टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शरद पवार, जशोदाबेन, शिवाजी पार्क, प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका, नोटा
  • Tue , 20 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi शरद पवार Sharad Pawar सर्वोच्च न्यायालय Supreme Court

१. केंद्र सरकारने घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केले असून त्यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार दोन्हीचे उच्चाटन होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आगामी काळात देशाच्या प्रगती आणि विकासासाठी अशाच प्रकारे कार्यरत राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

आई आणि पत्नी यांची कर्तव्यं भारतीय स्त्रिया, पुरुषांना जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा, किती निष्ठेने निभावतात नाही? शिवाय बहुतेक वेळा त्या जगरहाटीबद्दल अतिशय भाबड्याही असतात.

………………………….

२. शेतात दावणीला बांधलेल्या बैलाला कधीतरी सुट्टी देतात. बैलपोळ्याला पूजा करून गोडधोड खायला दिले जाते, मिरवणुकाही काढल्या जातात; मात्र, राजकीय जीवनाला ५० वर्षे पूर्ण होत असताना आपण कधीही सुट्टी घेतली नाही आणि कामात कधी खाडा केला नाही. जनतेने सुट्टी दिली नसली, तरी मिरवणुका मात्र खूप काढल्या. : शरद पवार

नादिरशहाला खूप झोप यायची, तेव्हा त्याने एका ज्योतिष्याला विचारलं की, हे चांगलं की वाईट? तो ज्योतिषी म्हणाला, तुमच्यासारख्या लोकांनी जास्तीत जास्त काळ झोपून राहणं समाजासाठी नक्कीच चांगलं आहे. तुम्हीही अधूनमधून सुट्टी घ्यायला काय हरकत होती, पवारसाहेब?

………………………….

३. आयझॅक न्यूटन यांच्या गतिविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची बांधणीची प्रत (बाऊंड कॉपी) लिलावात ३.७ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या प्रचंड रकमेला विकली गेली आहे. आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे. १६८७ साली लिहिण्यात आलेल्या ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ‘बहुधा आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती’, असे केले होते.

करा, करा; गमजा करून घ्या आत्ताच जेवढ्या हव्या तेवढ्या. आमचा 'नरेंद्रचालिसा' बाजारात येईल, तेव्हा त्याच्या प्रतींच्या विक्रीचाही जागतिक विक्रम होईल आणि त्याचं हस्तलिखित याच्या दुप्पट किंमतीला विकलं जाईल, तेव्हा कळेल.

………………………….

४. आता आपल्याच खात्यात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम जुन्या नोटांच्या स्वरूपात भरताना उशीर का झाला, याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

या स्पष्टीकरणाचा एक सार्वजनिक तर्जुमा येणेप्रमाणे :- आपल्या खात्यात जुन्या नोटांच्या स्वरूपात वाट्टेल तेवढी रक्कम भरायला ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे, असं मान्यवर पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलं होतं. सगळ्यांनी धास्तावून पैसे भरण्याची घाई करू नये, शेवटच्या टप्प्यात बँकांसमोरच्या रांगा कमी होतील, तेव्हा पैसे भरावेत, असा सल्ला माननीय अर्थमंत्र्यांनी ११ नोव्हेंबर रोजी दिला होता. हे दोघे जबाबदारीने, नशापाणी न करता, संपूर्ण शुद्धीत बोलत असतात, अशा गैरसमजुतीने त्यांच्याच सल्ल्यानुसार पैसे भरायचो थांबलो होतो. त्यामुळे तेव्हा पैसे भरलेले नाहीत.

………………………….

५. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत शिवाजी पार्क मैदानावर नाताळ आणि नववर्ष साजरं करण्याची परनावगी दिली आहे. शिवाजी जिमखान्याने यानिमित्ताने शिवाजी पार्कवर खेळ व करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. मात्र शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रा’त येत असल्याने उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत अर्ज फेटाळला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन शिवाजी पार्कावर सगळे सणवार, कार्यक्रम रथयात्रा, दुर्गापूजा, गणेशोत्सव, नवीन वर्ष, दांडिया, छटपूजा, सत्यनारायण, साई भंडारे, प्रवचनं, नागपंचमी, हळदीकुंकू, मंगळागौरी, फुगड्या स्पर्धा, चमचा लिंबू वगैरे सगळ्याच जीवनावश्यक सार्वजनिक उपक्रमांना ब्लँकेट परवानगी देऊन टाका. शांतता क्षेत्र नावाच्या विनोदी संकल्पनेतून पार्काला मुक्ती द्या. आसपासच्या सगळ्या रहिवाशांना वर्षभर पुरतील एवढे कापूसबोळे पुरवा म्हणजे झालं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......