मुलांचा भावनांक वाढवता येतो!
पडघम - बालदिन विशेष
डॉ. संयोगिता नाडकर्णी
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Mon , 14 November 2016
  • भावनांक बुद्ध्यांक मुलं पालकत्व IQ EQ Parenting Intelligence Quotient Emotional Quotient

माणूस जसा सामाजिक प्राणी आहे, तसाच तो भावनात्मक प्राणीदेखील आहे. Emotion हा शब्द E-motion म्हणून बघितला जाऊ शकतो. भावनांमध्ये नैसर्गिकरीत्याच एक शक्ती दडलेली असते. हीच शक्ती माणसाला कृती करण्यास भाग पाडते. माणसाला जसा तर्कसंगत, वस्तुनिष्ठ विचार करता येतो, तितकंच भावनेच्या आहारीही जाता येतं. खरं तर मनुष्य आयुष्यातील पुष्कळ गोष्टी भावनेमुळेच करतो असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. मैत्रीपासून प्रेमापर्यंत आणि मुलांच्या संगोपनापासून वृद्ध आई-वडलांच्या देखभालीपर्यंत माणसातील भावनाच त्याला मार्गदर्शन करत असतात. या अर्थातच चांगल्या भावना आहेत. पण वाईट भावनादेखील माणसाला तितक्याच किंवा जास्त प्रवृत्त करतात. गुन्हे, भ्रष्टाचार किंवा अपरांधामध्ये भावनाच दडलेल्या असतात. असं भावनांचं आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकं असूनदेखील भावनांचा फारसा शास्त्रशुद्धरीत्या अभ्यास केला गेलेला नाही.

- पाच वर्षांचा अर्णव दुसऱ्या मुलांना सारखा मारत असतो. त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो ओरडत सुटतो. शाळेत तो आता ‘मारकुटा’ म्हणून ओळखला जातो.

- सात वर्षांची काव्या आईला सारखी चिकटून असते. सारखं तिच्याबरोबरच राहावं असं तिला वाटतं. बाथरूम, किचन, घराबाहेर आई कुठेही गेली की, ती पाठोपाठ जाते. तिला शाळेत जाणं नकोसं वाटतं.

- १२ वर्षांचा आदित्य आजकाल चिडका झाला आहे. लहानसहान गोष्टींवरून तो उखडतो. आई-बाबांशी त्याचे सतत किरकोळ वाद सुरू असतात.

- १४ वर्षांची रेखा आजकाल खूपच डायटिंग करते. तिने तिचा आहार खूपच कमी केला आहे. तिला कुणा नटीसारखं दिसायचं आहे. पण ती रडकी, चिडचिडीसुद्धा झाली आहे.

या मुलांच्या समस्या वेगवेगळ्या असल्या किंवा त्यामागची कारणंदेखील भिन्न असली तरी त्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे या सगळ्या समस्या त्यांच्या भावनिक विश्वातून निर्माण झालेल्या आहेत.

मुले आणि भावना?!

अनेकांना मुलांना (विशेषत: लहान मुलांना) भावना असतात हे माहीत नसतं. त्यामुळे अनेक पालक अशा समस्येकडे केवळ एक वर्तनसमस्या म्हणून बघतात. पण फक्त वर्तनावर लक्ष दिल्यास त्याचं मूळ कारण अज्ञातच राहतं. त्यामुळे जरी वर्तन सुधारलं तरी ती भावना दुसऱ्या रूपात प्रकट होते. खरं तर भावनेच्या पाठीदेखील अजून एक गोष्ट असते. ती म्हणजे विचार.

विचार – भावना – वर्तन ही एक लिंक आहे. अगदी लहानपणी विचार विकसित झालेले नसतात. त्यामुळे मुलं फक्त भावना दाखवतात. तिच्यामुळे वर्तन होतं. जसं, भावना - वर्तन

मुलांच्या भावनांचं काय स्वरूप असतं? मुलांच्या भावना खूप प्रकारच्या असतात. आनंद, उत्साह, भीती, दु:ख, कारुण्य अशा भावना मुलांना लहान वयापासून अवगत असतात. पुढे याच भावना विकसित होऊन त्यांच्या विविध छटा दिसू लागतात. मग त्या प्रौढांसारख्या होऊ लागतात. पण मुलांच्या भावनांचा फार कमी विचार केला गेला आहे. मुलांची वाढ व विकास हा शारीरिक, बौद्धिक व कृतिकौशल्यांच्या पातळीवर पाहिला गेला आहे. त्यामुळे मूल कधी चालतं, बोलतं, किती आकडे मोजतं, कुठले रंग ओळखतं, नावं कशी सांगतं, गोष्टी कशा ओळखतं, यालाच पालक सारखं मोजत-मापत असतात. हे चूक नाही, पण सर्वस्वी याच गोष्टींच्या आधारे विकास मापल्यास मुलाची खरी प्रगती ओळखता येत नाही. वर दिलेल्या विकासांबरोबरच भावनिक व सामाजिक कौशल्यांचादेखील विकास होत असतो.

भावनिक विकास

भावनिक विकास मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. तसंच तो मुलाच्या स्व-प्रतिमेशी घनिष्ठरीत्या निगडित आहे. आताच्या काळात नुसतीच कौशल्यं, बुद्धी किंवा कसबं वापरून व्यवहार\व्यवसाय करता येत नाही. हे जवळजवळ सर्वच पालकांना माहीत असतं.

