टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, संजीव जयस्वाल, कीर्ती आझाद, शरद पवार आणि रोपटी खाणारी म्हैस
  • Sat , 13 May 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya राज ठाकरे Raj thackeray संजीव जयस्वाल Sanjeev Jaiswal कीर्ती आझाद Kirti Azad शरद पवार Sharad Pawar म्हैस Buffalo

१. तूरखरेदीवरून शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा असून भाजपच्या दानवाकडून त्यांना अपेक्षा नाही, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा समाचार घेतला आहे.

टेररिझम हवा की टुरिझम, आयटी आणि आयटी यांचा समन्वयच देशाला आघाडीवर नेईल, अशा कोणत्याही गंभीर प्रश्नावर फुटकळ कोट्या करण्याचा विद्यमान पंतप्रधानांचा छंद पाहता भारताचे पहिले मराठी पंतप्रधान बनण्याची पात्रता राज ठाकरे यांच्यात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

..........................................................................................

२. ठाणे महापालिकेचे उपायुक्त, कवी संदीप माळवींना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली. कारवाईच्या दरम्यान त्यांनी एकदम दबंग स्टाइलमध्ये रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त करण्याचा निर्धारही महापालिकेने केला आहे. ज्या दुकानात माळवी यांना मारहाण करण्यात आली त्या एकविरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या सात दुकानांना पालिकेने सील ठोकले असून त्यांच्या शेड पाडण्यात आल्या आहेत. स्टेशन परिसरात रस्ते अडवून थांबलेले रिक्षाचालक, रस्त्यावर अतिक्रमण करणारे गाळेधारक आणि काही खासगी वाहनचालकांना आयुक्त आणि त्यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. त्यामुळे स्टेशन परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते.

वरवर पाहता ही एकदम फिल्मी कौतुकास्पद बातमी वाटते. जरा विचार करा, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अशाच प्रकारचा आक्षेप घेतला असता आणि त्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली असती, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून साक्षात आयुक्त अजय देवगण बनून बाहेर पडले असते का? स्टेशन परिसराला वेढा घातलेल्या फेरीवाल्यांचा हप्ता कोणाकोणाला जातो? स्टेशन परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त होईल, यावर एका तरी ठाणेकराचा विश्वास बसेल का? आणि तो का बसेल?

..........................................................................................

३. भारतात झाडांची पानं खाल्ली तर म्हशीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या म्हशीने चारा समजून रोपटी खाल्ली, हा तिचा गुन्हा असून पोलीस फक्त गुन्हा दाखल करण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या म्हशीला चक्क अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यात बलदेव कॉलेज परिसरात वनविभागाने लावलेली रोपटी एका म्हशीने फस्त करून टाकली.

ज्या देशात गाय ही माता असते आणि उंदीर दारू पिऊन लास होतात, तिथे म्हशीवर गुन्हा दाखल होण्यात काय अडचण आहे. आता हे पोलिस बैल (खरेखुरे, शिंगंवाले, उगाच गैरसमज नकोत) होते का, असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर त्यातही गैर काहीच नाही.

..........................................................................................

४. भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका ही नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका पक्षाचे माजी खासदार कीर्ती आझाद यांनी केली आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा विषय येतो, तेव्हा पक्ष सोयीस्कर मौन पाळतो, असं ते म्हणाले. मी जेव्हा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा (डीडीसीए) ४०० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला, तेव्हा त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा सहभाग होता. मात्र, पक्षाने जेटलींचा बचावच केला नाही, तर मला पक्षातून निलंबित केले. आता तोच भाजप पक्ष भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांना केजरीवालांचा राजीनामा मागण्याचा हक्क नाही, असं आझाद म्हणाले.

आझाद भाऊ, सध्याचा काळ वेगळा आहे. ज्या लोकांना २००० रुपयांच्या नोटेत अत्याधुनिक चिप बसवलेली असते आणि तिच्या साह्याने काळा पैसा नष्ट केला जाणार आहे, हे तंतोतंत पटलं होतं, त्यांना ईव्हीएममध्ये फेरफार केले जाऊ शकतात, यावर विश्वास बसणं कठीण जातं. अरविंद केजरीवालांनी लाल दिव्याचा त्याग केला की, मोठी नौटंकी ठरते आणि तीच आयडिया ढापून केंद्राने प्रसृत केली की, पंतप्रधान व्हीआयपी कल्चरचे कर्दनकाळ ठरतात... गावोगावचे वाल्या जिथे वाल्मिकी बनतात, अशा थोर पक्षाचा साक्षात अध्यक्षापासून जपलेला वारसा नाकारण्याची बुद्धी तुम्हाला कशी झाली आझाद भाऊ?

..........................................................................................

५. गेली १५ वर्षे आपण सत्तेत होतो. मात्र सरकार जाऊन अडीच वर्षे झाली तरी आपण सत्तेत असल्यासारखेच वागत आहोत. या मानसिकतेतून आपल्याला आता बाहेर यावं लागेल. लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

पवारांनी बहुधा त्यांच्याही नकळत १५ वर्षांची सत्ता कशी निघून गेली आणि वारंवार नादानी दाखवणाऱ्या, शेतकऱ्याला डिवचणाऱ्या, त्याचा अपमान करणाऱ्या भाजपसारख्या शहरी तोंडवळ्याच्या आणि व्यापारी वृत्तीच्या पक्षाला मतदार तरीही का निवडून देतायत, याचंही विश्लेषण करून टाकलं. जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढायचं ते फक्त विरोधी पक्षात असताना? सत्तेत असताना ‘सत्तेत असल्याची’ गुर्मी दाखवायची, यानेच सत्ता जाते, हे तेही शिकले नाहीत आणि विद्यमान भाजपवालेही शिकायला तयार नाहीत. जनता गुर्मीलाच मत देते, असा त्यांचा होरा जनतेनेच खरा ठरवला असावा.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......