा स्तंभ म्हटले जाते. २०१३ साली आलेल्या ‘दि फिफ्थ इस्टेट’ या चित्रपटाने पाचवा स्तंभाचे चित्रण केले. या स्तंभाने चौथ्या स्तंभाची चिकित्सा करणे हे धोरण स्वीकारले. त्या समाजातील 'पंडित' जनांचा समावेश होता. या पंडितांनाच नंतर सहावा स्तंभ म्हटले जाऊ लागले.

१३. विद्यमान काळात लोकशाहीच्या या सर्व स्तंभांना वैचारिक आशय द्रव्य पुरवणारी 'विचार टाकी' (Think Tank) म्हणून साहित्य निर्माते किंवा एकूण साहित्यविश्वच मुदलात कोणती भूमिका बजावत आहे? बजावत असतील त्याचा परिणाम झालेले समाज गट कोणते? आजचा सुधारक, समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, विचारशलाका, परिवर्तनाचा वाटसरू, आकलन ही वानगीदाखल वैचारिक नियतकालिके पाहा. शब्द, प्रतिष्ठान, नवाक्षर दर्शन इत्यादी साहित्यिक नियतकालिकांमधील लेखनाने कोणते बळ कुणाला पुरवले आहे? ज्ञानसत्ता विरुद्ध अर्थसत्ता असा संघर्ष प्राचीन काळापासून चालू आहेच. पण ज्ञान ही आधुनिक काळात सत्ता होऊ शकते, याचे भान ज्ञाननिर्माते, ज्ञानवितरक, ज्ञानप्रसारक यांनी विकसित केले आहे का?

१४. वैचारिक साहित्याला माध्यमांची जागा मिळू शकणार नाही. पण माध्यमांचे निरीक्षक बनून मिळणारे आशय विषय साहित्याचे आशय द्रव्य ठरू शकते, याचा विचार विचारवंत, साहित्यिकांनी केला आहे का? की तशी अपेक्षा करणे चूक, अस्थानी आहे?  

१५. ज्ञान वितरणात प्रकाशन विश्वाची भूमिका नेमकी कोणती आहे? हे प्रकाशनविश्व धंदा, व्यवसाय आणि परिवर्तनाचे माध्यम अशा कोणत्या कोंडीत सापडले आहे? कोंडीत खरेच सापडले आहे की त्यांनी त्यात 'समतोल' साधला आहे. म्हणजे 'मागणी तसा पुरवठा' या न्यायाने बाजारपेठीय किंमत असणारी पुस्तके ग्राहकांसाठी छापायची आणि त्याच वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून साहित्यिक, ज्ञानात्मक मूल्य असणारी पुस्तकेही प्रसिद्ध करायची. त्यात होणारा तोटा (झालाच तर) ग्राहकप्रिय पुस्तकातून मिळवायचा. केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर वाचक या नात्याने का होईना स्वतःला असणारे संवेदनशीलतेचे भान जागते ठेवण्यासाठी वैचारिक मूल्यवान ग्रंथ निर्मिती करायची. त्याद्वारे लेखक, वाचक आणि वाचन संस्कृती यांचे संवर्धन आणि संरक्षण करायचे. असे काही प्रयत्न प्रकाशनविश्व करते आहे का? असे कितीजण आहेत?       

१६. सहावा स्तंभ कोण असू शकते? या पाचही स्तंभांचे निरीक्षण, त्यांची काटेकोर चिकित्सा आणि त्यांचे यथार्थ मूल्यमापन करणारी समाजातील सुबुद्ध, सुजाण, शहाणे लोक हेच सहावा स्तंभ असू शकतात. या लोकांची चिकित्सक भूमिका या साऱ्यावर नियंत्रण ठेवणारी नैतिक आणि ज्ञानात्मक न्यायदेवतेची भूमिका असेल. ही शहाणी माणसे साहित्य आणि तत्त्वज्ञान याच क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. त्यांची आविष्करणाची माध्यमे म्हणजे वैचारिक आणि तत्त्वज्ञानाची नियतकालिके. ती क्षीण, दुर्बल आणि अशक्त झाली की, सत्तेचे सर्व स्तंभ शिरजोर होणे नैसर्गिक आहे.      

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......