डॅनियल गोलमन या शास्त्रज्ञाने emotional quotient (भावनांक) अर्थात EQची संकल्पना मांडली. १९९६मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात ही संकल्पना उलगडून सांगितली आहे. IQ (बुद्ध्यांक) ची संकल्पना माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित आहे. माणसाची बौद्धिक क्षमता चांगली असल्यास त्याला आपोआपच यश मिळतं, असं समजलं जाई. परंतु कोलमनने म्हटलं आहे – “पूर्वी तुमची कार्यकौशल्यं यशासाठी पुरेशी होती, पण आज तुमची भावनिक व सामाजिक कौशल्यं दाखवण्याची गरज आहे.”

भावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्तेत खालील गोष्टी येतात

१. स्वत:च्या भावनांचं भान

२. भावनांचं स्व-नियोजन म्हणजे स्वत:च्या हानिकारक भावनांना प्रतिबंध घालण्याची क्षमता.

३. संघर्ष नियोजन. परस्परात होणाऱ्या संघर्षाचं परीक्षण व त्यात सुधारणा.

४. दुसऱ्यांवर प्रभाव. दुसऱ्यात सुधारणा करता येणं आणि त्यांना आपलं म्हणणं पटवून देता येणं.

५. टीमवर्क आणि सहकार्य. एकमेकांना सहकार्य करता येणं आणि गटपद्धतीनं काम करता येणं.

आजकाल खूप मुलांमध्ये प्रकर्षाने वरील गोष्टींचा अभाव दिसतो. भावना हा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. त्यामुळे त्या नियोजित केल्या नाहीत वा त्यांचं नियोजन झालं नाही तर व्यक्तिमत्त्व व्यवस्थित घडत नाही, तसंच मुलांची स्व-प्रतिमा कमी होऊ शकते. याचा परिणाम त्यांच्या अध्ययनक्षमता, वर्तन आणि कामगिरीवर होतो.

भावनांक (EQ) वाढवता येतो का?

सुदैवाने EQ हा IQ प्रमाणे स्थिर नसतो. पालक मुलांचा EQ वाढवू शकतात. तो वाढवण्यासाठी खालील गोष्टी करता येतात –

१. मुलाच्या दृष्टिकोनाचा विचार व त्याचं संवेदनक्षम निरीक्षण : बहुतेक पालक मुलाच्या वागण्याला महत्त्व देतात. ‘तू असं वाग’, ‘असं करू नको’, ‘अमके चूक’, ‘तमके बरोबर’ असं सांगत मुलाला समाजाच्या दृष्टीने उचित घडवायचा प्रयत्न असतो. हे पूर्णपणे चूक नाही. पण हे करताना मुलाच्या भावना सारख्या दूर सारल्या जात नाहीत ना हे बघणं गरजेचं असतं. तसं झाल्यास मुलामध्ये अढी बसू शकेल. तसंच वरवर काही करण्याची किंवा दाखवण्याची सवय होते. फक्त वर्तन उचित म्हणजे व्यक्तिमत्त्व उचित असं नाही. त्यासाठी आतून भाव निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे मुलाला ‘काय वाटत आहे?’, ‘राग आलाय का?’, ‘निराश वाटतंय का?’ असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यातून त्यांना स्वत:च्या भावनाही हळूहळू ओळखता येतात.

२. भावनांना वाट देणं : मुलांना भावना सारख्या दाबून ठेवायला शिकवू नका. त्याचा वर्तनावर परिणाम होतो. भावना योग्य रीतीनं दाखवण्यासाठी मुलांना प्रोत्साहून द्या. त्यासाठी त्यांच्या भावनांचा स्वीकारण होणं गरजेचं आहे. ती भावना चुकीची असली तरी. उदा. धाकट्या भावाला खेळणं आणल्यास मोठ्या मुलाला राग आला असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणण्याऐवजी त्याचा स्वीकार करा. ‘तुला असं वाटणं चूक नाही, पण एखादी गोष्ट हवी असल्यास तुला फक्त राग येऊन चालणार नाही,’ असं सांगा. त्यामुळे त्याला फक्त भावना आणि त्यामुळे होणारं वर्तन यापलीकडे विचार करता येईल. तसंच राग येणं चूक नसलं तरी तो आवरता न येणं हे चूक आहे हेही स्पष्ट करा.

३. उपाय-योजना : आपण एखादी समस्या किंवा परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो ते मुलाला विचारा. त्यामुळे थोडं जाणीवपूर्वक त्याला भावनेच्या कबजातून दूर नेता येतं.

वरील गोष्टी भावना अनावर झाल्यानंतर करणं निष्फळ आहे. त्यासाठी रोजच छोटे-छोटे प्रयत्न करावे लागतील. बहुतेक पालक वेळ वाचवण्यासाठी मुलाला तिथल्या तिथं उपाय सांगून किंवा शिक्षा करून मोकळे  होतात. पण रोज थोडीशी संवादात्मक गुंतवणूक केल्यास मुलात खूप फरक होईल.  त्यामुळे पुष्कळ वर्तनसमस्या टळतील.

खूप पालक व मुलांमध्ये संवादच होत नाही. ही फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. टीव्ही, आयपॅड, मोबाईल फोन यातून मुलं संवाद शिकत नाहीत. त्यांना संवादाचं कसबच उमगत नाही. ती पुढे नाती कशी जोडणार? माणूस नात्यांतून घडतो व सक्षम होतो. नात्यांअभावी माणूस यंत्रवत व पोकळ होतो आणि दबलेल्या भावनांना चुकीच्या मार्गानं वाट देतो. उदा. आक्रस्ताळेपणा, बंडखोर वृत्ती, राग, नैराश्य, वैफल्य. ही घसरती वाट आहे. त्यामार्गानं जायचं नसेल तर भावनिक क्षमता मुलांत बाणणं निकडीचं आहे.

 

लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

sanyogitanadkarni@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......