हा गुणवंत लेखक या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता
ग्रंथनामा - झलक
सुनील कर्णिक
  • ‘अध्यात-मध्यात’चं मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक अध्यात-मध्यात हेमंत कर्णिक सुनील कर्णिक सदामंगल पब्लिकेशन

प्रसिद्ध स्तंभलेखक हेमंत कर्णिक यांचा ‘अध्यात-मध्यात’ हा लेखसंग्रह नुकताच सदामंगल पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला पत्रकार-संपादक सुनील कर्णिक यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

हेमंत कर्णिक हे पत्रकार होता होता राहिलेले गृहस्थ आहेत. त्यांनी वर्तमानपत्रात भरपूर लेखन केलं; पण पत्रकारिता केली नाही. बातम्यांमध्ये नेहमीच कहाणी (स्टोरी एलिमेंट) दडलेली असते; तर यांच्या लिखाणात विपुल विचार असतो. बातम्यांची भाषा साधीसोपी असते, तर यांची नसते. त्यामुळे की काय, पत्रकार मंडळींच्या घोळक्यात ते सहसा दिसत नाहीत किंवा प्रेस क्लबमध्ये रात्री रंगणाऱ्या पार्ट्यांमध्येही कधी आढळत नाहीत. पण बहुधा त्यामुळेच आजचं वर्तमानपत्र जशी उद्याची रद्दी होते, तसं त्यांच्या लेखनाचं झालेलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह प्रसिद्ध होत आहे.

अर्थात रोज शेकडो मराठी दैनिकं प्रसिद्ध होतात आणि त्यात हजारो स्तंभलेखक लेखन करतात; पण त्यांची पुस्तकं सहसा निघत नाहीत. तर मग यांचं कसं काय निघतं?

त्याचं असं आहे की, आज तुम्ही ज्या पायरीवर असाल तिथं तुमच्यात काही खास वैशिष्ट्य आढळलं, तर तुम्हाला वरच्या पायरीवर पदोन्नती मिळते. या न्यायानं हेमंत कर्णिकांच्या लेखनात निश्चितच काही सत्त्व आणि स्वत्व आहे. म्हणूनच आज ते ग्रंथकार म्हणून रसिकांसमोर येत आहेत.

अशी कोणती वैशिष्ट्यं आहेत या लेखकाच्या लेखणीत? त्याची विषयाची निवड खास आहे. त्याची मांडणी, भाषाशैली, विचारीपण, वाद-विवादाचं कौशल्य, संयत धीटपणा, विज्ञान-गणित-क्रीडा यांमधली पारंगतता या सगळ्यामुळे या लेखनाला छान आगळेपण आलं आहे. इतर मराठी लेखकांमध्ये नाहीत, असे काही खास गुण या लेखकामध्ये आहेत आणि ते निश्चितच पुस्तकरूपानं संग्रहित होण्याजोगे आहेत. त्यातले काही छोटेमोठे उतारे, सुभाषितवजा वाक्यं पुढे दिली आहेत. ती वाचल्यावर त्यातला सकसपणा मनाला भावल्याखेरीज राहणार नाही.

१. ‘... म्हणून गरिबांना एखाद्या स्थानिक दादाचा, बेधडक प्रवृत्तीचा जास्त आधार वाटतो. याच भावनेतून मुंबईतला ‘खालचा वर्ग’ शिवसेनेला मत देत आला. हीच भावना जेव्हा महाराष्ट्राच्या अंतर्भागात पसरली, तेव्हा तिथेही शिवसेनेचा पाठिंबा वाढला. गुंडच राज्य करणार, तर तो आपला गुंड असावा, या भावनेतून हे झालं. पण गुंड आपला-तुमचा नसतो, स्वत:चाच असतो. आपण निर्माण केलेला भस्मासुर केव्हा ना केव्हा आपल्यावर उलटतोच.’

२. ‘जगताना घेतलेल्या अनुभवांवरून जरी लिखाण केलं, तरी अनुभव घ्यायला मन लागतं आणि मन म्हणजे नुसती चाळणी नसते. अनुभवांची निवड करणारी; मन भट्टीसारखं असतं, अनुभवांना शिजवून त्यांना नवीन चव मिळवून देणारं. प्रत्येक भट्टी वेगळी.’

३. ‘जे विसरून जायचं, ते शिक्षण कसं असेल?’

४. ‘बलात्कार करणारा तुर्की वा देशी मुसलमान वा परदेशी इंग्रज असण्याऐवजी इथलाच हिंदू मराठा असला, तरी बलात्कार सुखकारक होत नाही.’

५. ‘गुणवत्ता ती गुणवत्ता. पाकिस्तानचा संघ जर असेलच भारतापेक्षा श्रेष्ठ, तर पाकिस्तानच जिंकायला पाहिजे.’

