उदाहरणार्थ त्यांचं ‘ते’ असणं...
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
वासंती दामले
  • ज्येष्ठ पत्रकार सईद नक़वी
  • Sat , 22 October 2016
  • वासंती दामले Vasanti Damle Vinod Mehta Saeed Naqvi विनोद मेहता सईद नक़वी Being the Other बीइंग द अदर

सईद नक़वी यांचं ‘बीइंग द अदर’ हे नवं पुस्तक त्याच्या शीर्षकामुळे कोड्यात पाडतं. विनोद मेहता व सईद हे ला मार्तीनेरसारख्या, ब्रिटिशकाळापासून उच्चवर्गीयांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाळेत, एकाच वर्गात शिकले, हे मेहतांच्या ‘लखनौ बॉय’ या आत्मचरित्रातून कळलं होतंच. दोघेही यशस्वी व प्रसिद्ध पत्रकार! त्यांची आत्मचरित्रं वाचताना त्यांच्यातील साम्य इथंच संपतं हे लक्षात येऊ लागतं. विनोद मेहता पंजाबी, परंतु फाळणीपूर्वीच त्यांचे वडील भारतात, लखनौला येऊन वसले. फाळणीचा त्यांचा अनुभव, त्यावेळी असंख्य नातेवाईक घरात होते आणि त्यांची आपापसातील फाळणीविषयीची बोलणी एवढाच सीमित होता. ही बोलणीसुद्धा कानावर पडली तेवढीच, कारण विनोद तेव्हा लहान होते. त्यामुळे नंतरही सुखी व स्वच्छंदी आयुष्य घालवण्यापलीकडे त्यांच्या आयुष्याबद्दल इतर काही कल्पना नव्हत्या. त्या काळातील वातावरणाचा परिणाम म्हणून ते उदारमतवादी, मानवतावादी झाले. यात लखनौच्या संस्कृतीचा हिस्साही असणार, कारण तिथला हिंदूही सवयीनं आदाब व खुदा हाफिज करणार. सहजतेनं त्याला अनेक शेर मुखोद्गत असणार. अदब व उर्दू भाषा या  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हिस्साच असणार. त्याचबरोबर त्यापैकी काही कट्टर हिंदू जातीवादी व धार्मिकही असणार. यात त्यांना काही विसंगत वाटणारही नाही, कारण ते तसं नसतंही. धर्म व संस्कृती या बाबी वेगळ्या असतात हे त्यांना माहीत होतं.

नक़वींचं घर उच्चवर्णीय- सय्यद. त्यांच्या घरातील रीतभात आजूबाजूच्या वातावरणाला साजेशी. सईद लिहितात की, धर्म मुसलमान पण संस्कृती जास्त हिंदू. उदा. त्यांच्या घरात गर्भवती असली की, जी गाणी म्हटली जायची त्यापैकी त्यांच्या आईचं सर्वांत आवडतं गाणं होतं- ‘ अल्लामिया हमरे भय्याको का दियो नंदलाल’. अवधच्या इतर स्त्रियांप्रमाणे त्यांच्या घरातील स्त्रियाही कायम साडीत असायच्या. त्यांचं कुटुंब इराणहून आलेलं शियापंथीय. पण त्यांच्या आजीच्या पिढीच्या स्त्रिया घरात अवधी बोलायच्या. फारफार तर नंतरच्या पिढ्या औपचारिक बोलताना उर्दूचा वापर करत. त्यांच्या कुटुंबातील, पर्यायानं अवधी कुटुंबातील संस्कृतीचं वर्णन सईद यांनी फार मनोहारी केलेलं आहे. मेहता व नक़वी यांच्या अवधी संस्कृतीचं वर्णन वाचताना, साऱ्या भारतातच असलेल्या संस्कृतीच्या वैविध्याचं सहज भान येतं.

