टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामदास आठवले, नरेंद्र मोदी, रुपा गांगुली, ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी
  • Tue , 18 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रामदास आठवले Ramdas Aathavle नरेंद्र मोदी Narendra Modi रूपा गांगुली Roopa Ganguly ममता बॅनर्जी Mamta Banerjee सोनिया गांधी Soniya Gandhi

१. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध (एनडीए) पूर्ण क्षमतेनिशी लढण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत संख्याबळ आपल्याविरोधात असले तरी आपण लढलेच पाहिजे. विरोधी पक्षांनी फुटीच्या आणि जातीय राजकारणाविरोधात लढलेच पाहिजे. आपण देशाला अशा शक्तींच्या ताब्यात जाऊन देता कामा नये. त्यासाठी विरोधी पक्षांनी संख्याबळाची पर्वा न करता कडवी लढत दिली पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.

आपण धर्मनिरपेक्ष राजकारण करत होतो आणि आता फुटीचं, जातीय राजकारण सुरू आहे, असं काँग्रेसने मानणं ही आत्मवंचनाच आहे. ‘मुँह में राम और बगल में छुरी’ अशी आजच्या सत्ताधाऱ्यांची स्थिती असेल, तर कालचे सत्ताधारी ‘मुँह में धर्मनिरपेक्षता और बगल में धर्मवाद, जातीवाद’ असेच होते. घोष मात्र कायम लोकशाही मूल्यांचा करायचा. त्यामुळे देश धर्मवादी शक्तींच्या हातात जाऊ नये, म्हणून ही ६० वर्षं जुनी टेप लावून लोक काँग्रेसकडे वळतील, या भ्रमातून काँग्रेसने बाहेर पडायला हवं.

.............................................................................................................................................

२. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या आगीत भाजप खासदार रूपा गांगुली यांनी तेल ओतलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देशभरातून समर्थन देणाऱ्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, हिंमत असेल तर ममता समर्थकांनी आणि देशभरातल्या नेत्यांनी ममताबाईंच्या पाठबळाशिवाय आपल्या घरातल्या बहिणीला, मुलीला, वहिनीला किंवा पत्नीला पश्चिम बंगालमध्ये पाठवून बघावं, १५ दिवसांच्या आत त्यांच्यावर बलात्कार होईल. तेथील दंगलीच्या काळात बंगालमधल्या हिंदू जनतेच्या रक्ताचं पाणी झालं आहे का? तुम्हीही शस्त्र उचला नाहीतर तुमची अवस्था काश्मीरी पंडितांप्रमाणे होईल, अशी ट्वीट रूपा गांगुली यांनी केली होती.

आपण ममता बॅनर्जी यांना विरोध करण्याच्या नादात आपल्याच राज्याबद्दल, इथल्या जनतेबद्दल उर्वरित देशाची, जगाची काय कल्पना करून देतो आहोत, किती नालस्ती करतो आहोत, याचं या बाईंचं भान पुरतं सुटलं आहे का? हाच पश्चिम बंगाल भाजपची सत्ता येताच, सभ्य आणी सुसंस्कृत बनेल, यातही शंका नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरक्षित असलेल्या सगळ्या बायकांना ममता बॅनर्जी यांचं पाठबळ लाभलं असेल, तर त्या रजनीकांतपेक्षाही शक्तिमान आहेत म्हणायच्या.

.............................................................................................................................................

३. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही कथित गोरक्षकांना खडे बोल सुनावले आहेत. प्रत्येकालाच बीफ खाण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे एखाद्याला मरेस्तोवर मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे आठवले यांनी सांगितले. गोरक्षणाच्या नावाखाली भक्षक होणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

रामदासजी, आपलं माननीय पंतप्रधानांशी या विषयावर काही बोलणं झालंय का हो? त्यांच्या आणि तुमच्या भूमिकेत फारच मोठा फरक आहे. ते म्हणतात, गोमातेचं रक्षण व्हावं, असं सर्वांनाच वाटतं. तुम्ही म्हणता, बीफ खाण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. आता बीफ खायचं तर गोमातेचं रक्षण कसं होणार? तुम्हा दोघांचे ‘सर्व’जण इतके वेगवेगळे, अगदी परस्परविरोधी कसे आहेत?

.............................................................................................................................................

