बालगंधर्व नाट्यगृह : आशियातील अद्ययावत असे एकमेव थिएटर
संकीर्ण - पुनर्वाचन
संकलित
  • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
  • Thu , 13 July 2017
  • संकीर्ण पुनर्वाचन बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्व पु.ल. देशपांडे

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा एक अविभाज्य भाग असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने २६ जून रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने या नाट्यगृहाची वैशिष्ट्ये सांगणारा हा पुनर्मुद्रित लेख. हा लेख ‘युगनांदी’ (संपादक - सरोज तेलंग, मुंबई) या ‘रंगभूमी व विविध कलांना वाहिलेल्या पाक्षिका’च्या १ जुलै १९६८च्या अंकात प्रकाशित झाला होता. या लेखावर मात्र लेखकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. तो बहुधा संपादक मंडळातील सहकाऱ्यांपैकी कुणीतरी लिहिला असावा. प्रसिद्ध नाट्यकर्मी बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस (१८८८-१९६७) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नाव या नाट्यगृहाला देण्यात आले आहे.

.............................................................................................................................................

आशियातील उत्कृष्ट नाट्यगृह

पुणे महानगरपालिकेचे बालगंधर्व नाट्यगृह हे आशियातील सर्वोत्कृष्ट नाट्यगृह ठरणार असून आर्किटेक्ट गोडबोले (स्टुडिओ कोलॅबोरेटर्स, मुंबई), पुणे येथील सुविख्यात इंजिनीअर आणि काँट्रॅक्टर बाबूराव शिर्के अँड कंपनी, म्युनिसिपल कमिशनर भुजंगराव कुलकर्णी व असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर (जनरल) अनंतराव जाधव यांचे श्रम कारणीभूत झाले आहेत.

मुंबईतील चार उत्कृष्ट नाट्यगृहांच्या स्थापत्य वैशिष्ट्यांचा संगम साधण्याचा प्रयत्न पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात करण्यात आला आहे. मुंबई येथील बिर्ला मातुश्री सभागारांची ध्वनियोजना (अकॉस्टिक्स), षण्मुखानंद हॉलची वातानुकूलित व्यवस्था (एअर कंडिशनिंग), रवींद्र नाट्यमंदिराचे प्रेक्षागार (ऑडिटोरियम) आणि साहित्य संघ मंदिराचा रंगमंच (स्टेज) ही त्या थिएटर्सची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. त्या गुणवैशिष्ट्यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न बालगंधर्व नाट्यगृहात करण्यात आलेला आहे. परिणामी अकराशे प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असणारे हे थिएटर आशियातील उत्कृष्ट नाट्यगृह बनले आहे, त्याचे उदघाटन २६ जूनला झाले.

नाट्यप्रयोगाचे दृष्टीतून बांधणी

मुंबईची बहुतांशी नाट्यगृहे ही संगीतांच्या मैफली, नाट्यप्रयोग, लोकनाट्य, सभा-संमेलने अशा सर्व तऱ्हेच्या कार्यक्रमांसाठी वापरली जातात. बालगंधर्व नाट्यगृहाचे वैशिष्ट्य असे की, केवळ नाट्य प्रयोगासाठी आणि त्या प्रयोगांच्या सर्व सोयी-गैरसोयी लक्षात घेऊन ते बांधण्यात आले आहे. चित्रपटाचा खास शो करण्यासाठी तेथे आर.सी.ए.प्रोजेक्टर बसविण्यात आला असला तरी या नाट्यगृहाची स्थापत्यशास्त्रीय जडणघडण नाट्यप्रयोगाच्या दृष्टिकोनातून केली आहे.

पासष्ट फूट उंचीचा रंगमंच

अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण रंगमंच हे या नाट्यगृहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ११३+७२+६५ फूट उंचीचा हा रंगमंच संपूर्ण फिरत्या स्वरूपाचा असून त्यामधील पडदे परदेशांतील ऑपेरा हाऊसप्रमाणे पूलीज व कौंटर-पूलीजच्या साहाय्याने हळुवारपणे घरंगळत खाली येण्याची व्यवस्था तेथे केली आहे. परंपरागत भारतीय नाट्यगृहातील पडदे वाश्याभोवती गुंडाळलेले असून ते खाली सोडताना वा गुंडाळताना दोरीला अडखळतात, त्यांचा आवाजही होतो. त्यामुळे नाट्यप्रयोगात तल्लीन झालेल्या प्रेक्षकांचा रसभंग होतो. बालगंधर्व नाट्यगृहातील नव्या पद्धतीच्या पडद्यांनी या साऱ्या रसभंगकारक गोष्टींना फाटा दिला आहे. या सोयीसाठी रंगमंचाचा टॉवर ६५ फूट इतक्या प्रचंड उंचीचा बांधणे भाग पडले आहे. रंगमंचावर पाठीमागच्या बाजूस नैसर्गिकतेचा संपूर्ण आभास निर्माण करणारा सायक्लोरामा प्रकारचा पडदा बसविण्यात आला आहे. सरकत्या रंगमंचाचे ट्रॉलीसाठी रु. ४०,०००, पडद्यासाठी रु. ५०,००० आणि अन्य सीनसिनेरीसाठी रु. २५,००० खर्च करण्यात आले आहेत.

