टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सिद्धिविनायक मंदिर, बाबा रामदेव, अमित शहा, उद्धव ठाकरे आणि पांडुरंग फुंडकर
  • Fri , 05 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या सिद्धिविनायक मंदिर SiddhiVinayak Temple बाबा रामदेव Baba Ramdev अमित शहा Amit Shah उद्धव ठाकरे Uddhav Thackeray पांडुरंग फुंडकर Pandurang Phundkar

१. ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचे, त्यावेळी कोणीही त्यांची दखल घ्यायचे नाही,’ अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या तुलनेत कमी परदेश दौरे केल्याचा दावाही अमित शहा यांनी केला.

मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांतल्या दौऱ्यांची संख्या मोदींच्या तीन वर्षांमधल्या दौऱ्यांपेक्षा जास्त आहे, हेही खरं तर मोदींच्या झपाट्याच्या दृष्टीने लाजिरवाणं आहे. बाकी अमेरिकेचा अध्यक्ष एखाद्याला गुरूस्थानी मानतो, तेव्हा ते खांद्यावर हात टाकून एकेरीत हाक मारण्यापेक्षा कमी दखलपात्र असतं, हे शिक्षण तुम्ही पतंजलीच्या गुरूकुलातून घेतलं की, आसारामाच्या भोगविद्या केंद्रातून? अतीव दखलपात्र पंप्रंच्या दोस्तीला ऑस्ट्रेलियापासून तुर्कस्तानापर्यंतच्या देशप्रमुखांनी कसं तोंडघशी पाडलंय, ते दिसतंच आहे म्हणा.

..........................................................................................

२. जीएसटी संदर्भात शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. महापालिकेला लाचार होऊन केंद्र आणि राज्य सरकार दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महापालिकेची स्वायत्तता कायम राहावी असेही त्यांनी म्हटले आहे.

अहो काहीही काय बोलताय? विचार करणार? तुम्ही? कसला? इतक्या वर्षांनी बिनसवयीचं असं काही करायला गेल्यावर काही आंतरिक मोडतोड झाली तर जबाबदारी कोण घेणार? आपण आपल्याला जे जमतं ते करावं. भावना चेतवणं, दगड, वडापाव, अनेकांनी एकाला घेरून बडवणं वगैरे. विचाराबिचाराच्या फंदात कुठे पडताय? बरं गेली तीन वर्षं त्याच त्याच ताटाखालच्या म्याँव म्याँवला डरकाळ्या तरी किती काळ म्हणणार?

..........................................................................................

३. दहशतवाद्यांकडून एका जवानाचा बळी गेला तर आपण त्यांच्या १००जणांचा शिरच्छेद करण्यास मागेपुढे पाहू नये, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नियंत्रण रेषेवर दोन जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव बोलत होते. याबाबतीत भारताने इस्राइलचा आदर्श घेण्याची आवश्यकता असून, एक जवान गेला तर १०० दहशतवाद्यांचा खात्मा करायला हवा.

कोण आहे रे तिकडे? ते संरक्षणमंत्रीपद रिकामं आहे ना? तिथे या बोलबच्चनगुरूंना बसवा तात्काळ. त्यांनी नुकतीच (चमचेगिरीची) अर्हता प्राप्त केली आहेच. बाकी तोंडची फुकाची वाफ दवडण्याची अर्हता पहिल्यापासून आहे. यांना फक्त रणांगणावर पाठवू नका. जिवावर बेतण्याची भीती वाटली तरी वेषांतर करून पळ काढायला शिकवू शकतील हे फारतर सैनिकांना.

..........................................................................................

४. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचरणी २००९-१०मध्ये दररोज सरासरी १२ लाख २१ हजार रुपयांची देणगी वाहिली गेली होती. गेल्या सात वर्षांमध्ये हा दानाचा आकडा दुपटीने वाढला असून गेल्या नऊ महिन्यांत ७० कोटी ७० लाख रुपये (दररोज सरासरी २५ लाख ७० हजार रुपये) गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत शिर्डी संस्थानच्या साईबाबा मंदिरात भक्तांनी रोज सरासरी एक कोटी ५२ लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. सात वर्षांपूर्वी साईबाबांच्या चरणी दररोज सरासरी ५३ लाख रुपये दान केले गेले होते.

घ्या, देशाच्या आर्थिक विकासाचा आणखी किती पुरावा पाहिजे? बौद्धिक विकासाशी आपल्याला असंही फारसं काही देणं घेणं नव्हतंच कधी. या देवस्थानांच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांचं प्रसिद्धीविनायकांत रूपांतर करणाऱ्या प्रसारमाध्यमांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांनी आपल्या वाचकांची नस अचूक ओळखली आहे.

..........................................................................................

५. राज्याचे कृषिमंत्री आणि १५ आमदार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जातून कसा मार्ग काढला जातो, याचा अभ्यास करण्यासाठी ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्यावरून परतताना कृषिमंत्री आणि आमदार एक दिवस सिंगापूरलाही थांबणार आहेत. या दौऱ्यासाठी प्रत्येकी सहा लाखांचा खर्च येणार असून यामधील निम्मा खर्च सरकार करणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनेही तिथल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत की काय? इतक्या आवर्जून बरोब्बर त्याच देशांमध्ये हे सरकार अभ्यास करायला मंत्री पाठवतंय, म्हणजे तसंच काहीसं असणार. इथे सरकारच्या नावाने कंठशोष करणाऱ्या विरोधी पक्षांनाही या दौऱ्यात आपल्या आमदारांना पाठवण्यात काही गैर वाटलेलं नाही, हे पुरेसं बोलकं आहे. सिंगापूरमध्ये एक दिवसात ते हरळीच्या मुळ्यांवरचा तांबेरा आणि घायपाताच्या शिरांमधल्या खोंडअळीचा अभ्यास करणार आहेत, हे का गुप्त ठेवलं गेलंय?

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......