लेखन साधना
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • वाइल्ड, हिटलर आणि जी.ए. यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं आणि त्यांची छायाचित्रं
  • Sun , 20 November 2016
  • जी.ए.कुलकर्णी G. A. Kulkarni जीएंची कथा – परिसरयात्रा अर्पणपत्रिकांतून जीएदर्शन वि. गो. वडेर

‘साधना’ या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे तपश्चर्या. एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी तनमनधनानं अविरत श्रमत कष्टत राहणं… अशा साधनेच्या वाचनाच्या संदर्भातल्या अलीकडेच वाचनात आलेल्या काही नोंदी…

थॉमस राइट हा वाचनाचा नादी तरुण. वयाच्या १६व्या वर्षी जुन्या पुस्तकांच्या दुकानातल्या हुडकाहडुकीत त्याला ‘कंम्पिल वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ पुस्तकाची कापडी बांधणीतली जाडजडू प्रत मिळाली अन त्याचं तोवरचं आयुष्य बदलून गेलं. या पुस्तकाच्या वाचनानंतर तो पूर्वीचा राहिला नाही. ऑस्कर वाइल्डच्या लेखनाने झपाटलेला थॉमस पुढची तब्बल २० वर्षं वाइल्डच्या शोधार्थ जगभर साहित्यपर्यटन करत राहिला. वाइल्डने लिहिलेल्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, त्यानं वाचलेली नोंदलेली पुस्तकं हुडकत राहिला. वाइल्डनं वास्तव्य केलेली स्थळ, त्यानं वापरलेल्या अभ्यासिकांना भेटी देत या सगळ्यातून वाइल्डला शोधत राहिला. त्याच्या अथक धडपडीच्या या शोधक प्रवासाला त्यानं २० वर्षांनंतर वयाच्या चाळीशीत मूर्त रूप दिलं. ‘हाऊ रीडिंग डिफाइन्स द लाइफ ऑफ ऑस्कर वाइल्ड’ हे त्यानं लिहिलेलं वाङ्मयीन चरित्र थॉमस राइटच्या अपार धडपडीचंही चरित्र आहे.

जागतिक साहित्याचे तौलनिक साहित्य-अभ्यासक आनंद पाटील यांनी त्यांच्या लेखात (घटना, वाङ्मयीन विचार, प्रकार, प्रवाह आणि परिभाषा, ललित दिवाळी २०११) ही नोंद केली आहे (किरण देसाई यांना ‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक आणि त्र्यं.वि.सरदेशमुख यांना ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी एकाच वर्षी, २००४ रोजी मिळालं. आनंद पाटील यांनी या दोन्ही कादंबऱ्यांमधल्या सांस्कृतिक तपशिलांची तुलना करणारा लेख किरण देसाईंवरच्या समीक्षालेखसंग्रहासाठी लिहिला होता. त्याचं मराठी रूपांतर (सिमंतिनी चाफळकर) आशय, दिवाळी २००५मध्ये प्रसिद्ध केलं गेलं होतं. हे जाता जाता…)

ही साधना.

लेखक, प्राध्यापक, गाढे वाचन व्यासंगी नीतिन रिंढे यांनी ग्रंथदिनाच्या निमित्ताने आधी फेसबुकवर थोडक्यात आणि ब्लॉगवर (नीतीन रिंढे ब्लॉगस्टॉट) तपशिलानं नोंदवलेला एक वाचनानुभवही याच पठडीतला आहे. तो टिमोथी रिबॅकच्या ‘हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी’ या पुस्तकाच्या संदर्भातला आहे.

