मी जे केलं ती काही बहादुरी नाही, पत्रकारिता आहे!
पडघम - माध्यमनामा
रोहिणी सिंह
  • रोहिणी सिंह यांच्या बातमीविषयीच्या व्हिडिओ स्टोरीतील एक दृश्य
  • Thu , 12 October 2017
  • पडघम माध्यमनामा रोहिणी सिंह जय शहा द वायर

मी माझं काम केलं, कुठली बहादुरी केलेली नाही. हीच पत्रकारिता आहे. सरकारच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित करणं, हेच तर पत्रकारांचं काम असतं. हेच पत्रकारितेचं मूळ कर्तव्य आम्हाला शिकवलं जातं. मला वा ‘द वायर’ला किंवा कुणालाही असं वाटत नाही की, आम्ही कुठलं बहादुरीचं काम करत आहोत. आम्ही फक्त एका बातमीवर काम करत होतो, ज्याला पत्रकारिता म्हणतात!

मी या बातमीसाठी खूप मेहनत घेतली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)वरून कागदपत्रं डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास केला. हां, हे नाही सांगणार की बातमीचा स्रोत काय आहे आणि बातमी कुठून मिळाली. पण आरओसीच्या कागदपत्रांतून ती बाहेर काढणं, वाचणं, समजून घेणं आणि अभ्यास करणं हे सर्व मी संपादकांच्या मदतीनं पूर्ण केलं.

ही बातमी फक्त यासाठी महत्त्वाची आहे की, आम्ही एका महत्त्वाच्या व्यक्तीविषयी काम करत आहोत. आम्ही कुठला आरोप केलेला नाही. ही सारी कागदपत्रं आरओसीची आहेत. आम्ही फक्त तथ्य समोर ठेवलं आहे. ज्या काळात आम्ही जगत आहोत आणि पाहत आहोत की, पत्रकारिता कशा प्रकारे होत आहे, त्या काळासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.

सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की, इतका मोठा परिणाम होईल. आपल्याला सरकारच्या धोरणांची चिकित्सा केली पाहिजे, ती धोरणं कशी लागू केली जात आहेत हे पाहिलं पाहिजे. जे वायदे सरकारने केले आहेत, ते पूर्ण केले जात आहेत की नाहीत. या सर्वांवर नजर ठेवणं ही पत्रकारिता आहे.

मी फक्त भाजप सरकारविषयी बोलत नाही. हे मी यूपीएच्या कार्यकाळातही केलं होतं. राहता राहिली दबावाची गोष्ट, तर या प्रकारच्या बातम्या करताना नेहमीच दबाव असतो. लोक तुम्हाला फोन करूनही सांगतात की, ही बातमी करू नका.

या बातमीसाठी मला हेही सांगितलं गेली होतं की, ‘सावध रहा’. मला माहीत नाही की, ‘सावध रहा’चा त्या लोकांचा काय अर्थ होता. लोक तुम्हाला सांगतात, ही बातमी करण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. वाईट परिणाम होऊ शकतात.

मलाही या गोष्टीची माहिती आहे. मी ट्विटर यासाठी सोडलं की, याआधीही माझ्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं ट्विटर सोडणं हा सर्वांत चांगला निर्णय होता. कारण ज्या लोकांना सत्य माहीत नाही तेही बोलणार आणि ज्यांना ट्रोलिंग, दुष्प्रचार करायचा आहे, तो तेही करणार.

ही बातमी करण्यासाठी जेवढा दबाव होता, तेवढा कधीच पाहिला नाही. उदा. मी रॉबर्ट वड्रावर बातमी केली होती, तेव्हा या प्रकारचा दबाव नव्हता. ती बातमी मी फारच सहजपणे केली आणि केल्यानंतरही आताच्या सारख्या प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या नाहीत.

याआधी मी आनंदीबेन पटेल यांच्या मुलीची बातमी केली होती, तेव्हाही इतका दबाव नव्हता. पण ही बातमी केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे मी प्रोत्साहित झाले आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मी शक्यतो सोशल मीडियावर काही लिहीत नाही. फेसबुक आणि ट्विटरवर माझी खाती आहेत, पण मला हे लिहावं लागलं, कारण ज्या प्रकारची चर्चा होत आहे आणि एक महिला पत्रकार म्हणून मला वाटतं महिलांना नेहमीच लक्ष्य केलं जातं.

 ‘मी फक्त माझं काम करत आहे’ असं सांगणारी एक सशक्त महिला कुणालाच आवडत नाही. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया महिला पत्रकारांना सहन कराव्या लागतात, त्या कधीच पुरुष पत्रकारांना सहन कराव्या लागत नाहीत. त्यामुळे मला उत्तरादाखल जे बोलायचं होतं, ते मी फेसबुकवर बोलले आहे.

रॉबर्ट वड्रांची बातमी केली होती, तेव्हा सोशल मीडिया इतका सक्रिय झालेला नव्हता आणि सरकारकडूनही इतका दबाव नव्हता की, मंत्री एक बेवसाईट आणि पत्रकाराला लक्ष्य करत आहेत. मानहानीचीही कुठली केस झालेली नव्हती आणि नंतर काम करण्यातही कुठला त्रास झाला नाही. मी सहजपणे टुजी आणि कॉमनवेल्थच्या बातम्या केल्या.

त्या वेळी भाजपच्या अनेक मंत्र्यांचे फोन आले होते की, कुणी पत्रकार करत नाही, तुम्ही खूप बहादुरीचं काम केलं आहे. मला खूप धन्यवादही दिले होते. मी हे सांगत नाही की, कुणी माझं कौतुक करावं. मी फक्त माझं काम करत आहे.

मला फक्त पत्रकारितेला स्वातंत्र्य असावं असं वाटतं.

हिंदीवरून अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

मूळ हिंदी लेखासाठी पहा -

http://thewirehindi.com/21168/rohini-singh-journalism-jay-amit-shah-bjp-robert-vadra-narendra-modi-congress-press-freedom/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......