‘बिस्लेरी’ ते ‘ऑक्सिजन पार्लर’
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 05 June 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray जागतिक पर्यावरण दिन World Environment Day नाणार प्रकल्प Nanar Project

आपल्या देशात एखाद्या उत्पादनाला, वस्तूला, एखाद्या कंपनीच्याच नावानं ओळखण्याचा प्रघात आहे. उदा. मोपेड या वाहन प्रकाराला ‘लूना’ म्हणूनच ओळखलं जातं. वास्तविक कायनेटिक कंपनीनं मोपेड प्रकारातलं वाहन प्रथम बाजारात आणलं. ज्याचं नाव होतं ‘लूना’. अगदी सुरुवातीला जे मॉडेल होतं, त्यावर बसलं की माणूस शहामृगासम भासे! नंतर नवनवीन मॉडेल्स आली, इतर कंपन्यांच्या मोपेडेस आल्या, पण सगळ्या ‘लूना’च म्हणून ओळखल्या जात.

फोटोकॉपी तंत्रज्ञानातील मोठी कंपनी झेरॉक्स. त्यांच्या मशीनवर फोटोकॉपी घ्यायला सुरुवात झाली. आणि हस्तलिखित प्रती अथवा टंकलिखित कार्बन कॉपी बाद झाल्या. जागोजागी ‘XEROX’ असे बोर्ड लागले व ‘फोटोकॉपी’ (मराठीत ‘छायांकित प्रत’) हा शब्द बाद होऊन ‘झेरॉक्स’ हाच शब्द रूढ झाला.

आपल्या देशात पूर्वी बूट, सँडल म्हणजे ‘बाटा’. दैनिक किंवा पेपर म्हणजे ‘केसरी’ किंवा ‘सकाळ’. अशा अनेक गोष्टी रूढ होत गेल्यात, मूळ वस्तूरूप बाजूला करून. ताजं उदाहरण म्हणजे बाटलीबंद पाणी किंवा मिनरल वॉटर न म्हणता लोक सर्रास ‘बिस्लेरी’ म्हणतात. विकणाराही कुठल्याही ब्रँडचं पाणी देतो, घेणाराही ते ‘बिस्लेरी’ म्हणून घेतो. खूप कमी लोक विशिष्ट ब्रँडचा आग्रह धरतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

विसावं शतक संपायला येईपर्यंत, या देशात कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल की, कधी काळी आपण पाणी विकत घेऊन पिऊ! चाळ, वाडासंस्कृतीत नळाचं पाणी. त्यात एक नळ पिण्याच्या पाण्याचा असे. किंवा नळाचंच पाणी गाळून, उकळून, तुरटी वगैरे टाकून सर्रास प्यायलं जायचं. हॉटेलात, हाताची चार बोटं बुचकळून पोऱ्या पाणी टेबलवर आदळणार हे गृहित असायचं. पुढे उडप्यांनी पाण्याचा जग आणि ग्लास ही संकल्पना आणली.

विसावं शतक संपेपर्यंत पाणी हे मोफत होतं. सार्वजनिकही होतं. खरं तर पाणी हा निसर्गनिर्मित एक निर्मळ, पारदर्शी आणि तहान भागवून तल्लखी कमी करणारा जलप्रकार. पण जगात एकमेव व भारतातल्या अदभुत जातीव्यवस्थेनं या पाण्याचाही ‘बाट’ धरायचा अमानुष कायदा केला आणि एका मोठा वर्गसमूह पाण्यापासूनही(ही) वंचित ठेवला! आज भांडवलदारांनी, राजकीय नेत्यांनी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पाणी पळवलं म्हणून टाहो फोडणारे हे विसरतात की, या नैसर्गिक जलस्त्रोतावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयोग सर्वप्रथम हिंदू धर्म व त्याच्या जातीसंस्थांनी केलाय! पाण्याची काळजी वाहणारे हा सामाजिक इतिहास सोयीस्कर विसरतात! आजही गावांची रचना वरची आळी, खालची आळी अशी अनेक गावात दिसते आणि पाणी वाटपाची उतरंडही! याची शिक्षा म्हणून की काय मेट्रो सिटीत आता पाणी ‘खालून वर’ चढतं. आधी ‘खालच्या’ला पाणी मिळतं आणि ‘वरचा’ पाणी वर चढत नाही म्हणून बोंबलत बसतो.