फाळणीचा परिणाम साहजिकच याही कुटुंबावर झाला, कदाचित जास्त झाला. जे कुटुंब स्थिर व घट्ट कौटुंबिक धाग्यानं बांधलं गेलं होतं ते अचानकपणे विभागलं गेलं आणि तेही फाळणीविषयी स्पष्ट आकलन न होता. ते स्पष्ट करताना नक़वी त्यांच्या नानीअम्माचं उदाहरण देतात. त्या कधी अवधच्या बाहेर गेल्या नाहीत. त्यांना पासपोर्ट हा प्रकारच समजायचा नाही. त्यांना हेही कळायचं नाही की त्यांच्या दोन मुलींनी परका देश- पाकिस्तान- राहण्यासाठी का निवडला? त्यांची इच्छा होती की, त्यांचं दफन मुस्तफाबादला व्हावं, पण त्या मुलींना भेटायला लाहोरला गेल्या असताना आजारी पडल्या. त्याच वेळी त्यांचा भारतीय पासपोर्ट संपला. ‘माझा भारतीय पासपोर्ट द्या’चा जप करत त्या वारल्या. त्यांना इकडं आणणं अशक्य होतं, त्यांचं तिकडंच दफन करावं लागलं. प्रथमपासूनच त्यांचा पाकिस्तानात मुलींचा विवाह करण्यास विरोध होता, पण मुंबईपेक्षा लाहोर जवळ आहे असं नकाशावर दाखवून त्यांना फसवण्यात आलं होतं. इतर अनेक पुस्तकांनीही फाळणीचं हे वास्तव मांडलं आहे.

कमलाबेन पटेल फाळणीनंतर कराचीत अपहरण केलेल्या स्त्रियांसाठी काम करत होत्या. त्याही हेच म्हणतात. के.ए. अब्बास आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, त्यांच्या कुटुंबातील शिकलेल्या लोकांनी पाकिस्तानात जाणं मान्य केलं, कारण मुसलमानांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं पाकिस्तानात नोकरीत बढती लवकर मिळेल. पण अब्बासना ते म्हणाले, ‘घर विकणार नाही कारण निवृत्तीनंतर आपल्याच ‘भूमीत’ परत येणार.’ राही मासूम रझाही आपल्या गावातील मुसलमानांबद्दल हेच सांगतात. हे सर्व वाचताना वाटतं की, फाळणी ही काहींना लाभदायक असेल, परंतु असंख्यांची फसवणूकच झाली. अनेक कुटुंबं परत कधीच एकत्र येऊ शकली नाहीत. जमीन सुधारणा कायदा हा त्यांच्या दृष्टीतून त्यांच्यावर आणखी एक आघात झाला असं नक़वी यांचं म्हणणं आहे.

नक़वी यांनी जे वर्णन केलं आहे त्यावरून आपल्याला, ‘स्वत:च्या जगण्याच्या प्रेमात पडलेली जमात’ म्हणजे अवधी मुसलमान असं समजतं. त्यांची उर्दू भाषा, तिचे उच्चार, तहजीब इत्यादी. त्या लखनवी वागण्या-बोलण्यातलं मार्दव व अदबही टोकाची. दिवसभराचे त्यांचे उद्योग म्हणजे चटपटीत बोलत, शायरी पेरत, चतुर संभाषण करणं हेच असायचं. नक़वी म्हणतात, तसं सुखासीन आयुष्य व ऱ्हास यात फक्त एक बारीक रेषा असते. कुळे आणून द्यायची त्या पैशांवर यांची कालक्रमणा चालायची. नोकरी करण्याची मानसिकता वा योग्य शिक्षणाअभावी कुळकायदा झाल्यावर नक़वी यांच्या अनेक नातेवाईकांची परवड झाली.

स्वत:च्या संस्कृती व भाषेच्या आत्यंतिक अभिमानानं ज्या इंग्रजी शिक्षणाला आजवर विरोध केला, त्याच शिक्षणाची कास स्वातंत्र्यानंतर व जमीन सुधारणांमुळे उत्पन्न घटल्यानंतर नक़वी घराला धरावी लागली. सईद म्हणतात की, महाविद्यालयात त्यांच्याबरोबर आणखी दोन शिया विद्यार्थी होते. एक श्रीनगरचा व दुसरा बंगलोरचा. तेव्हा त्यांना जाणवलं की, लखनौचे शिया ही एक वेगळीच जमात आहे. त्यांच्या घरातच कधी नमाजी कट्टरपण नव्हतं. त्यासाठी ते सूफी संताच्या प्रभावाचं कारण देतात. त्यांच्या मते, सुफी संतांची अल्लाशी एवढी एकतानता झालेली असते की, नमाज, रोजे वा हजला ते बाह्य अवडंबर समजतात. 

