टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्णब गोस्वामी, रावसाहेब दानवे, चंद्राबाबू नायडू, पेटीएम आणि धसई गाव
  • Mon , 19 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अर्णब गोस्वामी Arnab Goswami कॅशलेस वसाहेब दानवे Raosaheb Danve नोटबंदी Demonetisation चंद्राबाबू नायडू Chandrababu Naiduपेटीएम Paytm

१. ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीचे माजी मुख्य संपादक अर्णब गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाने नव्या इनिंग्जला सुरुवात करणार आहेत. ‘माझ्या नव्या वाहिनीचे नाव ‘रिपब्लिक’ असेल. मी यासाठी भारतीयांकडे पाठिंब्याचे आवाहन करतो,’ असे गोस्वामी यांनी म्हटले आहे.

अर्णबला सत्ताधाऱ्यांची पाठराखण करता करता त्यांच्या सवयीही जडलेल्या दिसतायत. असंही तो सगळं काही (अंघोळ, भांग पाडणे, पेन्सिल नाचवणे वगैरे सगळं काही) देशाच्या वतीनेच करायचा. म्हणूनच आपल्या व्यवसायाला सगळ्या भारतीयांनी 'पाठिंबा' द्यावा, असं आवाहन केलंय त्याने. अरे बाबा, तू ज्या भाषेत बोलतोस टीव्हीवर ती भाषा (इंग्रजी आणि उद्दामपणाची) या देशात फारच थोड्यांना अवगत आहे. बाकीच्यांसाठी ध्वनीप्रदूषणात भर, यापलीकडे काय अर्थ असणार तुझ्या वाहिनीचा?

……………………………………….

२. नोटाबंदी सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी राज्यातली वाइन शॉप्स आणि तिथले मद्यपी खरेदीदार कॅशलेस व्यवहार करू लागले. वाइन शॉपवर कार्ड स्वाईप करून व्यवहार होऊ लागले. दारूची तहान कॅशलेस व्यवहारांच्या तहानेत परिवर्तित झाली. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मात्र अशी निकड, अशी तहान दिसत नाही. ही मानसिकता असेल, तर देशात डिजिटल क्रांती कशी होणार? : आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

सर्व सरकारी अधिकाऱ्यांना ऑन ड्युटी पेयपानाची मुभा दिली किंवा त्यांच्यावर ती सक्तीच केली, तर देश लवकर कॅशलेस होईल काय? नाहीतरी सरकारचे बरेच निर्णय कसल्या तरी तारेत घेतल्यासारखेच वाटतात सर्वसामान्य माणसांना. निदान आता तसं थेट म्हणायची सोय तरी होईल.

……………………………………….

३. नोटांबदीमुळे लोकांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने पेटीएमची मदत घेतली. नोटाबंदीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पेटीएमच्या जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचिदेखील झळकले. मात्र आता या अॅपद्वारे पेमेंट करताना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटच्या सहाय्याने पेटीएम सेवेचा वापर करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कॅशलेस इंडियासोबतच डिजिटल इंडियाचादेखील फज्जा उडताना दिसत आहे.

कोण आहे रे तिकडे? या बातमीदाराला पाकिस्तानला धाडा. राजाचा लाडका पोपट मेला आहे, असं म्हणायचं नसतं; तो शवासनात गेला आहे, असं सांगायचं असतं, नाहीतर आपल्यावर शवासनात जाण्याची वेळ येऊ शकते, इतका साधा नियम माहिती नाहीये त्याला!

……………………………………….

४. मतदानाच्या आधी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचे स्वागत करा. निवडणुकीची आधीची रात्र खूप महत्त्वाची असते. तुम्हाला अचानक लक्ष्मीदर्शन होईल. अशा अचानक आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करा. ती परत करू नका. पण मतदानाचा निर्णय पक्का करा. :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

निवडणुकीआधी लक्ष्मी येते घरा, तिचे स्वागत करा, हाच निवडणुका जिंकण्याचा मंत्र खरा. पण, दानवेसाहेब, हे जरा माननीय मुख्यमंत्रीसाहेबांना सांगा, जमल्यास पंतप्रधानांना सांगा; त्यांची अशी गैरसमजूत झालीये की, त्यांनी काळा पैसा खणून काढण्याच्या नावाखाली लोकांवर लादलेली नोटाबंदीची गैरसोयच लोकांना खूप भावली आहे आणि तिला प्रतिसाद म्हणून निवडणुकांमध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळतं आहे.

……………………………………….

५. मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले रोखरहित गाव असल्याचा गवगवा सरकारी पातळीवरून करण्यात आला असला, तरी या गावातील बहुतांश व्यवहार अजूनही रोखीनेच होत असल्याचे दिसते. रोखरहित व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत व्यवस्थेचा अभाव, दुबळी बँकिंग यंत्रणा तसेच नागरिकांमधील या व्यवहारांबाबतची अनास्था यामुळे ‘कॅशलेस धसई’ फक्त प्रचार आणि घोषणांतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील ग्रामस्थ दैनंदिन खर्चासाठी दररोज लाखो रुपये गावातील बँकेतून काढत असून, डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्यादेखील सुमारे पाच ते दहा टक्केच असल्याचे दिसते आहे.

एकदा सरकारने आणि परिवारातल्या संघटनांनी एखादी गोष्ट अशी अशी आहे, असं सांगितल्यानंतर वर्तमानपत्राच्या वार्ताहरांनी तिची खातरजमा करण्याचा अगोचरपणा करावाच कशाला? सरकारच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध बोलणं किंवा त्यातले दोष दाखवणं हा द्वेष आणि देशद्रोह आहे, याची कल्पना नाही का या वर्तमानपत्राला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......