हे नमुने वाचल्यावर सहज जाणवतं की, हे लेखन खणखणीत आणि सणसणीत आहे. पण ते ‘आवाजी’ नाही. जे बोलायचं ते सरळ आणि स्पष्ट. त्यात आरंभापासून अखेरर्पंत एक निश्चित भूमिका आहे. प्रगल्भता आहे आणि पुरोगामित्वही आहे.

त्यात खरी रंगत येते ती ‘शत्रु’ पक्षाचीही मांडणी नेटकेपणाने केल्याने. ‘कोणीतरी, देशच्या देश, त्या देशाची सारी लोकसंख्या आपला विनाकारण द्वेष करते; आपल्याशी शत्रुत्व धरते, असं म्हणणं नुसत्या आत्मकेंद्रितपणाचं नव्हे, तर माथेफिरू आत्मकेंद्रितपणाचं लक्षण आहे,’ अशी भेदक टीका त्यांनी केली आहे. ‘या मूर्ख माणसांना किक्रेटरसिक म्हणणं म्हणजे मला माझा अपमान वाटतो.’ अशी स्पष्टोक्ती म्हणजे त्यांची खासीयत आहे आणि ‘शिवसेनेचा शिवाजी म्हणजे नुसती गुंडगिरीची प्रेरणा.’ यात तर कडक आसूडाचा संयत फटकारा आहे. लेखकाची परिपक्वता, समाजसन्मुखता अंतरीची आहे.

पण त्याचबरोबर ही लेखणी अनाग्रही आहे. ऋजू आहे आणि मृदूही आहे. त्यांची सुभाषितवजा वाक्यं इतकी देखणी आहेत की, वाचकांची दाद मिळवल्याखेरीज राहणार नाहीत.

‘भूतकाळ म्हणजे इतिहास नव्हे; इतिहास म्हणजे वर्तमानात वावरणारा भूतकाळ.’

‘डोंट लेट स्कूलिंग इंटरफिअर विथ युअर एज्युकेशन!’

‘सर्वांत मधुर पेय कुठलं’ या प्रश्नाला ‘पाणी’ असं उत्तर द्यायला मी चुकणार नाही.’

‘केव्हा केव्हा साधा कॉमनसेन्स यालाही साक्षात्कार व्हावा लागतो.’

‘कायदा म्हणजे आपल्या बाजूच्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या विरुद्ध पार्टीतल्यांना धडा शिकवण्यासाठी वापरण्याचं हत्यार नव्हे; कायदा हा आपल्या डोक्यावर बसणारा राजा आहे, असं इंग्लंडमध्ये समाजमूल्य आहे.’

असा हा कसदार आणि गुणवंत लेखक खरं तर या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता. पण जिथं वसंत पळशीकरांचीही उपेक्षा होते, तिथं हेमंत कर्णिकांची का कथा? त्यातून आपला समाज आता टिळकांपासून ठाकऱ्यांर्पंत घसरलेला असल्याने १९९५ सालच्या सुमाराला केलेल्या या लेखनाला ग्रंथरूप मिळण्यासाठी २०१७ साल उजाडावं लागलं आहे. तेही अर्थातच, स्वागतार्ह आहे; पण त्याचं खरं चीज होईल ते वाचकांच्या पसंतीची पावती मिळेल तेव्हा आणि ते मात्र आजच्या काळात बरंचसं कठीण वाटतं.

का? त्याची कारणं मी नव्यानं सांगायला नकोत. ती सर्वांना ठाऊक आहेत. गावोगावची गंथालयं बंद होताहेत, वगैरे ...

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

पण यापेक्षा व्यापक असा एक मुद्दा आहे.

आपला महाराष्ट्रीय समाज गेली अनेक वर्षं किती उथळ, वरवरचं जीवन जगत आहे. मुंबई आपल्या हातातून सुटत चालली असली, तरी आपण किती बेफिकीर आहोत? आपल्या वर्तमानपत्रातली बातमी सहसा देशभर गाजत नाही. आंबेडकर, लता, सचिन या तिघांखेरीज चौथं नाव भारतभर प्रसिद्ध नाही. कुठल्याही क्षेत्रात नेत्रदीपक नेतृत्व उभं राहत नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहं नाहीत. आश्रमशाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. दारिद्रयरेषेखालील वंचितांना कोणी वाली नाही. तृतीपंथीय या सर्वांत उपेक्षित समाजघटकाला सर्वांनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे.

याचा अर्थ असा की महाराष्ट्रीय समाजाला उज्ज्वल भविष्काळ नाही. कदाचित येत्या पन्नास वर्षांतच तो नामशेष होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपली मूळ आडनावं बहुधा लोप पावतील आणि सिंग, ठाकूर आदी इतर आडनावांचा आपण स्वीकार करू.

