सतत घाईत असलेला मित्र! ​​
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहन हिराबाई हिरालाल डावीकडून दुसरे
  • Sat , 12 November 2016
  • मोहन हिराबाई हिरालाल Mohan Hirabai Hiralal जमनालाल बजाज पुरस्कार Jamnalal Bajaj Puraskar

आधी ‘अनसेन्सॉर्ड गप्पां’चे कार्यक्रम आणि नंतर महाबळेश्वर असे सलग सहा-सात दिवस वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, इंटरनेटपासून लांब होतो. ‘रेंज’मध्ये आल्यावर वृतपत्रं पाहिली तर कळलं की, मोहन हिराबाई हिरालालला जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला आहे. बातमी वाचल्यावर मनाच्या गाभाऱ्यात हा आनंद साहजिकच दाट पसरला. त्या आनंदाचा गंध वातावरणातही दरवळला. मोहनला लगेच फोन केला आणि म्हटलं, ‘मोहन सॉरी, अरे, रेंजमध्ये नव्हतो रे. म्हणून तुला मिळालेल्या बजाज पुरस्काराची बातमी उशीरा कळली. खूप आनंद झाला मला आणि मंगलला. तू मित्र आहेस आमचा याचा अभिमान वाटतो.’ तर मोहन त्याच्या चिरपरिचित शैलीत म्हणाला, ‘या बातमीचा तुम्हाला आनंद होणारच की! मलाही छान वाटलं ही बातमी कळल्यावर.’

मग मन आठवणींच्या प्रदेशात मागे गेलं. थेट ऐंशीच्या दशकात. मोहनची ओळख झाल्याला आता चार दशकं होतील. तेव्हा मी नागपुरात होतो आणि मोहन बहुदा गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा देसाईगंज या अडनिड्या गावात रोजगार हमी योजनेच्या मजुरांचं संघटन करत होता. वन आणि बांधकाम क्षेत्रातील मजुरांची संघटना बांधण्याचं कामही तो करत होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील असंघटित क्षेत्रातील लोकांना संघटित करण्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. मजुरांना ‘रोहयो’वर काम मिळालं नाही तर भत्ता मिळण्याची तरतूद होती, पण प्रशासनाच्या बिलंदरपणामुळे प्रत्यक्षात काम दिलं गेलं नाही, तरी असा भत्ता दिला जात नसे. एका घटनेत काम न मिळाल्याचं रीतसर रेकॉर्ड निगुतीनं तयार करुन मोहननं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक खटला दाखल केलेला होता. (त्याची हकिकत ‘डायरी’ या (ग्रंथाली) माझ्या पुस्तकात ‘न संपलेला संघर्ष...’, पृष्ठ क्रमांक ५९  वर आहे.) आमचा कॉमन मित्र आणि तेव्हा वकिलीच्या क्षेत्रात दबदबा निर्माण होऊ लागलेला सुबोध धर्माधिकारी त्याचा वकील होता. चित्रकार चंद्रकांत चन्ने, पत्रकार प्रकाश देशपांडे हेही आमचे समानधर्मी मित्र होते. शिवाय  महात्मा गांधी, विनोबा, आनंदवन आणि आमटे कुटुंबीय हे आमचं ‘गोत्र’ जुळलं. साहजिकच आमच्या भेटी वाढल्या.

मोहनशी मैत्री घट्ट होण्याचं आणखी एक निमित्त घडलं. तेव्हा नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचा वासंतिक अंक निघत असे. सांस्कृतिक क्षेत्रात त्या अंकाला दिवाळी अंकाइतकं महत्त्व असे. बहुदा १९८५ किंवा ८६ साल असावं. त्या वर्षीच्या अंकाचं संपादन आमचा दोस्तयार प्रकाश देशपांडेकडे होतं. आम्ही विदर्भातील पूर्णवेळ कार्यकर्ते हा विषय घेतला. डॉ. राणी-डॉ. अभय बंग, मोहन यांच्यावर लिहिण्याची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली. त्यासाठी गडचिरोलीच्या बंग दाम्पत्य राहत असलेल्या, सर्व सोयी कॉमन असणाऱ्या वाड्यात अस्मादिकांनी मग चार-पाच दिवस मुक्काम ठोकला. गप्पा तर भरपूर झाल्याच शिवाय बंग दाम्पत्य आणि मोहनशी असलेलं मैत्र आणखी दृढ झालं. त्या काळात मोहन नागपुरात आला की, आमची भेट बहुदा होतच असे. आमच्या घरी जे अनपेक्षित पाहुणे त्या काळात अचानक, न कळवता टपकत आणि पत्नी-मंगलानं, आमच्या ‘चिमण्या’ संसारासाठी केलेला स्वैपांक हमखास फस्त करत, त्यात मोहन हमखास असे. आमच्या मैत्रीला असा ‘उदर मार्गा’चाही आधार आहे! अशा अनपेक्षित पाहुण्यात एकदा गडचिरोलीच्या ‘जंगल बचाव, मानव बचाव’ आंदोलनासाठी आलेले सुंदरलाल बहुगुणा हेही होते. हे आंदोलन उभारण्यातही मोहन अग्रभागी होता.  हळूहळू आमचे व्याप वाढले, कामाचा विस्तार झाला, पायाला चाकं लागली आणि भेटी कमी झाल्या तरी आमच्यातली सलगी, स्नेह आणि ममत्व कधीही कोरडं झालं नाही; तसं ते होणारच नव्हतं म्हणा. 

