ही जी काही हिडीस दमनशाही चाललीय, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण?
पडघम - देशकारण
स्पृहा जोशी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 19 April 2018
  • पडघम देशकारण कथुआ kathua उन्नाव Unnao असिफा Asifa

काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?

मला जे काही वाटतंय त्यानं तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे? आठ वर्षांचं ते ‘असिफा’ नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे... #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्त. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटिंग्ज, शुटिंग्ज, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स... सगळं… रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्या क्षणी वाचली, तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलंही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीनं पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीय, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललाय आसपास??

मी खूप ठरवलं की, यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, “अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी ही बनती." मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा? रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीय आपण समाज म्हणून? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीय. ही गुंगीची गोळी देऊन अख्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेनं पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची, देवाची. नुसती प्रदर्शनं… नुसत्या आराशी!

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंभाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याशा पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी ‘शू’ करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते... आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानं… गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला....

मला खरंच खूप भीती वाटतीय की, मी या अशा जगात राहतेय जिथं हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशननं वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे - त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्यानं मी उभी-आडवी नासवली जातीये. दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीय!

.............................................................................................................................................

लेखिका स्पृहा जोशी मराठी सिने-नाट्य कलावंत आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Anand Pawar

Fri , 20 April 2018

स्पृहा जोशी यांचा लेख चांगला व योग्य आहे. परंतु त्यावरील प्रतिक्रिया देणारे गामा पैलवान यांनी वरील विषयात धर्म जात पात याऐवजी स्त्री व पुरूष संबध व सामाजिक भान या दृष्टीने विचार करणे आवश्य आहे. पुर्वी त्यांनी केले म्हणून आता आम्ही तसे वागणार यातून परिस्थिती कशी सुधारणार.


Gamma Pailvan

Fri , 20 April 2018

स्पृहाताई, तुम्ही लिहाच. काय फरक पडतोय असं म्हणून अजिबात गप्प राहू नका. त्याचं काये की तुम्ही तुमच्या आईच्या पोटांत होतात ना (इ.स. १९८९ बरंका), त्याच्याही आधीपासनं काश्मिरात हिंदू बायकांवर नृशंस अत्याचार होत आलेत. तेव्हा जर वेळच्या वेळी वृत्तपत्रांनी आवाज उठवला असता तर आज असिफावर हा प्रसंग ओढवला नसता. आज जे असिफाच्या नावाने ऊर बडवीत रडताहेत ते १९९० साली हिंदूंवर अशीच भीषण परिस्थिती ओढवली असतांना डोळ्यांवर कातडं ओढून बसले होते. तुम्ही मात्र अशी चूक आजिबात करू नका. लिहा. व्यक्त व्हा. आणि त्या रोहिंग्या मुस्लिमांना जम्मूतनं हाकून लावायच्या कार्यात योगदान द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......