चला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया! 
पडघम - देशकारण
राहुल माने
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • Mon , 20 August 2018
  • पडघम देशकारण डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस Scientific Temper Day २० ऑगस्ट 20 August

सत्य आणि विवेक हे निर्भय असतात, स्व-प्रकाशमान असतात आणि भूतकाळ-भविष्यकाळ यांच्या बदलत जाणाऱ्या संबंधांचं सूक्ष्म आकलन करणारे असतात. प्रगतीच्या पंखांना प्रश्न विचारण्याची ऊर्जा मिळाली की, नवनिर्मितीच्या आकाशात ते झेपावू लागतं. परंतु पंखांना जर अंधभक्तीचे डोहाळे लागले तर तुंबलेल्या परंपरांच्या पालख्या वाहण्याचं काम ते आपलं शहाणपण गहाण ठेवून व सत्तेच्या पायावर लोळण घेत सदैव करत असतं.

आजवरच्या आपल्या इतिहासात कुतूहलाच्या मासूम, परंतू मूलभूत मानवी आकांक्षा असलेल्या स्वप्नांचा संकुचित वृत्तीनं स्वत:च्या फायद्यासाठी सर्व सामाजिक भेदांचा वापर करणाऱ्या माणुसकीच्या शत्रूंनी नेहमीच चुराडा केला आहे. भक्ती संप्रदायाची शेकडो वर्षांची आध्यात्मिक समता रुजवण्याची परंपरा, सामाजिक न्यायाची समता प्रस्थापित करण्यासाठी विविध चळवळी मार्गी लावण्यासाठीचा प्रवास, तसेच स्वातंत्र्यलढ्यातील गुलामगिरीला संपवण्यासाठी आजवर अनेकांनी बलिदान दिलं. परंतु या तिन्ही काळात सरंजामशाही, राजेशाही, भटजीशाही आणि विलायती साम्राज्यशाही ही कधी नव्हे एवढी प्रचंड मजबूत होती. त्यामुळे हुतात्मे होणं ऐतिहासिकदृष्ट्या समजण्यासारखं होतं. परंतु भारतीय स्वातंत्र्यानंतर आणि विशेषत: भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर हुतात्म्यांची संख्या वाढत असेल तर परिस्थिती चिंताजनक आहे, असंच म्हणावं लागेल.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं राज्यघटना अधिकृतरित्या या देशाच्या लोकांना अर्पण केली. त्याआधी या देशामध्ये कधीही घटनेचं राज्य नव्हतं. जे काही होते ते हितसंबंधी अशा स्थानिक संस्थानिकांचे व वसाहतवादी राजकारणातून वर आलेल्या जाचक नियमांना अनुसरून तयार केले गेलेले एकतर्फी कायदे-कानून. या पार्श्वभूमीवर देश स्वतंत्र झाल्यापासून घटनात्मक तरतुदींची सुरक्षा असणाऱ्या देशामध्ये मानवधर्माचा, विवेकाचा पुरस्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाऱ्या लोकांचा द्वेष करणारी सत्ताकेंद्रं ही आधी पण होतीच, मात्र आता घटनापुरस्कृत लोकशाही राज्यामध्ये ती जास्त प्रभावी होत चालली आहेत, ही आणखी चीड आणणारी गोष्ट आहे.

पाच वर्षांपूर्वी अशाच एका ध्येयनिष्ठ माणसाला आपल्या आयुष्याची कुर्बानी देऊन एका ऐतिहासिक अशा प्रवासापासून कायमस्वरूपी परावृत्त व्हावं लागलं. त्या हुतात्म्याचं नाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर.