जगभर ज्यूद्वेष्ट्या, क्रूरकर्मी म्हणून गणला गेलेल्या हिटलरचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह मोठा होता. त्यात ज्यू लेखकांचीही पुस्तकं होती. मॅक्स ऑसबर्न या ज्यू लेखकाचं बर्लिन शहरावरचं पुस्तक त्यानं अखेरपर्यंत जपलं होतं… हीच आपल्यासाठी बातमी असते. आत्महत्येनंतर स्वतःचा मृतदेह शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्याची विल्हेवाट कधी लावावी, याबद्दल हिटलरने सविस्तर सूचना केल्या होत्या; पण स्वतःच्या ग्रंथसंग्रहाबद्दल मात्र त्याने काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे विजयनानंतर बँकरमध्ये प्रथम घुसलेल्या अमेरिकी सौनिकांना हिटलरचं शव नाही, तरी त्याचा ग्रंथसंग्रह हाती लागला. या सैनिकांनी ही ‘लूट’ घरी तर नेलीच, पण नंतरच्या पिढीतही ती रद्दीत वा अन्य मार्गाने नष्ट न होता ‘सुरक्षित’ ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये पोहोचली (आपल्यासाठी हेही दर्शनच).

हिटलरचा अमेरिकाभर विखुरलेला ग्रंथसंग्रह शोधणं, हे टिमोथी रिबॅकचं पॅशन (वेड) झालं. अथक परिश्रमानं त्यानं तो शोधला, त्यातल्या पानापानावर झालेला हिटलरचा स्पर्श शोधला (अनेक पुस्तकं अस्पर्शही होती), वाचून समासात वा अन्यत्र हिटलरने केलेल्या नोंदी तपशिलात, बारकाइनं पाहिल्या). त्यातून जगातल्या कुख्यात असलेल्या हिटलरच्या मुखवट्याआडचा माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचं आयुष्य आणि त्यानं जमवलेली, जपलेली पुस्तकं यांच्यातलं नातं त्यानं ‘हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी’मधून शब्दबद्ध केलं. आवर्जुन लिहिलं ते पॉप्युलर हिस्ट्री या प्रकारात मोडणारं, सामान्य वाचकांशी नाळ जोडणारं… रिंढेंना हे महत्त्वाचं वाटतंच, पण आपल्याकडे असलेली अशा बौद्धिक परिश्रमांना खुंटीवर मारून ठेवायची मानसिकताही बोचते.

ही साधना…

आपल्या मराठीतली ही अशीच अलीकडची नोंद.