अशा वातावरणात वाढलेला लेखक पुढे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारतो आणि समाजाला सन्मुख जाऊ लागतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतात. जेव्हा धार्मिक दंगली घडतात तेव्हा त्याला त्या दंगलींच्या मुळाशी जावंसं वाटतं. तसं तो जातोही. त्यासाठी तो पुस्तकं वाचतो, दंगलींच्या जागांना भेट देतो. तो म्हणतो की, जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली, पण मुसलमानांना स्वतंत्र भारतात योग्य स्थान मिळावं यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. आयेशा जलाल व अब्दुल कलम आझादांच्या पुस्तकाचा त्यासाठी ते आधार देतात. ते म्हणतात की, शेवटी जिन्नांपेक्षा पटेलच फाळणीला उत्सुक होते. त्यामुळे जिन्ना व मुस्लीम लीगपेक्षा, काँग्रेस व नेहरू-पटेलच फाळणीला जास्त जबाबदार आहेत. आजच्या हिंदुत्वाचा उदयही यामुळेच झाला आहे. इतिहासकार प्रा. बिपनचंद्र या युक्तीवादाशी असहमत होते. त्यांच्या मते धर्माचं राजकारण एकदा सुरू केलं की, त्याचा अंत आपल्या हातात नसतोच. मुस्लीम लीग व जिन्नांच्या राजकारणाचा अंत फाळणी हाच होता.

नक़वींनी मुरादाबादपासून ते २००२च्या दंगलींचा अभ्यास केला. त्याचा सविस्तर अहवाल या पुस्तकात दिला आहे. तो वाचनीय आहे. या दंगलींचा अभ्यास करताना त्यांना जाणवतं की, लहानपणापासून ते स्वत: अथवा त्यांच्या कुटुंबाला कधी भारतात परकं वाटलं नाही. अगदी फाळणी झाल्यावरही नाही. कारण फाळणीची मीमांसा करताना ते म्हणतात की, मुस्लीम लीग व पाकिस्तानला पाठिंबा देणारा वर्ग तालुकदार व जमीनदार यांचा होता. त्यांना स्वत:चं उच्च सामाजिक स्थान व जमीनजुमला अबाधित ठेवायचा होता. आजही पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गात हेच बहुसंख्येनं आहेत. नक़वींच्या मते, सामान्य मुसलमानांना गंडवण्यात आलं. (याची असंख्य उदाहरणं आहेत.) फाळणी नंतरही ते त्यांचं जीवन नेहमीसारखंच, म्हणजे इथंच त्यांचे पारंपरिक उद्योगधंदे सांभाळत जगत आले. पण हळूहळू दंगलींमुळे आपण ‘ते’ आहोत (त्याला नक़वी ‘other’ म्हणतात), अशी भावना व असुरक्षितता मुसलमानांच्या मनात येऊ लागली. नकवी म्हणतात, ही परकेपणाची भावना माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात मी पाहिली व त्याचं मला अपार दु:ख झालं.

हे पुस्तक नक़वीचे आरोपपत्र नाही तर कैफियत आहे. त्यासाठी स्वत:ची बाजू पटेल अशा युक्तीवादांसह त्यांनी मांडली आहे.

मेहता आणि नक़वी यांची पुस्तकं चित्तरंजक व माहितीपूर्ण आहेत. नक़वींनी स्वत:च्या बालपणाची माहिती सविस्तर दिली असली तरी नंतरच्या खाजगी आयुष्याविषयी फार काही लिहिलेलं नाही. मेहतांनी आवश्यक तेवढं लिहिलं आहे. मात्र गुगलवर दोघांवर बरीच माहिती आहे. दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत. (मेहतांचं दुसरं पुस्तक  ‘एडिटर अनप्लगड’हेही पत्रकारीतेविषयीच आहे.) पत्रकारितेच्या जगात आलेली ही दोन्ही पुस्तकं वाचनीय व विचारणीय आहेत. 

बिइंग द अदर : द मुस्लिम्स इन इंडिया - सईद नक़वी, अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली, पाने - २५६, मूल्य - ५९९  रुपये.

 

लेखिका मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......