सांगायचा मुद्दा असा होता की, पाणी प्रश्नावर लिहिणारे सहज लिहून जातात की, पाण्याला धर्म, जात, प्रदेश नसतो वगैरे. आपल्या देशात तरी आजही हे धडधडीत खोटं आहे. ‘पाणी बाटवलं’ असं मानणारी मोठी लोकसंख्या या देशात आहे. कचरा गोळा करणाऱ्यांना, पण जातीवरून चोर ठरवून अमानूष मारून ठार करणारे लोक ज्या देशात आहेत, त्यांनी पाण्याच्या पारदर्शीपणाची कवनं गाऊ नयेत. वॉटर कपच्या शर्यती सुरू असतानाच एकदा जातवार विहिरींची नोंदही करायला हरकत नाही. कारण शहरी चेहऱ्यानं ‘कुठे जातीयता?’ म्हणणाऱ्यांना सांगायला हवं, “तुमचं जलयुक्त शिवार आमच्या वाट्याला आलंच नाही” असं म्हणणाऱ्या वस्त्या आज एकविसाव्या शतकात, तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रातसुद्धा आहेत!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

हे पाणीपुराण लावण्याचं कारण की, आज, ५ जून. पर्यावरण दिन. सध्याच्या जाहिरातबाज सरकारला धुमधडाक्यात साजरा करायला आणखी एक निमित्त! हल्ली पर्यावरण म्हटलं की, जल, जंगल, जमीन याचीच चर्चा होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जलप्रदूषण होतं म्हणून न्याय मागणाऱ्या नागरिकांना गोळ्या घालण्यात आल्या. तेरा जणांचे प्राण घेऊन, हजारोंना जायबंदी करून, नंतर ती कंपनी बंद करायचा निर्णय घेतला सरकारनं! मग हा निर्णय आधी नसता का घेता आला? का माणसं मेल्याशिवाय (किंवा मारल्याशिवाय) कुठल्याही सरकारला निर्णय घेता येत नाही?

आजच्या पर्यावरण दिवसाच्या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग आणि नाणार प्रकल्पाबाबत सरकार भूमिका स्पष्ट करेल? खरं तर या सर्व प्रश्नांवर कुठलाच राजकीय पक्ष प्रामाणिक नाही. ते फक्त सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष आहेत. जनताभिमुख कुणी नाही. सत्ताधारी राजकीय पक्षाला प्रकल्प रेटायचेत, तर विरोधी पक्षांना जनक्षोभाचा वापर सत्ताधारी पक्षाविरोधात करायचाय! नजीकच्या इतिहासातला एन्रॉन अध्याय तपासून पहा! या प्रकल्पाला विरोध करणारेच नंतर सत्ताधारी झाले. एन्रॉन बुडले नाही, राजकीय पक्ष ‘तरले’. पुढे एन्रॉन आपल्या कर्मानं मेले. जनताआंदोलन करणाऱ्या विविध गटांतही एकमत नाही. त्याचाही पॅटर्न आता ठरून गेलाय. एक स्थानिक (राजकीय पक्षविरहित) कृती समिती बनते. ती आरपारची लढाई जाहीर करते. त्यांना पाठिंबा द्यायला राज्यभरातून पर्यावरणवादी येतात. मग स्थानिक व बाहेरचे अशी लढाई लावून दिली जाते.

स्थानिक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला तोंडदेखली भूमिका घ्यावी लागते. तो मुख्यमंत्र्यांशी भेट ठरवून देतो. मागणी दिली जाते. ‘स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ’ असं सरकार सांगतं. पण स्थानिकांना विश्वासात नाही, तर अंधारात ठेवून अध्यादेश काढले जातात. जमिनींचं मोजमोप सुरू होतं. जनसुनावण्या घेतल्या जातात. मग जनसुनावण्या उधळणं, मोजमाप करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना हाकलून देणं, मारहाण करणं, हिंसक आंदोलन, पोलिसांचा लाठीमार, वाहिन्यांवर जखमी आबालवृद्धांचं तारस्वरात वार्तांकन करणारे वाहिन्यांचे वार्ताहर, पुढे गोळीबार झाला तर नॅशनल न्यूज, कर्फ्यू… पुढे सर्वपक्षीय शांतता फेरी. प्रकल्प प्रक्रिया स्थगित. बाकी जनजीवन पूर्वपदावर.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या प्रवासात काही स्थानिक भावनावेगात जीव गमावतात किंवा आयुष्यभरासाठी पोलिस डायरी व खटले लावून घेतात. काही कायमचे पंगू होतात. नव्यानं उभे राहिलेलं बिगर राजकीय नेतृत्व नंतर एखादा राजकीय पक्ष ताब्यात घेतं. काहींना प्रकल्पवाले मालामाल करतात, काही पूरक धंद्यांची कंत्राटं घेऊन स्थिरस्थावर होतात. अधिकारी बदलतात. सत्ताधारी बदलले की, विरोधी पक्षही बदलतात. दरम्यान प्रकल्प बिनबोभाट झालेला तरी असतो किंवा तो दुसऱ्या राज्यात जाऊन स्थिरस्थावर होतो. पक्षनिधी त्या राज्याचा फुगतो!

