‘उंबरठा’... न ओलांडला गेलेला!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
आदित्य कोरडे
  • ‘उंबरठा’चं पोस्टर आणि स्मिता पाटील
  • Sat , 14 January 2017
  • मराठी सिनेमा उंबरठा Umbartha स्मिता पाटील Smita Patil गिरीश कार्नाड Girish Karnad जब्बार पटेल Jabbar Patel

चांगला सिनेमा कोणता? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असं नाही. चांगला सिनेमा हिट असो-नसो एक गोष्ट खरी की, त्याने उत्तम मनोरंजन केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की, तेवढंच पुरेसं नाही. तुम्ही थिएटरमधून बाहेर पडताना तो सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजे. सिनेमा कॉमेडी असेल तर नंतर बराच वेळ त्यातल्या गोष्टी आठवून मनातल्या मनात हसू फुटलं पाहिजे किंवा मर्डर मिस्टरी असेल तर नंतर आपण गुन्ह्याचे धागेदोरे जुळवत बसलो पाहिजे. उदाहरणार्थ गुलज़ारचा ‘अंगूर’ हा (संजीवकुमार, देवेन वर्माने काम केलेला) किंवा ‘अंदाज अपना अपना’ (आमीर खान, सलमान खान यांचा) हे चांगले कॉमेडी सिनेमे होते. तसाच नुकताच येऊन गेलेला ‘दृश्यम’ हाही असाच उत्तम मर्डर मिस्टरी आहे.

‘श्वास’ या चित्रपटानंतर मराठी सिनेमानं कात टाकली आणि एक सो एक दर्जेदार आणि चांगले सिनेमे मराठीमध्ये येऊ लागले. ‘देऊळ’, ‘बालकपालक’, ‘शाळा’, ‘रेगे’, ‘सैराट’ अशा सिनेमांवरून हे सिद्ध होतं. आता ‘श्वास’च्या आधी, खरं म्हणजे खूप आधी आलेला ‘उंबरठा’ हा सिनेमा घ्या. माझ्या मते हा मराठीतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. म्हणजे हा तसा चांगलाच गंभीर सिनेमा आहे.

त्याची कथा सुलभा महाजन नावाच्या सुखवस्तू स्त्रीभोवती फिरते. तशी बाई शिकली-सवरलेली, चांगल्या सुखवस्तू घरातली. एक गोड मुलगी, चांगला कमावता नवरा... बाहेर काही प्रकरण (सध्या तरी) वगैरे नसलेला. मोठा दीर चांगला डॉक्टर, सासूबाई नावाजलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, सासरेबुवा वारलेले, थोरली जाऊ प्रेमळ आणि निपुत्रिक. त्यामुळे हिच्या एकुलत्या एका मुलीवर आईप्रमाणे, किंचित आईपेक्षा जास्तच जीव.

थोडक्यात काय, कशाकशाची कमतरता म्हणून नाही! पण अशाच वेळी सुख दुखतं. सुलभाला काहीतरी करावं  असं मनापासून वाटायला लागतं. तिच्याकडे असलेल्या समाजशास्त्राच्या पदवीच्या जोरावर तिला दूरच्या एका खेड्यातल्या सरकारी महिला सुधारगृहात अधिक्षिकेच्या जागेवर नेमणूक मिळते. घरचे काहीशा नाराजीनेच संमती (?) देतात. सासूबाई थांबवायचा एक प्रयत्न करून पाहतात, पण ती जातेच.

तिथं सगळं काही इतर सरकारी संस्थेप्रमाणे गचाळ, भोंगळ, भ्रष्टाचारानं बरबटलेलं, अगदी होपलेस वाटावं असं वातावरण असतं. त्यात तिचा संघर्ष, संस्थाचालकांचा अमानवीय, तुसडा किंवा निष्काळजी दृष्टिकोन. अशा संस्थांमध्ये होणारा गैरकारभार, तिथल्या आधीच समाजाकडून, सासरकडच्यांकडून नागवलेल्या गेलेल्या स्त्रियांचं होणारं शोषण. सुलभाचा या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि बऱ्याचदा त्यात येणारं अपयश, याचं अत्यंत वास्तववादी आणि मन विषण्ण करणारं चित्रण या सिनेमात आहे. हे आज तसं काही नवीन वाटणार नाही, पण त्या काळी ते सनसनाटी होतं. आणि जसं ते जब्बार पटेल यांनी दाखवलं आहे ते तर सिम्पली ग्रेट.