४. देशभरात गोमांस, गोवंश, गोहत्या यामुळे वातावरण तापले असताना गुजरातमध्ये धार्मिक सलोख्याचे अत्यंत उत्तम उदाहरण समोर आले आहे. गुजरातमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या शरीरात यापुढे एका हिंदू व्यक्तीचे हृदय धडधडणार आहे. धार्मिक सौहार्दाचा प्रत्यय देणारी ही हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अहमदाबादमधील रुग्णालयात पार पडली आहे. सूरतच्या अमितचे हृदय आणंदमध्ये राहणाऱ्या सोहेलच्या शरीरात धडधडणार आहे. अहमदाबादमध्ये ग्रीन कॉरिडॉर करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ३६ वर्षीय सोहेल वोरा गेल्या अनेक वर्षांपासून केवळ १५ टक्के धडधडणाऱ्या हृदयासोबत जगत होता. आता नवे हृदय मिळाल्याने त्याच्या आयुष्याला नवी उमेद मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी अपघातात ब्रेन डेड झालेल्या अमितच्या शरीरातील कार्यरत असलेले काही अवयव गरजूंना दिल्यास त्यामुळे त्यांना नवे आयुष्य मिळेल, असा विचार अमितच्या कुटुंबीयांच्या मनात आला. त्यामुळे अमितचे हृदय, किडनी आणि डोळे दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

‘क्रांतिवीर’मधल्या नाना पाटेकरची आठवण करून देणारी ही घटना आहे. तो हिंदू आणि मुस्लिमाचं रक्त एकत्र करून आता यातलं आपापलं रक्त ओळखा म्हणून सांगतो... धर्म ही माणसाने स्वत:वर आरोपित केलेली बाह्य ओळख आहे, तिच्याआतला माणूस एकच आहे, याची जाणीव यानिमित्ताने काहीजणांना झाली तरी पुष्कळ. ही घटना गुजरातमध्ये घडावी, हा योगायोगही बोलका आहे.

.............................................................................................................................................

५. सणासुदीला पाश्चात्त्य धाटणीचे कपडे नकोत. पुरुषांनी कुर्ता-पायजमा व महिलांनी साडी परिधान करावी, वाढदिवशी केक कापून मेणबत्त्या कसल्या विझवता; ती आपली संस्कृती नाही, घरी कुटुंबातील सगळे सदस्य मिळून गप्पा मारत असतील तर राजकारण, चित्रपट, क्रिकेट असले विषय वर्ज्यच करणे उत्तम... असे जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतली असून, कुटुंबांतील संवाद वाढवण्याचा उद्देश त्यामागे असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती व देशी मूल्ये देशवासीयांमध्ये रुजावीत, या हेतूने संघाने कुटुंब प्रबोधन नामक मोहीम हाती घेतली आहे. सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नागपूर व इतर काही ठिकाणी या मोहिमेला अनुसरून संघाचे स्वयंसेवक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे आहार-विहाराबाबत प्रबोधन करत आहेत. ‘विदेशी संस्कृतीच्या आहारी न जाता शाकाहाराचा अवलंब करावा,’ असे आर्जवही स्वयंसेवक करीत आहेत. मुस्लिम, तसेच ख्रिश्चनधर्मीय कुटुंबांचेही प्रबोधन करण्याचा संघाचा हेतू आहे.

लोकांनी कोणते कपडे परिधान करावे, काय खावे, काय प्यावे, हे सांगताना काय करू नये, हेही सांगितलं जातंय. त्याला संस्कृतीचा आधार दिला जातोय. ही संस्कृतीही मजेशीर आहे. शुद्ध शाकाहार ही कोणाची संस्कृती आहे? भारताची संस्कृती? कशी काय ठरली ही संस्कृती? कोणी ठरवली? या देशात काही अपवाद वगळता सर्व जातीधर्मांमध्ये मांसाहाराची समृद्ध परंपरा आहे. तिचा या देशाच्या संस्कृतीत समावेश न करण्याचा अधिकार या ऊटपटांगांना कोणी दिला. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं असंच प्रबोधन केलं जाणार आहे, ही तर सरळसरळ धमकीच आहे. तालिबान टप्प्याटप्प्याने फॉर्मात येऊ लागले आहेत!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......