दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • पद्मगंधी, इत्यादी आणि वसा
  • Fri , 18 November 2016
  • दिवाळी अंक २०१६ Divali Ank 2016 पद्मगंधा Padmagandha इत्यादी Ityadi वसा Vasa

पद्मगंधा

‘पद्मगंधा’चा दिवाळी अंक पूर्णपणे वाङ्मयीन तर असतोच, पण त्याचबरोबर तो गंभीर साहित्य चर्चाही करणाराही असतो. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे हे साहित्यव्रती प्रकाशक आहेत. ते साहित्याकडे गंभीर जीवननिष्ठेचा भाग म्हणून पाहतात. नुकतंच लोकसाहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचं निधन झालं. पद्मगंधाने त्यांची वीसेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधनाविषयी जाखडे यांना खूप आस्थाही आहे. त्यामुळे यंदाचा ‘पद्मगंधा’चा संपूर्ण अंक डॉ. ढेरे यांना अभिवादन करणारा आहे. ढेरे यांच्या लेखनात ‘मिथक’ ही संकल्पना वारंवार येते. त्यामुळे या अंकात याच विषयावर एक भरगच्च परिसंवाद आहे. ‘मिथकांचे अवतरण’ या परिसंवादात तब्बल २३ लेख आहेत. गणेश देवी, आनंद पाटील, दीपक घारे, प्रशांत बागड, हेमंत खडके, देवानंद सोनटक्के, महेंद्र कदम, शाहू पाटोळे अशा विविध मान्यवर लेखकांनी त्यात लेख लिहिले आहेत. तरीही संपादकांचं असं म्हणणं आहे की, मिथक हा विषय इतका व्यापक आहे की, अजून काही लेखांचा समावेश करायला हवा होता. हा परिसंवाद आणि त्यातील लेख यांच्याविषयी अनुकूल-प्रतिकूल लिहिता येईल, त्यातल्या अनेक लेखकांची मतं आपल्याला पटतीलच असंही नाही. भौतिक वास्तवाच्या आणि तर्कबुद्धीच्या प्रेरणा ओलांडून मानवी संस्कृतीविषयीची अनेक रहस्यं समजून घेण्यासाठी मिथकांचा आधार घ्यावाच लागतो. त्या मिथकांविषयीचं एक भान देण्याचं काम हा परिसंवाद नक्कीच करतो.  या परिसंवादाला साजेसं अंकाचं मुखपृष्ठ आहे. जाखडे यांनी तर म. गांधींनाही संपादकीयात मिथकच म्हटलं आहे. डॉ. ढेरे यांचा ‘मराठी सत्कवींचे जगन्नाथदर्शन’ हा अप्रकाशित लेख आणि संजय आर्वीकर यांचा ढेरे यांच्या रंगभूमीविषयक विचारांचा आढावा घेणारा लेख, यांचाही समावेश या अंकात आहे. याशिवाय श्रीकांत बोजेवार, मानसी होळेहोन्नुर, बब्रूवान रुद्रकंठावार, समीना दलवाई यांच्या वाचनीय कथा आहेत. थोडक्यात पद्मगंधाचा दिवाळी अंक गंभीर, वाङ्मयीन पण सकस साहित्य देणारा आहे.

सर्वोत्तम –  शोध आबे फारीयाचा (रूपेश पाटकर)

उत्तम मध्यम –  हरमान हेसे आणि त्याचे प्रकाशक (जयप्रकाश सावंत),  काकासाहेब गाडगीळ (नरेंद्र चपळगावकर)

मध्यम मध्यम – नागपूरचे साहित्यविश्व – द. भि. कुलकर्णी

‘पद्मगंधा’, संपादक – अरुण जाखडे,  पाने - २७२, मूल्य – २०० रुपये.