एक लहानसा प्रसंग घ्या. ज्यात काही कामानिमित्त त्या गावात आलेला सुलभाचा नवरा (गिरीश कर्नाड) तिला भेटायला संस्थेमध्ये येतो. तेव्हा सुलभाला झालेला आनंद, त्याला कुठे ठेवू अन कुठे नको असा फक्त नजरेतून दिसणारा भाव तर स्मिता पाटीलच दाखवू जाणे, पण आश्रमातल्या स्त्रियांना वाटणारी रेक्टरबाईच्या नवऱ्याला बघायची उत्सुकता आणि काहीशी असूयादेखील ज्या बारकाईने जब्बार दाखवतात ते पाहून ते दिग्दर्शक म्हणून ग्रेट का आहेत ते कळतं.

समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल/ शोषणाबद्दल प्रामाणिकपणे वाईट वाटणारे आणि त्याचं यथाशक्ती परिमार्जन करू इच्छिणारे स्त्री-पुरुष काही कमी नाहीत, पण अन्यायाचं परिमार्जन आणि शोषितांचं पुनर्वसन करताना ते आपली पुरुषी मानसिकता सोडू शकत नाहीत. स्त्रियासुद्धा या पुरुषी, पुरुषप्रधान मानसिकतेच्याच असतात. दया डोंगरे हे एक असं ढोबळ पात्र आहे. पण नीट  जर पाहिलं तर लक्षात येईल की, सगळेच या मानसिकतेनं जखडलेले आहेत, अगदी सुलभासुद्धा.

एक छोटा प्रसंग आहे, ज्यात सुलभाचा वकील नवरा विरुद्ध बाजूच्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून एक केस सहजगत्या जिंकल्याचं सांगतो. ते सुलभा ऐकून घेते, पण त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, अगदी नजरेतूनसुद्धा आपल्याला हे आवडलं नाही असं दाखवत नाही. पण हीच सुलभा जेव्हा तिचा नवरा अगदी प्रामाणिकपणे ती घरी नसताना केवळ शारीरिक गरज म्हणून एका दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले याची कबुली देतो, तेव्हा ती ते सहन करू शकत नाही. विवाहित स्त्रीचं शरीर ही जशी नवऱ्याची खाजगी संपत्ती आहे, हा पुरुषी मानसिकतेचा भाग मानला जातो, तसाच हक्क स्त्रीचाही तिच्या नवऱ्याच्या शरीरावर असतो, असला पाहिजे ही मानसिकता काय आहे? मला माहीत आहे की, अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा सहन करतात, पण त्यात त्यांचा नाईलाजच जास्त असतो.

सुलभाने असा एखादा मार्ग पत्करला असता तर तो कसा वागला असता, हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. उत्तर आपल्याला माहीत आहे. सर्वसाधारण पुरुष असेच असतात. गंमत वाटते ती सुलभाची. ज्या कारणावरून ती स्वतःची मानखंडणा झाली असं मानून घराबाहेर पडते, त्यापेक्षा गंभीर असं कारण सिनेमात आधीच आपल्याला पाहायला मिळतं. पण ती त्याला चार खडे बोलसुद्धा सुनावत नाही. तिला अशा प्रकारे केवळ एक क्षुल्लक केस जिंकण्यासाठी एका स्त्रीच्या चारित्र्यावर तिच्या नवऱ्याने उडवलेले शिंतोडे आक्षेपार्ह वाटत नाहीत... ही खरी शोकांतिका आहे!

चांगल्या पगाराची नोकरी, पैसा मानमरातब सोडून समाजकार्य किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात उडी घेणारे पुरुष काही कमी नसतात. आपणसुद्धा त्यांच्याकडे कौतुकमिश्रित आश्चर्यानेच पाहतो, पण कशाकशाची कमतरता नसलेल्या, भरल्या घरातून(!) उठून आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र निवडणाऱ्या स्त्रीकडे आपण काय म्हणून पाहू? जशी एखाद्या पुरुषाची आनंद, सुख, यशाची व्याख्या पैसाअडका, मानमरातब, पद नसू शकते, तशीच एखाद्या स्त्रीची आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची कक्षा कुटुंब, नवरा, मूल यांच्या पलीकडे असू शकते, हे किती जणांना कळेल, पटेल, मान्य होईल? एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडली की, स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण ‘रामायणा’पासून पाहतोच आहोत! अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबीसुद्धा करू शकतो, नव्हे करतोच. स्त्रीने तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी-परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं  की, उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते, असा एक ढोबळ समज हा चित्रपट पाहून होतो. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनालाही पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे, हे दाखवून चित्रपट संपतो. सुलभाची मुक्ती अपूर्णच राहते. कमीत कमी एक उंबरठा तरी ती ओलांडू शकत नाही.

लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

Post Comment

203mogra@gmail.com

Sun , 15 January 2017

अप्रतिम


203mogra@gmail.com

Sun , 15 January 2017


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......