आज, २० ऑगस्टला डॉ. दाभोलकरांच्या हत्येला आणि त्यांच्या हौतात्म्याला पाच वर्षं पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलिदानानंतर कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता बहुजनांचा खरा इतिहास, कष्टकऱ्यांसाठी न्याय, धर्माच्या पुरोगामी मूलतत्त्वांची उपासना करत धार्मिक मूलतत्त्ववादावर आपल्या लेखणीद्वारे कोरडे आसूड ओढत काम केलं. आणि त्यातून त्यागाचे-समर्पणाचे उत्तुंग आदर्श निर्माण केले.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

डॉ. दाभोलकर हे समाजवादी विचारसरणी असलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे १५ वर्षं संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्यकर्ते होते. त्याबरोबरच ते अशा एका चळवळीचे नेते होते, ज्याने परिवर्तनाच्या सर्व लाटांना आपल्या कामामध्ये सामील करून घेऊन विवेकी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या ध्येयापायी मजल-दरमजल करत व्यसनमुक्ती, खिलाडू भावना, जातपंचायत विरोधी कायदा, जादूटोणा विरोधी कायदा यासारखं ऐतिहासिक काम केलं. याबरोबरच उदयोन्मुख कार्यकर्त्यांना कमी वयात मोठी जबाबदारी देऊन आणि प्रशिक्षित करण्याची, चळवळींना शिस्तबद्ध, व्यावहारिक चौकटीमध्ये बसवणं, दस्तऐवजीकरणाचं महत्त्व चळवळीतील सर्वांपर्यंत पोचवणं यासारखे शेकडो पायंडे पाडले.

या वर्षी एक विशेष घटना घडत आहे. मागील पाच वर्षांमध्ये देशभरात डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर आंदोलनांची एक लाट उसळली. देशभरातील विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या संस्था, डाव्या विचारांच्या चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, शिक्षक संघटना, सामाजिक समतेवर काम करणाऱ्या संघटना व प्रगतीशील लोकशाही व प्रजासत्ताक अशा घटनेच्या मूलभूत मूल्यांना आपले विचारस्तंभ मानणाऱ्या लोकांनी, संघटनांनी डॉ. दाभोलकारांच्या हत्येच्या तपासासाठी सरकारवर दबाव बनवण्याचा आणि त्यांनी उभ्या केलेल्या प्रचंड कामाचा वारसा समजून-उमजून घेऊन प्रसार करण्याचा अखंड प्रयत्न चालू ठेवला.

मागील वर्षी म्हणजे २०१७ साली २२ एप्रिल व ९ ऑगस्ट  आणि २८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी जगभरात आयोजित केल्या गेलेल्या ‘मार्च फॉर सायन्स’ या अभियानानंतर या भावनेनं विशेष जोर पकडला. त्यामुळे डॉ. दाभोलकरांचे विचार, व्यक्तिमत्त्व व कार्य यांचा गौरव, स्मृती आणि त्याद्वारे योग्य संदेश प्रसारित करून एक नवी सामाजिक चेतना जागृत करायची असेल तर देशभरामध्ये एक दिवस त्यांना समर्पित असावा, अशी भावना भारतभर मूळ धरू लागली. याचाच एक भाग म्हणून अशा सर्व संघटनांनी एकत्र येऊन असं ठरवलं की, २० ऑगस्ट हा देशभरात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल. या दृष्टीनं डॉ. दाभोलकरांनी सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांची उजळणी विविध ठिकाणी व्हावी.

त्याचबरोबर ज्यांना दाभोलकर कोण होते, त्यांनी काय काम केलं, त्यांची महत्त्वाची आंदोलनं कोणती आणि त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय यावर जे आयुष्यभर काम केलं, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल, त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत..

गेल्या वर्षी ‘साधना’ साप्ताहिकानं प्रकाशित केलेल्या ‘विज्ञान आणि समाज’ या नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकात प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या लेखात अंधश्रद्धा म्हणजे काय हे सांगितलं आहे. ते म्हणतात की, “नैसर्गिक उत्क्रांतीतून विश्वास जन्माला आला आणि सांस्कृतिक उत्क्रांतीतून श्रद्धा. मानवाच्या विश्वास ठेवायच्या क्षमतेतून श्रद्धेचा जन्म झाला. त्याला आध्यात्मिक रंग माणसाने चढवला. मग अंधश्रद्धेचे काय? भीती आणि भयगंड यांच्यात जो फरक आहे, तोच फरक विश्वास आणि अंधश्रद्धा यांच्यात आहे. भीती ही मूलभूत भावना विकसित झाली की, भयगंड निर्माण होतो. ती एक मानसिक विकृती आहे. अगदी तसंच, विश्वास या मूलभूत भावनेचं रूप म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे या विकृतीवरचे उपचार. व्यक्तीवरचे आणि समाजावरचे सुद्धा!”