……………………………………………………………

वसा

एक दखलपात्र दिवाळी अंक असा अलीकडच्या काळात ‘वसा’ने लौकिक मिळवला आहे. या वर्षीचा अंकही त्याला फारसा अपवाद नाही. या अंकाच्या मुखपृष्ठावर भारताच्या नकाशाला एक खिंडार पडल्याचं दाखवलं आहे, तर खालच्या बाजूला ‘कुणाचा नाद, कुणाचा उन्माद, कुणी बरबाद, हाच का राष्ट्रवाद?’ या ओळी छापलेल्या आहेत. त्यामुळे या अंकात साधारण गेल्या दीडेक वर्षांतल्या घटना-घडामोडींविषयीचे लेख आहेत. मराठा समाजाचे लाखालाखाचे मोर्च सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी त्यानिमित्ताने एक दीर्घ लेख त्यांच्या ब्लॉगवर लिहिला होता. मराठा समाजाविषयीची चर्चा एकारलेपणाकडे जाऊ लागली असताना आसबे यांनी ती हा लेख लिहून संतुलित करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर दखल घेतली गेली. काहींनी त्याच्या परस्पर पुस्तिका छापल्या. तोच लेख या अंकात पुनर्मुद्रित केला आहे. लता प्रतिभा मधुकर यांनी रोहित वेमुलाची आई, राधिका यांच्याविषयी तर सुबोध मोरे यांनी गुजरातमधील दलित आंदोलनाचा नेता, जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल लिहिलं आहे. हे दोन्ही लेख ठीक म्हणावेत असेच आहेत. त्यातून फार नवं काही हाती लागत नाही. ‘संघाचे आव्हान आणि आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ’ हा सुरेश सावंत यांचा लेख वाचनीय आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्याने लिहिला असला तरी तो संयत आहे. रझिया पटेल, राज असरोंडकर व राही श्रुती गणेश यांचे अनुक्रमे राष्ट्रवाद, देशभक्ती आणि देशद्रोहाविषयीचे लेख प्रतिक्रियावजा आहेत. समर खडस यांनी मुस्लीम धर्माचा सामंजस्याकडून अतिरेकाकडे झालेला प्रवास आणि शशिकांत सावंत यांनी जॉन अपडाईक या अमेरिकन लेखकाचा घेतलेला आढावा वाचनीय आहे. मुकुंद कुळे यांनी अस्तंगत होऊ लागलेल्या बैठकीची लावणीविषयी लिहिलेला लेख या लावणीची सर्वांगीण ओळख करून देतो. जयंत पवार यांची कथा आणि प्रतिमा जोशी यांच्या कविता वेगळ्या, अर्थपूर्ण आणि आशयघन आहेत.

सर्वोत्तम – मराठा आंदोलन, असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा (प्रताप आसबे)

उत्तम मध्यम – एक सुन्न दुपार आणि बाबू भंगारवाल्याची वखार (जयंत पवार)

मध्यम मध्यम – जॉन अपडाईक : अमेरिकन समाजाचा आरसा (शशिकांत सावंत)

‘वसा’, संपादक – प्रभाकर नारकर, पाने – १७६, मूल्य – १२० रुपये.

……………………………………………………………

इत्यादी

‘इत्यादी’च्या दिवाळी अंकाचे सरळ तीन विभाग आहेत. एक- कथा, दोन- विशेष लेख आणि तीन – रियाज. त्यांना ‘उत्तम मध्यम’, ‘मध्यम मध्यम’ आणि ‘उत्तम मध्यम’ असं स्थूलपणाने म्हणता येईल. कथा विभागात प्रणव सखदेव, गणेश मतकरी, पंकज भोसले, मनस्विनी लता रवींद्र या तरुण आश्वासक कथाकारांच्या जोडीला अनिल रघुनाथ कुलकर्णी या ज्येष्ठ कथाकाराची ‘कावळे’ ही पुनर्मुद्रित कथाही आहे. याच विभागात कुलकर्णी यांची मुलाखतही आहे. ती मात्र अजून चांगली होऊ शकली असती. अतिशय सरधोपट प्रश्नांना कुलकर्णी यांनी प्रामाणिक उत्तरं दिल्याने ती वाचनीय मात्र नक्कीच झाली आहे. त्यातून कुलकर्णी यांच्यासारख्या प्रसिद्धीपराङमुख लेखकाला समजून घ्यायला मदत होते. ‘विशेष लेख’ विभागातील चिन्मय दामले यांचा सांबाराच्या इतिहासाविषयीचा, निरंजन घाटे यांचा प्राचीन भित्तीलेखनाविषयीचा, सोनाली नवांगुळ यांचा मानद बापाविषयीचा आणि प्रवीण पाटकर यांचा लैंगिकतेविषयीचा, हे लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. माहितीपूर्ण-वाचनीय हे शब्दप्रयोग अनेकांना काहीसे सरधोपट वाटू शकतात. यापेक्षा अधिक नेमक्या शब्दांचा वापर करता येईलही, पण त्यातून हाच आशय व्यक्त होईल. त्यामुळे हे शब्द गांभीर्यानेच वापरलेले आहेत. तिसऱ्या ‘रियाज’ या विभागात सुनील सुकथनकर (चित्रपट), वसंत आबाजी डहाके (साहित्य), सुहास बहुलकर (चित्रकला), सुचेता भिडे-चाफेकर (गायन) आणि नंदा खरे (साहित्य) यांचे लेख आहेत. या प्रत्येक क्षेत्रात ‘रियाजा’चं काय महत्त्व आहे, या व्यक्ती त्याकडे कसे पाहतात, याविषयी त्यांनी केलेलं मनोगत किमान एकदा वाचून पाहायला हरकत नाही. त्यातून या व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घ्यायला मदत होते. संत ठोकाराम यांची खुसखुशीत भेटही आहेच.

सर्वोत्तम – …..

उत्तम मध्यम – कथा विभाग, रियाज विभाग

मध्यम मध्यम – लेख विभाग

‘मनोविकास’, संपादक – आशिश पाटकर, पाने – १९६, मूल्य – १६० रुपये.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......