पण आज तरी चांगल्या वाचकांच्या अभावी ‘अध्यात-मध्यात’सारखी सकस पुस्तकं बाजूला पडू द्यायची नसतील, तर त्याची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध व्हायला हवी. या संग्रहाचे कर्ते हेमंत कर्णिक हे हातखंडा इंग्रजी लेखन करू शकतात. त्यांनी या सूचनेचा अवश्य विचार करावा, अशी आग्रहाची विनंती आहे.

अध्यात-मध्यात - हेमंत कर्णिक

सदामंगल पब्लिकेशन, मुंबई, मूल्य - २२५ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4262

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vinod jamale

Fri , 27 October 2017

सुनील कर्णिकांच्या नेहमीच्या अडाणी आत्मपीडेचा प्रत्यय याही लेखात आला. "असा हा कसदार आणि गुणवंत लेखक खरं तर या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता. पण जिथं वसंत पळशीकरांचीही उपेक्षा होते, तिथं हेमंत कर्णिकांची का कथा?" हे विधान 'उपेक्षा' म्हणजे काय? असा नवीन प्रश्न उपस्थित करते. हेमंत कर्णिक यांची पुस्तके मनोविकास प्रकाशन, अक्षर प्रकाशन आदींनी काढली आहेत. अक्षर दिवाळी अंकाचे संपादन ते करत आले आहेत. त्यांचे इतरही कर्तृत्व किमान मराठी वाचकवर्गात तरी परिचित आहे. याची आकडेवारी सुनीलरावांनी दिलेली नाही, मीही ती देऊ शकत नाही. परंतु 'उपेक्षा' असे बोलून संपूर्ण समाजाचे मूल्यमापन होत नसते. केवळ उरबडवेपणा होत असतो. देशभर ज्ञात असलेली मराठी नावे असे म्हटल्यावर सुनीलरावांना केवळ 'आंबेडकर, लता, सचिन' एवढीच नावे आठवली, हे अडाणीपणाचे लक्षण आहे. किंवा केवळ मराठी वर्तमानपत्रे वाचल्याचे लक्षण आहे. कोसंबी पितापुत्र, माधुरी दीक्षित, शरद पवार, सुखदेव थोरात, कुमार केतकर, यशवंतराव चव्हाण, मिलिंद सोमण- अशी एक ना अनेक विविध क्षेत्रांतील मराठी नावे आहेत. यात गुणावगुण विचारात घेतलेले नाहीत. केवळ 'मराठी' असणे लक्षात घेतलेले आहे. मराठी समाजात दोष नाहीत असे नव्हे. त्यांचे मूल्यमापन व्हायलाच हवे. परंतु या कर्णिकांसारखे लोक केवळ मुंबईतून आखुड दुर्बिण लावून विनाकारण सार्वजनिक अवकाशात पिंका टाकत बसतात, हे गैर आहे. परंतु ते तसेच असणार. ते का, हे मुळात कर्णिकांनी आत्मचिकित्सेने वाटले तर शोधावे. अन्यथा बाहेरचे एकच बोट पाहात खेद व्यक्त करण्यात आनंद मानावा. असो.


Gamma Pailvan

Mon , 16 October 2017

शिवसेना = गुंडगिरी हे समीकरण डोळ्यात पक्कं बसल्यावर दुसरं काय सुचणार म्हणा. त्याचं काय आहे की शिवाजी महाराज देखील सिंहासनावर बसेपर्यंत 'गुंड', 'दरोडेखोर', 'बगावतखोर' असेच होते. ही बिरुदं पुसून काढण्यासाठी राजांनी सिंहासन धारण केलं. टिळक व सावरकर सुद्धा राजद्रोहीच होते. शिवसेनेस उगीच नावं ठेवल्याने हेमंत कर्णिकांच्या मनात महाराष्ट्रीय ओळखीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी माणसाचं मानस कधीतरी यांना कळेल काय? अशांनी मराठी जाणीवेच्या नावाने भाकड शोकच करावेत. काल पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढा जोमदारपणे पेटला होता. आज पंजाब आणि बंगाल अर्धे कापले गेलेले आहेत. एक आहे तो महाराष्ट्र. भारताचं वैचारिक नेतृत्व करायची क्षमता महाराष्ट्रात खचितच आहे. बोला करणार का कर्णिकसाहेब तुम्ही? सुरुवात म्हणून बाळासाहेबांनंतरची शिवसेना हा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचून पहा म्हणून सुचवेन. लेख इथे आहे : http://bhautorsekar.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87/ -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......