मोहनचं खानदान सुखवस्तू. आडनावावरून जात सहज लक्षात येतं म्हणून या पठ्ठ्यानं आडनावच टाकलं! हे कमी की, काय म्हणून आपल्या नावानंतर हिराबाई हे आईच नाव वडिलांच्या जागी आणि आडनावाच्या जागी वडिलांचं हिरालाल हे नाव लावणं सुरू केलं. आज हे लिहायला जितकं सहज वाटतंय तितकं ते त्या काळी नव्हतं; विलक्षण काटेरी होतं ते कृत्य त्या काळात. मोहनचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार. शरीरयष्टी तशी धिप्पाडच. वर्ण गोरा पण, उन्हानं रापलेला. त्यामुळे मोहन फॉरिनर वाटायचा अनेकांना! तेव्हा मोहनला भली मोठ्ठी दाढी होती. कपडे चटक-मटक आणि गळ्यात शबनम बॅग. चुरगाळलेले-मुरगाळलेले कपडे घातलेला आणि दुर्मुखलेला मोहन दुर्मीळ असायचा आणि आजही आहे. चष्म्याआड कायम उत्सुक आणि लुकलुकणारे डोळे. त्या काळच्या आमच्या पिढीत युवकात; एक प्रवाह हिंदुत्ववादी, ‘त्यांचा हिंदुत्ववाद’ अमान्य असणाऱ्या दुसरा प्रवाह राष्ट्र सेवा दल किंवा जयप्रकाश नारायण-म्हणून छात्र युवा संघर्ष वाहिनी आणि कम्युनिस्टप्रणित एआयएएसफ किंवा तत्सम; असा तिसरा प्रवाह असायचा. या तीनपैकी एकाही प्रवाहात नसलेला किंवा या तीनपैकी एकाही विचाराशी नाळ नसलेला महाविद्यालयीन युवक ‘नुळनुळीत’ समजला जाई. मोहन या दुसऱ्या स्कूलचा म्हणजे छात्र युवा संघर्ष वाहिनीचा स्कॉलर. प्रत्येक घटना, प्रश्न, समस्येची माहिती घेणं आणि मांडणी मूलभूत दृष्टीनं करणं, समोरच्याचं म्हणणं संयम बाळगत नीट (आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण ) ऐकून घेणं आणि मग त्यावरच्या मुद्देसूद शंका विचारत चिरफाड करणं; हे या स्कूलच्या स्कॉलर्सचं वैशिष्ट्य मोहनमध्ये ठासून भरलेलं होतं; अजूनही आहे. जनता पक्षातील एकजात सर्वांकडून जयप्रकाश यांचा झालेला पराभव आणि समाजवाद्यांकडून झालेला दारुण अपेक्षाभंग यामुळे ‘छात्र’स्कूलच्या अनेकांना नैराश्यानं ग्रासलं, वागण्या-बोलण्यात त्यांना नखशिखांत कडू बनवलं. याला जे काही मोजके अपवाद राहिले त्यात मोहन एक. शिवाय ‘कार्यकर्तापण’ नावाचं व्रत कसोशीनं जपायचं म्हणजे अपरिहार्य रुक्षपणा ठेवावा लागतो असा जो काही जागतिक समज आहे, त्याला मोहन अपवाद. राजकारणात आणि राजकीय गॉसिपमध्ये रस आणि अनपेक्षितपणे समोरच्याची टोपी उडवण्याची खोड, कविता आणि गाण्यात रुची, खाण्यात दर्दीपण असं मोहनचं रसिलं असणं आहे.

