काय आहे उत्तर भारतातील ‘भीम आर्मी’?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • ‘भीम आर्मी’चे एक पोस्टर
  • Wed , 24 May 2017
  • पडघम देशकारण भीम आर्मी Bhim Army योगी आदित्यनाथ Yogi Adityanath सहारनपूर Saharanpur उत्तरप्रदेश Uttar Pradesh

उत्तर प्रदेशमध्ये योगी राज आल्यापासून दलितावरील अत्याचारात वाढ झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. तेथील सहारनपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दलित-राजपुतांमध्ये जातीय दंगली नुकत्याच झाल्या आहेत. उत्तर भारतातील दलितांवर होणाऱ्या सामाजिक भेदभाव व अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्ष करण्यासाठी तेथे गेल्या पाच-सहा वर्षांपासून शिक्षित दलित तरुणांची एक संघटना स्थापन झाली आहे. त्या संघटनेचे नाव आहे- ‘भीम आर्मी’. परंतु सर्वच बाबतीत बलिष्ठ असलेल्या राजपूत ठाकुर समाजाने त्या परिसरातील अनेक गावांत दलितांवर हल्ले केले आहेत. उदा. शब्बीरपूर येथील दलितांची घरेदारे, मोटार सायकलींची जाळपोळ करून, घरातील धान्याची नासाडी, संत रविदास व डॉ.आंबेडकरांच्या मूर्ती व फोटोंची तोडफोड केली आहे. राजपुतांच्या अशा दहशतीला घाबरून गावातील दलित मंडळी आपापल्या नातेवाईंकाकडे गेली आहेत. १४ गंभीर जखमी दलितांना दवाखान्यात अॅडमिट केले आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे.

या दंग्यादरम्यान महिलांशी असभ्य वर्तनाच्या अनेक घटना घडल्या असल्याची माहिती दवाखान्यातील महिलांनी तसेच गावात राहिलेल्या आबालवृद्धांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा सशस्त्र हल्ला पोलिसांसमक्ष, त्यांच्या सहकार्यानेच करण्यात आला असल्याचेही या सर्वांनी सांगितले आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांमध्ये नव्हे, पण सोशल मीडियावर, यु टयूबवर या सर्व घटनांचा इत्थंभूत वृतान्त पहायला मिळतो.

शब्बीरपूर येथील दलितावर झालेल्या घटनांबाबत विचार करण्यासाठी भीम आर्मीने सहारनपूर येथील संत रविदास वसतीगृहात महापंचायत बोलावली  होती. ९ मे रोजी बोलावलेल्या या महापंचायतीला आधी पोलिसांनी रीतसर परवानगी दिली होती. त्यात जो काही निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला सांगू असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते. त्याप्रमाणे राज्यभरातील तरुण ९ मे रोजी या पंचायतीसाठी जमायला सुरुवात होत असताना सकाळी ८ वाजता अशी परवानगी पोलिसांनी नाकारली. ऐन वेळी हा पंचायतीचा कार्यक्रम रोखणे आयोजकांना कठीणच होते. ठरल्याप्रमाणे तरुण जमा होत असताना पोलिसांनी जमणाऱ्या तरुणांना ठिकठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे हे सर्व तरुण बिथरल्याचा फायदा घेऊन समाजकंटकांनी शहरातील दुकाने, मोटारगाड्या यांना आगी लावण्याचा प्रयत्न केला. त्यात दम घुसमटून एका राजपूत तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे राजपूत समाज आणखीच चिडला. त्यांनी मृताच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अॅट्रोसिटी अॅक्ट रद्द करावा, चंद्रशेखर व इतर आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत. राजपुताच्या कुटुंबियांना १५  लाख रुपये आगाऊ मिळाले आहेत, पण दलितांच्या झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने काहीही जाहीर केलेले नाही.

भीम आर्मीसारखी संघटना स्थापन होण्यासाठी निमित्त झाले सहारणपूर येथील एएचपी कॉलेजमधील सामाजिक विषमतेचे. त्या कॉलेजमधील राजपूत-ठाकूर समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत दलित विद्यार्थ्यांना बसू देत नव्हते की, त्यांच्या नळावर पाणीही पिऊ देत नव्हते. दोन्ही समाजासाठी वेगवेगळ्या बसण्याच्या जागा व स्वतंत्र नळ आहेत. अर्थात ही पूर्वापार परंपरा असली तरी तिला आता शिक्षित दलित तरुणांनी विरोध करणे सुरू केले आहे. त्यामुळे दलित-सवर्ण वादंगाला सुरुवात झाली. त्यात तेथेच शिक्षण घेतलेल्या व आता वकील झालेल्या चंद्रशेखर आझादने पुढाकार घेतला. त्यातूनच दलितांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ‘भीम आर्मी’ म्हणजे ‘भारत एकता मिशन’ नावाच्या संघटनेचा जन्म झाला. या संघटनेतील तरुणांनी मोटार सायकलस्वारांचा एक जत्था तयार केला. परिसरात जेथे कोठे दलितांवर अन्याय झाला असेल तेथे हा जत्था जातो आणि आपल्यापरीने अन्यायाचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे संघटनेची सर्वत्र प्रशंसा होऊन त्यात जास्तीत जास्त दलित तरुण सहभागी होत आहेत. त्यांचा भौगोलिक परिसरही वाढत आहे.