जी.ए.कुलकर्णी मराठीतले महत्त्वाचे लेखक. ते गेले त्याला तीन दशकं (१९८७) होत आली. त्याआधी दशकभर त्यांनी कथालेखन थांबवलं होतं. म्हणजे हे लेखन येऊन चाळीसावर वर्षं झाली, तरी आजही त्यातली आवाहकता, त्यांच्या (कथांमधली) आकलनातल्या नव्या शक्यतांचा शोध संपलेला नाही. त्यांनी कथांमधून उपस्थित केलेले सनातन आधिभैतिक प्रश्न आणि त्यांची तथाकथित रेडिमेड उत्तरं निग्रहाने नाकारात गाभ्याला थेट भिडण्याचा जीएंचा प्रयत्न अपयशी झाला (तसा तो होणार होताच…), तरीही या ओघात त्यांनी जे लिहिलं, त्यानं मराठी साहित्यविश्व वादळून गेलं. इतक्या वर्षांनंतरही या कथांच्या आकलनाला अभिव्यक्तीच्या चिमटीत पकडण्याचे प्रयत्न सतत होत असतात. वि. गो. वडेर बेळगावचे. जीएंचे, त्यांच्या परिसराचे गाढे वाचक. जीएंची कथा घडते, ती स्थळं प्रत्यक्षात बेलघाव-धारवाड परिसरातली असावीत (त्यांचं सारं आयुष्य या परिसरातच गेलं), असं त्यांना वाटत होतंच. मग त्यांनी अ. रा. यार्दी या धारवाडमधल्या जीएंच्या स्नेह्याबरोबर शोधयात्राच सुरू केली. कथेचं लेखन झाल्याचा काळ २३-२४ वर्षं वा त्याहूनही जुना. शिवाय लेखन आठवणींतून झालेलं. त्या अधिक जुन्या. दरम्यानच्या शहरीकरणाच्या वेगात सगळंच बदलत चाललेलं होतं. त्यामुळे कथांमधून आलेले तपशील आणि परिसर या दोघांचा अनुभव हाताशी असूनही हा शोध अवघडच होता. शिवाय या शोधाचं फलित काय? कथेच्या आशयाशी या तशा साहित्यबाह्य गोष्टींचा काय संबंध? हेही प्रश्न होतेच; पण वेड्या माणसांना प्रश्न पडत नाहीत हे खरं. ‘‘जीएंच्या कथेतल्या मातीनं झपाटलं होतं’’, असं वडेर सांगतात. यार्दींबरोबर जीएंच्या कथेतला परिसर, त्यांतल्या गूढ अनवट वाटांची वडेरांची भटकंती मग काही वर्षं चालली. मग लक्ष्मी, वीज, राधी, वंश, तळपट, कवठे, हुंदका, बळी, कैरी, स्वामी अशा जी.एं.च्या मराठी कथासृष्टीमधल्या दहा कथा-लेण्यांमधल्या स्थळांचा प्रत्यक्षातला साक्षात्कार राजहंसकडे २००५साली प्रकाशनार्थ गेला. या सुमारास वडेरांना जी.एं.चं विश्वासार्ह चरित्र उपलब्ध नसल्याची जाणकारांनी नोंदवलेली खंत बोचत होती. ‘जीएंची कथा – परिसरयात्रा’च्या लेखनानंतरच्या अवस्थेबद्दल वडेर लिहितात, ‘मरणप्राय बैचेनी आणि रितेपणाने मन भरून गेले होते… रस्ता संपलेला, पण प्रवास सुरूच असलेल्या जी.एं.च्या प्रवशासारखीच अवस्था… काही नवे कळावे, सुचावे, करावे असे वाटूनही तसे घडत नव्हते…’ चरित्र लिहावे, तर विश्वासार्ह साधनांचा पूर्ण अभाव. एक वाट दिसली. जीएंचं व्यक्तिगत आयुष्य किंचित किलकिलं झालं, ते त्यांच्या स्वतंत्र कथांच्या आठ संग्रहांच्या (हयातीत प्रकाशित जालेल्या) अर्पणपत्रिकांमधून…’ एका एका अर्पणपत्रिकेतून जी.एं.नी काहीसा उलगडेला, बराचसा अनावृत राहिलेला भावबंध आधाराला घेत वडेरांची शोधयात्रा पुनश्च सुरू झाली. २००६ ते २०१४ अशी आठ वर्षं वडेर हे भारावलेपण वाहत जीएंच्या आयुष्याला खोदत राहिले. जीएंशी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, दूरान्वयानेही संबंधित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा परिसरातल्या २३ गावांमधल्या ९८व्यक्तींना वडेर भेटले. झालेल्या बातचितीतून, पाहिलेल्या ठिकाणांमधून जीएंना शोधत राहिले, आणि साकारालं, ‘अर्पणपत्रिकांतून जीएदर्शन’.

हे अर्थात जीएंचं पूर्ण चरित्र नव्हे, पण आजवर पूर्ण अंधारात असलेल्या (त्यांनी स्वतः पत्रव्यवहारातून उलगडलेल्या काही धाग्यांव्यतिरिक्त) व्यक्तींवर आणि जीएंवर उजेडाचे काही कवडसे पडले आहेत, हे तर यशच आहेच; पण पुढे-मागे कधी पूर्ण चरित्राचं शिवधुनष्य पेलू पाहणाऱ्यांसाठी या दोन्ही पुस्तकांमधून जवळपास १५ वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांमधून वडेरांनी सुपीक भूमी तयार केली आहे, हे महत्त्वाचं!

 

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......