दाभोलकरांना जाऊन पाच वर्षं झाली आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा कार्यक्रम आता विवेकाचा उत्सव करण्याबरोबर अधिक जोमानं पुढे चालला आहे.  

अनेकदा असा गैरसमज होण्याची शक्यता असते की, विज्ञान शिक्षण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान शिक्षण यातील पहिली पायरी आहे, परंतु ते अंतिम ध्येय नाही. विज्ञानाचं शिक्षण म्हणजे विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील वृत्ती अंगी बनवणं. त्याही पुढे जाऊन विज्ञान हे केवळ ज्ञान नाही तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे असं म्हणता येईल.

दाभोलकर म्हणत की, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे दुसरंतिसरं काहीही नसून माणसाला शहाणा बनवणारा, अधिक चांगला माणूस होण्याचा दृष्टिकोन होय. ते असंही म्हणायचे की, गुलामगिरी, मागासलेपण आणि अंधारमय जीवन हे आर्थिक-भौतिक प्रगतीच्या अभावानं होतंच, परंतु त्याहीपेक्षा ते आपल्या विवेकाचं स्वातंत्र्य गमावल्यामुळे होतं. ते एके ठिकाणी म्हणतात- “ज्या वेळी वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही विसरता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्याच्या हातात देता आणि ज्या वेळी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारता, त्या वेळी स्वतःच्या जीवनाची सूत्रं तुम्ही स्वतःच्या हातात घेता.”

विवेक आणि स्वातंत्र्य यांच्यातील एक अविभाज्य, मजबूत आणि अनिवार्य असा पूल म्हणून दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडे पहायचे. आयुष्यभर ते त्या दृष्टीनं जगले.   

म्हणून विवेकी स्वातंत्र्य आणि प्रगती यांचं अतिशय विशाल आणि सखोल नातं आहे. ते दाभोलकरांनी आयुष्यभर सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या व्रतामधून आपल्याला दिसतं.

आजपासून आपण सर्वजण माणुसकीचे शत्रू म्हणजे अंधश्रद्धा, जातीयवाद आणि फेक न्यूज यांचे किल्ले तर उदध्वस्त करूया. आणि सकारात्मक पातळीवर विवेकाच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्या आणि प्रगतीशील आयुष्याची बांधणी करणाऱ्या प्रयोगशाळा, ज्ञानाची प्रार्थनास्थळे आणि विकासाच्या ध्यानमंदिरांची उभारणी करू या.

चला तर, आज आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी विवेकाचा आवाज बुलंद करूया! 

.................................................................................................................................................................

लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.

creativityindian@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Bhalchandra Deshpande

Sun , 07 October 2018

Best!Vichar karayla lavnara lekh ahe ,pan jayprakash narayan yachya saptkratitil "Adhyatmik krantiche kay?[Bhalchandra Deshpande/mukt patrakar/9822895017]


Dinesh Sharma

Tue , 28 August 2018

किसी भी विवेक सम्मत निर्णय के लिए विकल्प लगते हैं. समाजवादी व्यवस्था संपत्ति के समान बंटवारे के नाम पर विकल्प समाप्त करके एकाधिकार लागु कर देती है, जिससे विवेक बुद्धि से निर्णय लेना मुश्किल हो जाता है. आज शिक्षा, न्याय, पुलिस प्रशासन में उन्हें अपेक्षित कोई काम नहीं होता फिर भी समाज अहोरात्र कर जमा करके सरकार की तिजोरी भरता रहता है. सबसे बड़ा अधंविश्वास तो सरकारों पर विश्वास करना है, उसके संस्थानों पर विश्वास करना है. किन्तु हमारे सामने विकल्प का चुनाव नहीं होने से हम उनके भरोसे बैठने के लिए अभिशप्त है. नतीजा बेहद विदारक है. छोटे छोटे जेबकट तो पकड़े जाते हैं किन्तु बड़े डकैत संविधान सम्मत लूट का तरीका खोज लेते हैं.


vishal pawar

Mon , 20 August 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......