प्रेक्षकांस सर्व प्रकारच्या सोयी

अकराशे प्रेक्षकांची सोय असणाऱ्या या नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्वतंत्र ‘लेट कमर्स लॉबी’ प्रेक्षागारात बांधली असून अंक संपेपर्यंत या प्रेक्षकांनी तेथे बसावे, आणि नंतर आपापली खुर्ची त्यांनी शोधावी अशी व्यवस्था तेथे केली आहे. त्यामुळे आधी येऊन बसलेल्या प्रेक्षकांचे पायावर पाय देऊन आणि त्यांच्या नाट्यदर्शनात व्यत्यय आणीत स्वत:ची जागा शोधणाऱ्या प्रेक्षकांचा उपद्रव कमी होईल. रडू लागणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी नाट्यगृहात स्वतंत्र लॉबी बांधली असून, तेथे बसणाऱ्यांना नाट्यप्रयोग व्यवस्थित ऐकू येईल, परंतु रडण्याचा आवाज मात्र बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. नाट्यगृहातील प्रेक्षकांसाठी येण्याचे आणि जाण्याचे दरवाजे स्वतंत्र ठेवले असून, त्यायोगे प्रेक्षकांना धक्काबुक्की न करता बाहेर पडता येईल.

संध्याकाळी आणि रात्री असे दोन नाट्यप्रयोग निर्वेधपणे करता यावेत यासाठी दोन स्वतंत्र रंगपट (ग्रीन रूम्स) येथे बांधले असून रात्री-अपरात्रीचे वेळी नाटक मंडळींचे लोकांना दूर कोठे जाणे भाग पडू नये म्हणून या मंडळींना राहण्यासाठी दहा प्रशस्त खोल्या बांधल्या आहेत. तसेच नाटकांच्या रंगीत तालमीसाठी अथवा सरावासाठी मुख्य थिएटरला जोडून एक छोटे (मिनी) थिएटर बांधण्यात आले आहे.

 

संगीत नाटकांच्या वाद्यवृंदासाठी बालगंधर्व नाट्यगृहात केलेली योजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. वादक कलावंतांना स्टेजनजीक येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र भुयारी रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यामुळे नाटकाचा गद्यभाग चालू असता बाहेर जाऊन बसणाऱ्या आणि गाणे सुरू होते वेळी घाईगाईने नाट्यगृहात प्रवेश करणाऱ्या वादकांचा प्रेक्षकांना होणारा उपसर्ग टळेल. तसेच काही विशिष्ट प्रवेशांमध्ये जमावातील (मॉब) पात्रे या भुयारी रस्त्यांनी स्टेजवर प्रवेश करू शकतील.

नाट्यगृह संपूर्णत: वातानुकूलित असून त्यामधील प्रशस्त कँटिन्स हेही त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मध्यंतराचे वेळी घाईघाईने चहा पिण्यासाठी थिएटरबाहेर कुठे जावे लागणार नाही.

कलाकारांसाठी उत्तम सोय

नाट्यगृह बांधताना प्रेक्षकांबरोबर कलाकारांच्याही सोयीकडे दुर्लक्ष केलेले नाही. रंगमंचाच्या मागील बाजूस वेषभूषा, रंगभूषासाठी स्वतंत्र खोल्या बांधल्या आहेत. तसेच मुख्य नट-नटींना रंगण्यासाठी खोल्यांची स्वतंत्र योजना केलेली आहे. विशेषत: रंगमंचावर येण्यासाठी पात्रांना चढ-उतार न करता रंगभूमीवर येता येईल. कारण सर्व खोल्या (रंगभूषा, वेशभषा इत्यादी) या रंगमंचाच्या समान पातळीवर बांधलेल्या आहेत. शिवाय त्या सर्व खोल्यांतून कर्णे (स्पीकर) बसविल्याने रंगभूमीवर कोणता प्रवेश चालू आहे, याची कल्पना कलाकाराला येईल. बाहेरगावाहून येणाऱ्या नाटक मंडळाला राहण्याचीही सोय करण्यात आलेली आहे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......