नाणारचं हेच होतंय. ‘नाणारचा अध्यादेश रद्द झालाय. त्यामुळे प्रकल्प होणार नाही’ अशी बालिश घोषणा शिवसेना अध्यक्षांनी केली. केंद्रानं केलेला आंतरराष्ट्रीय करार, राज्य मंत्रिमंडळानं सहमतीनं पारित केलेला ठराव व त्यानुसार काढलेला अध्यादेश शिवसेनेचा मंत्री, पक्षीय जनसभेत अध्यादेश रद्द करतोय म्हणतात आणि अध्यक्ष लगेच ‘झाला प्रकल्प रद्द’ म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेतात. लोकही शांतपणे त्यावर विश्वास ठेवतात. इतर विरोधी पक्ष शांत राहतात. आणि मुख्यमंत्री ठामपणे सांगतात- ‘अध्यादेश रद्द नाही. प्रकल्प होणारच’. एवढंच नाही तर अशाच प्रकल्पानं बाधित तारापूर जिथं आहे, त्या पालघरची निवडणूक मुख्यमंत्री जिंकून दाखवतात! (गंमत म्हणजे तारापूर प्रकल्प ज्यांच्या काळात उभारला, त्या काँग्रेस पक्षाचेच हे खासदार आता जाकीट बदलून नव्या सत्ताधारी पक्षात आले असून न्यायासाठी धावले आहेत!)

कसा, कुणावर कुणी विश्वास ठेवावा? या सर्व राजकीय पर्यावरणात वेगानं शहरीकरण होतंय. शेतीची जमीन आक्रसतेय. जंगलं नष्ट होताहेत, जंगली श्वापदं नागर वस्तीत येताहेत. टोलेजंग इमारतींनी टँकर माफिया जन्माला घातलेत. तर टँकर पाण्यानं वॉटर प्युरीफायर कंपन्यांची चांदी केलीय. शहरीकरणानं वस्त्या वाढताहेत, दर फुटागणिक मनुष्यसंख्या वाढतेय. पण त्या प्रमाणात नागरी सुविधा नाहीत. ट्रेनमधून पडून लोक मरताहेत, नाल्यात मेलहोलमधून वाहून जाताहेत, वीजेचा शॉक बसून मरतात, रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून मरतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

कचऱ्यासारखी शहरं वाढताहेत. त्यात निर्माण होणारा मानवनिर्मित कचरा हा नवा प्रश्न. मग आता कचरा (तिथंच) साठवा, व (तिथंच) जिरवा, सुरू झालं. त्यातून खतनिर्मिती करा. केली. ती अतिरिक्त झाली. कचऱ्याचा प्रश्न सुटला तर खताचा उभा राहिला! त्याला भाव द्या! नवी मागणी!!

पर्यावरणाचे प्रश्न असे अक्राळविक्राळ रूप घेऊन, चहूबाजूंनी अंगावर येत असतानाच एक बातमी ऐकली. दिल्लीत गोलमंडी परिसरात ‘ऑक्सिजन पार्लर’ सुरू झालीत. म्हणजे आता स्पा, सोना बाथप्रमाणे स्वच्छ ऑक्सिजन विकत घ्या!

पूर्वी माणूस ऑक्सिजनवर म्हणजे शेवटच्या घटका. पण आता इतरांच्या ऑक्सिजनमधून सिलिंडर बंद ऑक्सिजन विकत घेऊन तुम्ही थोडी शुद्ध हवा विकत घेऊ शकाल!

बिस्लेरी ते वॉटर प्युरिफायर आणि जळणाचा गॅस ते श्वसनाचा गॅस सिलेंडर असा आपला भविष्यकालीन प्रवास असणार आहे. पाण्याचा लिलाव झालाच आहे. आता हवेचाही होणार. ‘पंचमहाभूते’च सेलमध्ये घ्या आता!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Sourabh suryawanshi

Tue , 05 June 2018

दुसऱ्या धर्माला नावं ठेवल्याने आपल्या धर्माचे सार्थक होईल की आपल तेच खरं असे सिद्ध होईल?


Sourabh suryawanshi

Tue , 05 June 2018

उठ की सुठ हिंदू धर्म मग आम्ही कोण आहोत? संत एकनाथ यांचं मोठं पण आम्ही हिंदू म्हणून मिरवायच की एक माणूस म्हणून? गामा पैलवान तुम्ही लेखातील मुद्यावर घाला कधीच घालत नाही तो घाला आणि मग पहा जर तुमचा मुद्दा रास्त असेल तर मी तर तुमच्या बरोबर असेल! पण फक्त एक माणूस म्हणून.


Gamma Pailvan

Tue , 05 June 2018

चला, हिंदू धर्माला शिव्या घातल्या, आता लेखाचं सार्थक झालं म्हणायचं. बाकी, चंद्रभागेच्या वाळवंटात तडफडत पडलेल्या गाढवाची तहान संत एकनाथांनी गंगेच्या पाण्याने भागवली वगैरे विसरून जायचं. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......