मोहन सतत घाईत असतो असं चित्रकार चंद्रकांत चन्ने आणि माझं कायम मत आहे. म्हणजे तो कायम कुठून तरी आलेला असतो आणि त्याला कायम अन्यत्र कुठे तरी जाण्याचे वेध लागलेले असतात. एक काम नीटनेटकेपणानं हातावेगळं करतानाही त्याला असेच दुसऱ्या कामाचे वेध लागलेले असतात. पाच-सात वर्षांपूर्वी मला वाटतं शीतल आमटेच्या विवाहासाठी नागपूरहून चंदू चन्ने आणि मी सोबत गेलो होतो. आनंदवनात फिरताना मोहनची आठवण झाली. चंदू म्हणाला, ‘आता मोहन भेटेलच. नेहमीप्रमाणे तो जाम घाईत असेल आणि भेट झाल्यावर पाचच मिनिटात सांगेल- मी इकडून आलो आणि तिकडे जाणार आहे!’ आमचं हे बोलणं होतं न होतं तोच जीन्स आणि टी शर्ट, डोईवर काऊबॉय घालतात तशी टोपी ऐटीत घातलेला मोहन थेट समोरच उगवला. आमची भेट झाली. अपेक्षा होती तेच मोहन बोलला. तो चंद्रपूरहून आलेला होता आणि त्याला लगेच बंगलोरला जायचं होतं. चंदू आणि मी मग जाम ठोसून हसलो. मोहन वैतागला पण, आम्ही काय ते सांगितल्यावर निर्मळ हसला. निर्मळ हास्य हे मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य. 

मोहननं केलेल्या कामांची यादी लांबलचक आहे. तो सुरुवातीला लोकबिरादरी प्रकल्पात डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबत रमला. वन आणि बांधकाम क्षेत्रातील आणि रोजगार हमी योजनेवरील मजुरांचं संघटन मोहननं केलं (याचा फायदा विधानसभेची निवडणूक जिंकताना सुखदेवबाबू उईके यांनाही झाला होता ), जंगल बचाव मानव बचाव आंदोलनात तो सक्रिय होता, ‘आमच्या गावात आमचं सरकार’ हा प्रयोग त्याने दीर्घ अविश्रांत श्रम आणि संघर्षातून साध्य केला. त्यातून मेंढालेखा हा प्रयोग साकारला. मेंढालेखा या गोंड आदिवासी गावात ग्रामस्थांनी वृक्षाभ्यास केला. आपल्या गावच्या पाण्याचं आणि शेतीचं नियोजन केलं. ग्रामकोश निर्माण केला. गावातली सावकारी आणि दारू हद्दपार केली. आदिवासींना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू जंगलातून नि:शुल्क घेऊ देण्यासाठीची निस्तार हक्काची चळवळ मोहननं उभारली. शुभदा आणि डॉ. सतीश गोगुलवार यांच्या कुरखेडा परिसरातील  ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ चळवळीसोबत तो आहे, डॉ. अभय बंग यांच्या कामात त्याची साथ आहे...स्तिमित करणारी- मोहनशी संबधित ही कामाची यादी संपणारी नाही. मूलभूत अभ्यास, प्रबोधन, प्रशिक्षण देणं आणि कार्यकर्त्याला त्याच्या पायावर उभं करणं, हीदेखील मोहनच्या कामाची वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे काम उभारत असतानाच ते भविष्यात सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहते, अशी ही दूरदृष्टी आहे. पण मोहनच्या कामाची महती सांगणं आणि यादी देणं हे या लेखाचं प्रयोजन नाहीच नाही.

काही मित्र अनेकांच्या जगण्याचं असं काही लाघवी आणि उबदार प्रयोजन असतात की, त्यांना मिळालेला सन्मान आपल्याला मिळाला आहे, त्यांच्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंमागची वेदना आपल्यालाही झाली असं वाटत राहतं. सतत विधायक घाईत असणाऱ्या मोहन हिराबाई हिरालाल नावाच्या मित्राला प्राप्त झालेल्या जमनालाल बजाज पुरस्काराशी आमच्यासारख्या अनेकांचं नातं हे असं ‘आपलं’ आहे. मोहनचं विधायक घाईत असणं आमच्यासाठी म्हणूनच अभिमानाची बाब आहे.  

 

लेखक लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

Post Comment

daya Salgaonkar

Sat , 12 November 2016

जमनालाल बजाज पुरस्कारचे मानकरी ‘श्री मोहन हिरालाल’ यांच्या मित्राने शब्दभावनेतून व्यक्त केलेले मनोगत वाचकाला आनंद देउन जाते. आजकाल अश्या निखळ मैत्र्यभावनेचे दर्शन खूप दुर्लभ झाले आहे. हा लेख म्हणजे मैत्रीसंबंधांचा सन्मान आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......