सध्या या संघटनेचे जाळे उत्तर प्रदेशबरोबरच पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांत पसरले असून जवळजवळ १५,००० सभासद झाले असल्याची माहिती आहे. या संघटनेचे सभासद एकदुसऱ्याला ‘जय भीम’ असे अभिवादन करतात. त्यांच्या गळ्यात निळे उपरणे, मोटार सायकलवर ‘भीम आर्मी’चे स्टिकर असते. घराच्या दारावर व जेथे जमेल तेथे ‘भीम आर्मी’चे स्टिकर चिकटवले जाऊ लागले आहेत. पूर्वी दलितांना निरनिराळ्या कार्यालयात ज्या किरकोळ कामासाठी बरीच धावपळ करावी लागत असे, ती कामे आता ‘भीम आर्मी’च्या जत्थ्यामुळे सहज होऊ लागली आहेत. या जत्थ्यातील तरुणाजवळ मोटार सायकल आणि स्मार्ट फोनही असतो. शिवाय ते जातीव्यवस्थेला विरोध करतात. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांचे प्रेरणास्थान असल्याने हिंसक मार्गावर त्यांचा विश्वास नाही. पण राज्यघटनेतील तरतुदींची व समतेच्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे यावर मात्र त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्याकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रामध्ये डाव्या कोपऱ्यात भगवान बुद्धाची जशी प्रतिमा असते, तशीच उजव्या कोपऱ्यात संत रविदासाची प्रतिमा असते.

उत्तर भारतात संत कबीरासारखाच जातीव्यवस्थेला चांभार समाजातील संत रविदासांनी विरोध केला आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना आपले गुरू मानले आहे. त्याच प्रमाणे आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण व ते अस्पृश्य कसे बनले?’ हा ग्रंथ संत रविदासांना अर्पण केला आहे, हे येथे आपण ध्यानात ठेवावे. पॉप संगीताच्या आधारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची गाणी सर्वत्र लोकप्रिय होत असून दलित समाजातल्या तरुण-तरुणींतले गायकांचे जत्थेही तयार झाले आहेत. 

शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत या संघटनेच्या शाखा असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकारण्याही तयार झाल्या आहेत. खेड्यापाड्याच्या प्रवेशालाच ‘दि ग्रेट चमार’ लिहिलेले या संघटनेचे बोर्ड सर्वत्र लागत आहे. त्यावरूनही ग्रामीण भागात मोठे वादळ उठले आहे. कारण राजपुत संघटनेचे ‘दि ग्रेट राजपूत’चे बोर्ड पुर्वापार आहेतच, त्यात ही नवी भर पडल्याने आपल्या बरोबरीने हे आता यायला लागलेत की काय, याची सल त्या परिसरातील राजपूत-ठाकुरांना आहे. या संघटनेची महिला आघाडी असून ममता गौतम या आघाडीच्या प्रमुख आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारालाच प्रमाण मानून त्यांनी ‘हरिजन’ या शब्दाला विरोध केला आहे. ‘जब हमही खुद हरीको नहीं मानते, तो हम उनके जन कैसे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसा या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी (ज्यांना आपल्या नावापुढे ‘रावण’ लिहायला आवडते)  हे मात्र निक्षून सांगितले की, ‘निवडणुकीत आपणाला ‘हिंदू’ असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यानंतर ‘दलिता’सारखेच वागविले जाते.’ बरेच जण असे म्हणतात की, बीएसपीचा यांना पाठिंबा आहे. पण बीएसपीने ते स्पष्टपणे नाकारले आहे. तरीही सहारनपूर येथील घटनेसंबंधी जवळजवळ ५० एफआयआर नोंदवून झाले त्यात या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखरपासून तर बीएसपीचे माजी आमदार रविंद्रकुमार मोल्हु यांचाही त्यात समावेश आहे.

आता पोलिसांनी या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल केले असून या अध्यक्ष व आमदारासह बहुतेक जण फरार असल्याचे घोषित केले आहे. पण पळून गेलो नसल्याची ऑडिओ क्लिप चंद्रशेखर यांनी जाहीर केली असून २१ मे रोजी त्यांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. तेव्हा पोलिस प्रशासनाच्या ‘मुस्लिम आतंकवादी, आदिवासी माओवादी व दलित नक्षलवादी’ या आवडत्या सूत्रानुसार या घटनेत पोलिसांना ‘भीम आर्मी’चा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ‘सुगावा’ लागला आहे. त्यांनी त्या परिसरातील १०० गावांतील दलित तरुणांनाही त्यांचे ‘लक्ष्य’ केले आहे. पण शब्बीरपूर येथील दलितांवर सशस्त्र हल्ला करणाऱ्या राजपुतावर मात्र अद्यापपर्यंत साधे गुन्हेही दाखल केले नाहीत. यावरून मोदींचे योगी सरकार हे पक्षपाती व दलितविरोधी तर आहेच, पण दलितांवरील अत्याचाराचा घटनात्मक मार्गाने मुकाबला करणाऱ्या ‘भीम आर्मी’सारख्या संघटनेची पाळेमुळेच उखडून काढून तिला नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे, हे त्यांच्या कृत्यावरून दिसून येते आहे.

लेखक मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com                                

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.                                              

Post Comment

Praveen Bardapurkar

Wed , 24 May 2017

उत्सुकता बऱ्यापैकी शमवणारी माहिती आहे !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......