टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘रईस’चे पोस्टर, मोहन प्रकाश, केजरीवाल-मोदी आणि तिरंगा
  • Tue , 13 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal राष्ट्रगीत National anthem रईस Raees

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे धोरण राबवून भारतातील पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्याचवेळी शाहरुख खानने राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिरा खान या पाकिस्तानी नायिकेची भूमिका असलेल्या 'रईस' या त्याच्या आगामी चित्रपटाला मनसेकडून विरोध होऊ नये, असे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही सेन्सॉरसंमत सिनेमाला सरकार संरक्षण पुरवेल, त्यासाठी सक्तीची देणगी देण्याची गरज नाही, असं सांगितलं आहे.

यांच्यातल्या कोणालाही पाकिस्तानी कलावंतांचं काहीही पडलेलं नाही, सगळ्यांना पाकिस्तानच्या काठीने आपल्याच धोतरात शिरलेले विंचू मारायचे आहेत, हे किती सहज स्पष्ट होतं नाही? 'रईस'वाले तिन्हीकडे ऐच्छिक 'मार्केटिंग फी' देतील, यात शंका नाही. ती न दिल्यामुळे बिचाऱ्या गौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'मध्ये अली जफर हा पाकिस्तानी कलावंत असूनही कोणी त्याविरोधात आंदोलनं करून त्याची पब्लिसिटी केली नाही.

…………………….

२. नोटाबंदीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच पश्चिम बंगाल, तमिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील पुण्यात मोठय़ा प्रमाणावर जमिनींची खरेदी कशी केली, त्यांच्या आमदार, खासदारांच्या घरात कोटय़वधींच्या नव्या नोटा कशा आढळतात, याचे उत्तर काळे धन शोधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम द्यावे, असे आव्हान अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पुण्यात दिले आहे. 

तुम्ही फक्त त्यांची नावं सांगा, पॅन नंबर सांगा, अकाउंट नंबर सांगा. नंबर दोन फकीर आणि नंबर दोन सचोटीवीर अमितभाई शाह हे लगेच सगळ्या संबंधित माणसांच्या अकाउंटवरचे व्यवहार सीएमार्फत तपासून बघतील आणि क्लीनचिट देऊन टाकतील. नोटाबंदीविरोधात काही बोलू-लिहू नका, असा आदेश काढणारी सीए संघटनाही निष्पक्षपणे चौकशी करेल, यात शंका बाळगू नका.

…………………….

३. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने चेन्नईत तिघांना मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्यांमध्ये एका तरुणाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. जवळपास २० जणांनी या तिघांना मारहाण केली.

सिनेमागृहात राष्ट्रगीताला कोण उभं आहे, कोण बसलंय, याच्या भोचक उठाठेवी करणाऱ्या अनाम राष्ट्रवीरांनी सिनेमा सुरू असताना आपसांत बडबडणं, फोनवर बडबडून कुणाला तरी पकवणं, दर पाच मिनिटांनी मोबाइल स्क्रीन प्रज्वलित करून आपण फेसबुकवर नसल्याने कोणी आत्महत्या केल्यात काय, याची माहिती घेणं, आपली पोरं गँगवेमध्ये हुंदडायला सोडून देणं, ही राष्ट्रकार्यं करणं थांबवलं तर ते अधिक श्रेयस्कर होईल. हे करून सिनेमाच्या आस्वादात अडथळा आणणाऱ्या सिनेकंटकांना बसवा ना राव जरब; ही अधिक गुन्हेगारी स्वरूपाची कृत्यं आहेत.

…………………….

४. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय राजकारण्यांच्या यादीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या अडीच कोटींहून अधिक आहे.

या दोघांना अनुक्रमे ट्विटरइंडियाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान घोषित करण्याची काही व्यवस्था आहे का? हवं तर मोदींना आकाशवाणीचेही पंतप्रधान जाहीर करता येईल. म्हणजे, हे दोघे 'आपल्या राज्यात' सुखनैव एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसतील आणि या संवादसाधनांच्या पलीकडे जो आम भारत वसला आहे, त्याला निदान शांततेचं तरी सुख लाभेल.

…………………….

५. केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर अचानक बंदी आणल्याचा सर्वाधिक परिणाम मॅरेज इंडस्ट्रीवर झाला आहे. अनेक शहरांमधल्या मंगल कार्यालयांमध्ये होणारे विवाहसोहळे पुढे ढकलले गेले आहेत. विवाहसोहळ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना शेकडो कोटींचा फटका बसला आहे.

त्यांनी एक झटपट संघटना बनवून लवकरात लवकर सत्ताधारी 'परिवारा'त शिरावं… तिथे कौटुंबिक लग्नसोहळ्यांनाही तोटा नाही आणि नव्या नोटांनाही तोटा नाही. कितीही साधेपणाने केली, तरी काहीशे कोटींच्या खाली लग्नंच होत नाहीत त्यांच्यात. सगळ्यांनी मिळून त्या लग्नांची कंत्राटं घेतली तरी तोटा भरून निघेल सगळा. शिवाय रेड वगैरे पडण्याचा धोका नाही, तो फायदा वेगळाच!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......