‘हत्या’ करून ‘विचार’ मारता येत नाही, हेच गेल्या पाच वर्षांनी दाखवून दिलं आहे!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • Mon , 20 August 2018
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस Scientific Temper Day २० ऑगस्ट 20 August

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत डॉ. दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसे असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. लेखक विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे ‘शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं.’ त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते.

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर यांच्याइतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. ‘बांधव हो विचारकलहाला का भिता?’ या ‘सुधारक’कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टिकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे डॉ. दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून तरुणांनाही लाज वाटत असे. ‘हे सर्व कोठून येते?’ हा प्रश्नाचे डॉ. दाभोलकर यांच्यापुरते असे होते की, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.  

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मीळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरू झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास महाराष्ट्राचे सौहार्द नामशेष करू या, दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्षे मागे नेऊन ठेवले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने कोणा एका समाजाचे नुकसान झाले नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान झाले आहे. 

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. डॉ. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण डॉ. दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती.

डॉ. दाभोलकरांचा देवावर विश्वास नव्हता आणि बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वांत महत्त्वाचा आहे, या धारणेने डॉ. दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की, ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खरे तर कांगावखोर असतात. कारण त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना डॉ. दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण जॉर्ज ऑरवेलने म्हटले आहे की, ‘काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही.      

डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन आज पाच वर्षे झाली. नुकतीच त्यांच्या मारेकऱ्यांना सीबीआय आणि एटीएसने अटक केली आहे. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने गेली पाच वर्षे शोध घेत होती, पण मारेकऱ्यांचा तपास नीट दिशा पकडत नव्हता. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेचे अनेकदा कानही उपटले होते. न्यायालयाने तपास यंत्रणेला २० ऑगस्टची मुदत दिली होती. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक केली गेली आहे. या अटकेमागे राज्य व केंद्र सरकारचा आगामी निवडणुकांचा डाव आहे असे बोलले जात आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी संस्था-संघटना यांचा संताप शांत करण्यासाठी संशयित मारेकऱ्यालाच अटक करण्याचा डाव साधला गेला आहे, असाही आरोप होतो आहे. राज्यातल्या व देशातल्या विद्यमान घडामोडी पाहता, ही शंका वावगी ठरण्याजोगी नाही. कारण गेल्या पाच वर्षांत तपास यंत्रणांना जे जमले नाही, ते आताच कसे जमले, हा प्रश्न आहे. तपास यंत्रणा न्यायालयात अटक केलेल्या तथाकथित मारेकऱ्याविरोधात किती सबळ पुरावे सादर करतात, यावरून ते येत्या काळात सिद्ध होईलच.

दरम्यान डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या दिवसापासून पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर हिंदुत्ववादी संस्थांविषयी शंका उपस्थित करत आहेत. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे की, नाही याची चर्चा करत आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फार तर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी ‘लोकसत्ता’मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार ‘पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे’. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे.

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरे या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वॉश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते.

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राह्मण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वांत जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरू होते.

डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्या ही या चढेल आक्रमकपणातून झाली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि डॉ. दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते.

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार फारसे घडत नाहीत.          

डॉ. दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबलेले नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. डॉ. दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली होती आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल. 

थोडक्यात, डॉ. दाभोलकरांची हत्या करून त्यांचा विचार मारता येत नाही, हेच गेल्या पाच वर्षांनी दाखवून दिलं आहे!

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Aditya Apte

Tue , 21 August 2018

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे निश्चित आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे, पण त्यांचे उदात्तीकरण करताना 90 टक्के लोक (नेहमी) अविचारी असतात असा संदर्भ देणं म्हणजे लोकशाहीच्या पायावरच अविश्वास दाखवणं आहे. किमान डॉक्टरांच्या अनुयायांकडून तरी अशी आपेक्षा नाही. या अनुचित व म्हणून "अविवेकी" उल्लेखाचा निषेध! डॉक्टर दाभोलकरांना पुनःश्च नम्र आदरांजली!!!


Aditya Apte

Tue , 21 August 2018

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे निश्चित आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे, पण त्यांचे उदात्तीकरण करताना 90 टक्के लोक (नेहमी) अविचारी असतात असा संदर्भ देणं म्हणजे लोकशाहीच्या पायावरच अविश्वास दाखवणं आहे. किमान डॉक्टरांच्या अनुयायांकडून तरी अशी आपेक्षा नाही. या अनुचित व म्हणून "अविवेकी" उल्लेखाचा निषेध! डॉक्टर दाभोलकरांना पुनःश्च नम्र आदरांजली!!!


namdeo Gundale

Mon , 20 August 2018

डॉक्टर दाभोलकर नितीमान होते , समाजाने विज्ञाननिष्ठ असावे यासाठी प्रयत्नशील होते, या मार्गावर आपला घात आहे , या धोक्याविषयी ते सजगही होते. तरीही समाजासाठी हा धोका पत्करण्याची त्यांची तयारी होती ! ' मित्रा , टाक ती बंदूक..... ' हा संदेश ज्यांच्या कानांपर्यन्त पोचलाच नाही , त्यांनी त्या हत्येच्या सूत्रधारांनी, बंदूकधारी हातांनी महाराष्ट्राला शंभर वर्ष मागे नेले हे खरेच आहे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख